Sunday, June 21, 2020

रणसंग्राम

रणसंग्राम.. 

आज सकाळी सकाळी एक मेसेज आला.
If, one day....
We all are allowed to put our troubles on a table and exchange them.
I m sure that....
After few moments, everyone would silently take back their Own.
प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तशी माझी प्रतिक्रिया आली ' मी नाही घेणार, मुळीच नाही घेणार'.

आणि बावीस (२२) वर्षांचा आयुष्याचा संघर्षमय झगडा डोळ्यासमोर ठाण मांडून बसला. जानेवारी 98 मध्ये लग्न झाले आणि मे 98 ला कळाले की जोडीदाराची एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. तसे तर आपण व्यसनाधीनतेच्या आणि हेकेखोरपणाच्या गर्तेत अडकलेल्या एका प्रवासाचे सोबती झालो आहोत हे पहिल्या महिन्यातच कळाले होते. पण नकळत प्राप्त झालेल्या गर्भधारणेने वेगळा निर्णय घेण्याची शक्यता धूसर झाली होती. त्यात ही शस्त्रक्रिया. त्याच्या घरात सगळे डॉक्टर असल्यामुळे त्यांना ह्या शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि त्याचे होणारे दुष्परिणाम माहीत होते. त्याच्या मोठ्या भावाने 'तुझे संपूर्ण आयुष्य तुझ्या पुढे आहे, तुला घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर हरकत नाही' असे सुचवलेपण होते. क्षणभर मोह झालाही, परंतु एखाद्याला अडचणीत टाकून हात वर करून निघून जाण्याची न माझी तयारी होती ना माझ्या घरच्यांची मानसिकता होती. शिवाय एक गर्भ माझ्या भरवशावर वाढत होता. शस्त्रक्रिया झाली की होईल सगळे नीट असा स्कारात्मक विचार करून परिस्थितीला तोंड द्यायचे ठरवले. एक, दोन, तीन शास्त्रक्रिया कराव्या लागल्या तेव्हा कुठे यश आले. त्यात पहिली तीन चार वर्ष निघून गेली. प्रचंड कटकटी, आरडाओरडा, सासरच्यांची संसारातली लुडबुड, भांडणे आणि मनस्ताप इतकेच फलित त्या चार वर्षांचे. अशा वातावरणात मुलगा मोठा होत होता. घरातल्या वातावरणाने की काय की जन्मतःच तो खूप समजूतदार. कधी हट्ट नाही, कुरकुर नाही, परिस्थितीशी जुळवून घेण्याची प्रवृत्ती त्याच्या अंगवळणी पडत होती.

एक वर्ष त्यातल्या त्यात निवांत गेले आणि मुलाचा अपघात झाला. कंबरेपर्यंत भाजला होता. डॉक्टरांनी बारा तासांची मुदत दिली, संसर्ग झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाणार होती. बारा (१२) तासांनी त्यातून बाहेर पडलो आणि रक्ताची कमी निर्माण झाली. संध्याकाळी डॉक्टरांनी सांगितले रक्त द्यावे लागेल. त्यांच्या कुटुंबात सगळ्यांचाच रक्तगट माझ्या मुलाच्या रक्तगटाशी जुळणारा पण कोणीच रक्त द्यायला तयार होईना, मावसभावाच्या बायकोच्या वाहिनीच्या वाहिनीने शेवटी रक्त दिले. सुजाता ताईने रात्रीतून तिच्या लॅब मध्ये प्रक्रिया करून प्लेटलेट्स उपलब्ध करून दिल्या आणि पुढचे संपूर्ण वर्ष मुलाला परत त्याच्या पायावर उभे करणे , पुन्हा पाउल टाकायला शिकवणे ह्यातच गेले. पाटणकर डॉक्टर, आई, मावशी, गुडडी सगळ्यांनी खूप मेहेनत घेतली. लहान रचना साठी हा अपघात म्हणजे मोठा मानसिक धक्का होता. तिने घर सांभाळले नसते तर आई माझ्याजवळ राहू शकली नसती. बबलू पासून सगळ्या गोष्टी लपवल्या होत्या कारण ती लांब परदेशात होती. कळाल्यावर त्याच्यासाठी उपयुक्त कितीतरी गोष्टी घेऊन ती भारतात येऊन गेली. त्यानंतर सतत त्याच्यासाठी काय काय पाठवत राहिली. ह्या संपूर्ण काळात त्याच्या घरचे आमच्याकडे कोणीही आले नाही, आम्हाला कसलीही आमंत्रणे नाहीत. आम्ही कसे जगतो आहोत कोणालाही विचारावेसे वाटले नाही. त्याच्या घरात सगळे डॉक्टर असून, एकालाही मुलाला देत असलेल्या उपचारांची चौकशी करावीशी वाटली नाही. उलटपक्षी मी हल्ली कशी त्यांना फोन करत नाही, त्यांची चौकशी करत नाही, वगैरे अनेक खोटी नाटी कारणे सांगून त्याचे कान भरणे आणि डोके भडकवण्याचे काम मात्र उत्तम केले. त्याची घरात तर काही मदत नव्हतीच, मुलाच्या उपचारांचा एक भाग होणे त्याला जमले नाहीच उलट 'माझ्या घरच्यांना तू फोन करत नाहीस, त्यांच्याशी बोलत नाही, इ' विषयांवरून रोज रोज घरात तमाशे होऊ लागले. सगळ्या गोष्टींचा इतका कंटाळा आला होता. कधी कधी वाटे मुलाला घेऊन पळून जावे कुठे तरी. नाहीतर जीवाचे बरे वाईट करून घ्यावे. घटस्फोट घ्यावा असे हल्ली ठाम होत होते. पण बाबा म्हणाले 'मुलगा आत्ताच इतक्या मोठ्या शारीरिक व्याधीतून बरा झाला आहे, असा काही निर्णय घेतला तर मानसिक व्याधींचा बळी होऊ शकतो. त्यापेक्षा तू तुझ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित कर'. आई देखील लग्न झाल्यापासून मागे होतीच, स्वतःच्या पायावर उभी राहा म्हणून.  पण पाच वर्षात आत्मविश्वास थोडा हलला होता. म्हणून नव्याने काहीतरी शिकून मग व्यवसाय किंवा नोकरी करायची असे ठरले. शिवणकाम, विणकाम, भरतकाम येत असल्याने फॅशन डीझाइनिंग ला प्रवेश घेतला. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने पुढे अजून शकावे असे ठरले. नशिबाने वरळीला सासमीरा सारख्या उत्तम विद्यालयात PGDam ला प्रवेश मिळाला. लोकल ची सवय करून घेण्यापासून माझा आणि मुलाचा नित्यक्रम ह्याचा जम बसवताना दमछाक होत होती. पण शिकण्याची इच्छा आणि व्यवसायाची ओढ सगळी सर्कस करायला भाग पाडत होती. सकाळी चार वाजता दिवस सुरू होत असे. सकाळचा नाश्ता, आमचे दोघांचे डबे, त्याचे जेवण सगळे बनवून, मुलाचा गणवेश आणि दप्तर तयार करून ६:१० ची लोकल पकडून सकाळचा 7:30 चा पहिला तास पकडायचा... दिवसभर कॉलेज करून 6 वाजता घरी पोहोचायचे, मुलाला घ्यायला जायचे, त्यानंतर त्याचा खेळ, बाग, अभ्यास, जेवण सगळे संपवून दहा वाजता त्याला झोपवून रात्री आपला अभ्यास करून झोपायला बारा वाजायचे. परत सकाळी चार चा गजर आहेच. हे सगळे इतके इत्यंभूत मांडायचे कारण, पुढे फिस्कटलेल्या शिक्षणाची तीव्रता समजावी इतकेच. सगळ्या धावपळीत परीक्षेचे वेळापत्रक आले. बरोबर त्याच दिवसातले सिंगापूर,मलेशिया, थायलंड चे बुकिंग करण्यात आले. आई म्हणाली मुलाला इतक्या लांब परदेशी व्यसनी वडिलांबरोबर एकटे सोडायचे नाहीस. परीक्षा बुडवावी लागली. दुर्दैव मागे लागले की कसे हात धुवून लागते. दुसऱ्या टर्म मध्ये कळाले की मुलाला एक भावंड येऊ घातले आहे. पाहिले चार माहिने कोणाला काही कळूच दिले नाही. कॉलेज ला जात राहिले. पण देवधर मॅडमनी घरच्यांना बोलावं सांगितल्याने नाईलाज झाला आणि गोष्टी कानोपकांनी झाल्या. शिक्षण थांबले. खूप अडचणीचे होते ते दिवस. गर्भधारणेवर प्रश्नचिन्ह, बाळाचे वजन वाढेना, डॉक्टर म्हणाले 'बाळाची योग्य वाढ होत नाही, मेंदूवर परिणाम झालेले बाळ जन्माला येईल, त्यापेक्षा विचार करा' .. काहीही सुचेना. पण अचानक वाटले 'कसेही असो, माझ्या जीवावर कोणीतरी जग पाहण्याचा प्रयत्न करतेय, जसे असेल तसे, येऊ देत त्याला ह्या जगात' असा विचार आला आणि लेबर रूम च्या टेबल वरून खाली उतरले. महिनाभरातच बाळ जन्माला आले, मुलगी झाली. लांब च्या लांब मुलगी बहुदा छोटे आयुष्य घेऊन आली. आईच्या लक्षात आले 'बाळाला श्वास घेता येत नाहीये'. बाळाला अक्षरशः हातात घेऊन पळत पळत आई, मावशी आणि परिचारिका रस्त्याच्या पलीकडे वाकडे हॉस्पिटल मध्ये घेऊन गेल्या. दहा दिवसांनी बाळ बहुदा जगेल अशी शक्यता निर्माण झाली. सव्वा किलोचा एवढासा गोळा नूसता हाताळायचा तरी भीती वाटत होती, वाढवणार कसा. आठ वर्षाचा एक राजकुमार आणि 15 दिवसाची अपुऱ्या दिवसाची अपुऱ्या वजनाची एक राजकुमारी मागे सोडून आई श्रीरामपुर ला परत गेली. कारण सासूबाई येऊन राहणार होत्या. आता खरी सर्कशीला सुरवात होणार होती. दिवसभराच्या बाईंना घेऊन त्या बाहेर हॉल मध्ये मोठ्या आवाजात दूरदर्शन बघण्यात मग्न असत. बाई असून सकाळचा मुलाचा डबा, माझा नाश्ता, जेवण, बाळाचे कपडे, दुपारचा चहा सगळीच जबाबदारी सोळाव्या दिवसापासून अंगावर पडली. त्यात गणपती आले, सासूबाई म्हणाल्या , तुमची पद्धत मला माहीत नाही, तुझे तू बघ. बाळंतपणाला महिनाही न झालेली मी हातात फडके बादली घेऊन साफसफाईला लागले. घर आवरणे, मंदिर सजवणे, घराची सजावट सगळं एकटीने केले. सासूबाई आणि त्यांच्या मुलाने माझी गम्मत बघितली. असो

अशा वातावरणात दोन सुंदर मुलांची जबाबदारी आणि स्वतःचे करियर ह्याचा विचार चालू असताना, त्याने एक नवीन आंतरराष्ट्रीय शाळा सुरू केली. त्याची जबाबदारी माझ्याकडे आली. चार वर्षे मी, मुले आणि शाळा अशी कसरत चालू असतानाच शाळेच्या मुख्याध्यापिकेने त्याला सांगितले की त्या बाईना पुढचा आणि मागचा जन्म बघता येतो आणि त्यांना हे ही कळाले की मी त्याच्यासाठी कमनशिबी ठरणार आहे वगैरे. दुसऱ्याच दिवशी मला शाळेत न जाण्याविषयी फर्मान निघाले. पुन्हा प्रश्न , आता काय ?
ह्याच विचारांच्या गुंत्यात अडकले असताना लोकल ट्रेन मधून पडून अपघात झाला आणि एक गुढगा गमावला. पूर्ण वर्ष फिजिओथेरपी , मी, व्यायाम आणि पायाचे ऑपरेशन ह्यात गेले. ऑपरेशन च्या वेळेस डॉक्टर घरातले कोणी बरोबर असल्याशिवाय भूल देईनात, तो तर लंडन ला गेलेला,मराठी चित्रपटाच्या अवॉर्ड शो साठी. ऑफिस मधल्या संतोष ला भाऊ म्हणून उभे केले, भीतीपोटी त्याने रचनाला कळवले. तिची धावपळ झाली. ह्या सगळ्यातून बाहेर पडता पडता डेंग्यू ला माझा पत्ता मिळाला.आता बहुदा मरणार वाटत असतानाच जिवंत झाले आणि सासरच्या लोकांना दुःखाच्या खाईत लोटले. नंतर वर्षभर वारंवार ताप येत राहिला. बरोबर वर्षभराने मुलाला पण डेंग्यू ने गाठले, त्याच्या पुढच्या वर्षी मुलीला. सलग तीन वर्षे 15 ऑगस्ट च्या दरम्यान आम्ही आळीपाळीने ज्युपिटर मध्ये जाऊन, राहून आलो. मुलीला मात्र डेंग्यू ने फार त्रास दिला. ICU मध्ये हलवावे लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातून ते बाळ सहीसलामत बाहेर तर पडले पण त्या औषधोपचाराने बारीक काकडीचे टरबूज झाले. ह्या लढाया चालू असताना जाणवत होते की त्याच्या व्यवसायाची आर्थिक गणित बिघडत चालली आहेत. पण आता तिथे मला अस्तित्व नव्हते. त्याचे सल्लागार मंडळ बदलले होते. सगळे काही समजत असूनही काही करता येत नव्हते. न रहावून कित्येकदा 'समोर दरी आहे, खाईत पडशील' सांगून पाहिले. त्यावर प्रतिक्रिया आली 'त्याने खाईत पडावे अशी माझी इच्छा आहे म्हणून मी हे असे सांगते' त्यानंतर तोंडाला कुलुप घातले. वकिलीच्या व्यवसायात स्थिरस्थावर होत होते. त्या व्यापात बुडवून घेतले. काही सामाजिक , सांस्कृतिक चळवळींमध्येही थोडी लुडबुड केली. मुलगा पुण्याला शिकायला गेल्यामुळे मी आणि मुलगी दोघीच राहीलो, त्यामुळे अवांतर सामाजिक कार्यासाठी थोडा वेळ मिळत होता. मी आणि माझे शेपूट नेहमी बरोबरच असायचो. ह्या काळात मुलाचे दोन्ही बोर्डाचे मैलाचे दगड पार करून झाले. असे वाटले आता होईल आयुष्य सुरळीत. पण माझ्या भावाला माझे आनंदी होणे मान्य नव्हते. खूप मोठी शिक्षा देऊन एक कायमचे प्रश्नचिन्ह उभे करून ठेवले. आम्ही अजून सावरलो नव्हतो त्यातून आणि एक दिवस मुलाने सांगितले 'माझा मार्ग चुकला, मला पूर्वपदावर यायचे आहे'. पुन्हा लढाई , पुन्हा जिंकणे. किंवा जिंकल्यासारखे वाटणे. एक विषय संपत नाही तर दुसरा प्रश्न तयार असतो. त्याने एक दिवस जाहीर केले 'आर्थिक जबाबदाऱ्या मला निभणार नाहीत, सगळे विकावे लागेलं'. मूर्खासारखे व्यवहार करून एका दिवशी सगळे कुटुंब घेऊन अक्षरशः रस्त्यावर उभे केले. मुलं फार गुणी, समजूतदार ... संपूर्ण एक महिना घर नाही, वेगवेगळ्या हॉटेल मध्ये राहून काढावा लागला पण तक्रार केली नाही. भाड्याने एक घर मिळाले, सामान लागतच होते तर लेकीच्या पोटात खूप दुखू लागले, कळाले अपेंडिक्स आहे, ओपरेशन करावे लागेल. आधीच आमची शाळा बंद करावी लागली, त्याचा तिच्या शाळेत तिला खूप त्रास झाला, बरेच ऐकावे लागले होते, त्यात घर विकले तेव्हाही सोसायटीत तिला बऱ्याच प्रश्नांचा सामना करावा लागला होता. आपल्याकडे ही फार घाणेरडी पद्धत आहे, मोठ्यांना जे विचारता येत नाही , ते घरातल्या लहान मुलांना विचारायचे. त्यांच्या मनावर काय परिणाम होईल काहीही विचार करायचा नाही. मनाने खचलेले ते बाळ आता ऑपरेशन साठी तयार करायचे होते. आम्ही दवाखाण्याची लढाई लढत असताना तो मात्र चारचाकी घेण्यात मश्गुल होता.

हा न सम्पणारा प्रवास आहे. आयुष्य नव्हे जणू समरांगण. परंतु प्रत्येक लढाईत ह्या शहराने खूप साथ दिली. चांगले सोबती दिले, मार्गदर्शक दिले, मैत्री दिली. आई आणि बहिणींची कायम मदत झाली. खूप काही शिकायला मिळाले. माणसं वाचता येऊ लागली. माणसांचे अनेक नमुने बघितले. जिवंतपणी मेलेल्या मनाने वावरणारे आत्मे अनुभवले. आता अजून फक्त पाच वर्षे, मुलांचे शिक्षण आणि व्यावसायिक आयुष्य मार्गी लागले की मग मात्र अर्जुनासारखी आयुधे एखाद्या शमीच्या ढोलीत लपवून ठेवणार आहे .... कायमच्या अज्ञातवासासाठी.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, June 5, 2020

लॉक डाऊन/ स्थानबद्ध विद्यापीठातील काही प्रश्न/उपप्रश्न/उत्तरे/अनुत्तरे(वस्तुस्थिती) आणि प्रतिक्रिया(आदर्शवाद) ..

लॉक डाऊन/ स्थानबद्ध विद्यापीठातील
काही प्रश्न/उपप्रश्न/उत्तरे/अनुत्तरे(वस्तुस्थिती) आणि प्रतिक्रिया(आदर्शवाद) ..

परराज्यातील मजूर आणि मराठी उद्योजक-
परराज्यातील मजुरांना घरी जाण्यासाठी ट्रकच्या प्रवासासाठी दरडोई रेल्वे AC च्या तिकीटापेक्षा जास्त पैसे मोजावे लागले ( वृत्तवाहिन्यांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती).
कुटुंबात कमीत कमी चार लोक असतील. इतके पैसे घालवून जाण्याचा आटापिटा का?? ते ही फक्त पंधरा दिवसांसाठी. पंधरा दिवसात लॉक डाऊन शिथिल करण्यात आला. तेवढ्या पैशात आणि सरकारी मदतीत इथे ते सुरक्षित राहू शकले असते शिवाय गावागावातुन कोरोना वाढलाही नसता. आता परत आल्यावर नवीन रोजगार मिळवण्यापासून सुरवात करावी लागेल. जाण्यासाठी खर्च करायला पैसे होते, येण्यासाठी पुन्हा खर्च करून येणार मग राहण्यासाठी पैसे का नसावेत बरे??
पूर्वी जे मराठी तरुण नोकरी नको, काहीतरी स्वतःचा कामधंदा करावा असा विचार करत असत त्यांच्या घरातल्यांपासून ओळखीतले सगळे एखादा असाध्य रोग झाल्यासारखे त्या तरुणाकडे बघत , त्याला समजावून सांगत, त्याचे मन नोकरीकडे वळवण्याचा प्रचंड आटापिटा करत असत.  परंतु सध्या समाजमाध्यम 'मराठी तरुणांनो उद्योजक व्हा, पदवीधारकांनो न लाजता शेतकाम आणि शेतमाल संबंधी कामे करा, मॅट्रिक-नॉनमॅट्रिक मुलांनो मजुरी करायला लाजू नका, इ' संदेशांनी अक्षरशः ओसंडून वहात आहेत. महाराष्ट्र बदलतोय की काय? (वस्तुस्थिती)
- काय हे , किती हे फक्त स्वतःच्या राज्याच्या प्रेमात असणे? 'मला पहा, आणि फुले वहा' प्रवृत्तीचा निषेध असो. थोडा तरी पर प्रांतीयांचा विचार, थोडी सहानुभूती ... काय हे स्वतःच्या लोकांबद्दल विचार करणे फक्त... शिव शिव.(आदर्शवाद)

मुंबई डबेवाले आणि कुल्फीवाले-
मजुरांच्या प्रश्नांत सगळे इतके अडकून पडले की आपल्या मातीतील मराठी डबेवाल्यांची आठवणच राहिली नाही. तेही तर मुंबईत उपरेच की. कुठल्या कुठल्या खेडेगावातून आलेली मंडळी ही. त्यांनी काय केले असेल. ऑफिस बंद म्हणजे डबे बंद म्हणजे कमाई बंद. त्यांनी कशी गुजराण केली असेल? गावी गेले असतील की इथेच राहिले असतील? त्यांच्या गावी जाण्याची काही सोय होती का? सध्या त्यांच्या उपजीवीकेचे साधन काय?
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवर्जून दिसणारे कुल्फीवाले. फक्त 3 महिन्यांसाठी मुंबईत येतात. सहा/ सात जण मिळून एका खोलीत रहातात. तीन महिने कुल्फी विकून पैसे कमावून पहिल्या पावसानंतर शेताची कामे करायला गावी जातात. त्यांचा पूर्णपणे हा हंगाम हातातून गेला. त्यांनी काय केले असेल? काय करत असतील? काय करतील? शेताच्या कामासाठी आता पैसे असतील का त्यांच्याकडे? कुल्फी च्या विक्रीतून जर ते मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवत असतील तर यंदा ते कसे निभावून नेतील??
-किती कुपमंडुक प्रवृत्ती ही, फक्त स्वतःच्या पायापाशी बघणे. मराठी माणसाचाच काय तो विचार ?? घेतील की ते सांभाळून... नव्हे घेतलेच पाहिजे. त्यांचा कोणी आणि का विचार करावा??

घरकाम आणि कार्यालयीन कामकाज-
काल, तारीख 5 जुन, 2020, ऑफिस चा पहिला दिवस. अर्धा दिवसच ऑफिस मध्ये काम केले पण घरी आल्यावर जे जाम झोप यायला लागली आणि जाणीव झाली, आपला मेंदू थोड्याश्या कामाने शीणला आहे. बरोबर आहे. पूर्ण दोन अडीच महिने सुट्टी घेतली , घरकामात, समाजमाध्यमांवर, दुरचित्रवाहिनी पाहताना, रेडिओ ऐकताना,वाचनात काही तुम्ही खूप लक्ष दिले पाहिजे असे गरजेचे नसते. झाले दुर्लक्ष तरी चालते. त्यामुळे मेंदूला काम करण्याची आवश्यकताच राहिली नव्हती. आता जेव्हा परत लक्षपूर्वक काम करावे लागले तर दांडी उडाली बेट्याची.
पूर्वी सर्व लोक सकाळी फारच लवकर उठत. त्यामुळे सगळी कामे सकाळी सकाळी करण्याची प्रथा पडली असावी. शिवाय सूर्यास्त झाल्यावर अंधारात काम करताना धडपडण्याची शक्यताच जास्त. त्यातूनच संध्याकाळी घरी झाडू नये हा नियम आला असणार. बरोबरच आहे, अंधारात घरातील छोट्या छोट्या मौल्यवान वस्तू कचऱ्यात गेल्या तर दिसणार नाहीत आणि नुकसान होईल हा विचार असणारच. त्या काळी लोकांकडे हिरे, माणके असायची म्हणे. पण आता परिस्थिती तशी राहिली नाही. घरातल्यांच्या पोटोबाची काळजी घेतल्यावर ऑफिस ला गेले आणि घरी परत आल्यावर घरकामे केली तरी चालू शकतात. सकाळीच सगळी कामे करण्याचा आटापिटा कार्यालयीन कामकाजावर परिणाम करू शकतो.
- काय हा आळशीपणाचा कहर? सकाळी सकाळी घरातली सगळी कामे करून, मुलांचा अभ्यास, कार्यालयीन कामकाज सगळी सर्कस जमलीच पाहिजे. ऑफिस मध्ये नाही गेले तर कामवाल्यांना घरी बसल्याचा पगार कोण आणि कसा देणार ?? रोज आठ वाजता दुरचित्रवाणीवर एक निवेदन येण्याची वाट बघत असते ' घर नीट आवरून लख्ख ठेवा. कामवाल्यांना आल्या आल्या कामाचा जास्तीचा ताण नको,  काही माणुसकी आहे की नाही??

केरळ, हत्ती आणि रागा-
कोणी म्हणे केरळ मध्ये घडलेल्या हत्तीच्या अमानुष प्रसंगावर 'रागा' ने प्रतिक्रिया देण्याचा अट्टाहास का?? तसे तर अनपढ जाहिल गवारांनी अर्थशास्त्रावर बोलू नये हा ही संकेत आहेच की. परंतु अर्थमंत्रालयाने काहीही घोषणा केली की रागा ने प्रतिक्रिया द्यावी म्हणून कोणीतरी लिखाणकाम करतेच ना? मग हत्तीवर कोणी लिहून दिले असते तर असे काय नुकसान होते ? माणूस आहे, राग येणार तर प्रतिक्रिया देणारच ना? पण राग आलाच नाही तर? आणि माणुसकीच नसेल तर?
एरवी आपल्याकडे काहीही विचित्र अथवा वाईट घटना घडली की त्या घटनेचे बळी आणि त्या प्रकरणात सामील असलेल्यांची नावे, गाव, जात, धर्म, इ ची जोरात चर्चा असते. अगदी गुन्हेगार अविवाहित आहे की विवाहित, मुले आहेत की नाही, असतील तर किती, आई वडील कोण, कसे दिसतात , वगैरे वगैरे. पण केरळ हत्ती प्रकरणात शोध-माध्यम आणि त्यांची 'सूत्र' खूपच कमी पडली. एकही नाव, गाव, पान, फुल, फळ, रंग काहीही चर्चा नाही. अतिरेकी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजच्या सगळ्या लष्करी हालचाली दाखवणारे, लष्करी अधिकाऱ्यांच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांची गुप्त ठेवलेली माहिती जगासोर ओरडून सांगणारे मूर्ख आणि बिनडोक पत्रकारितेत माहीर असलेले वृत्तवाहिनीचे सगळे पत्रकार कुठे लॉक डाऊन झाले अचानक??
- किती हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दुस्वास ?? नक्की ह्या वात्रट लेखिकेला संघाने नाहीतर भगव्या झेंड्याने पैसे चारले असणार.
हो, सध्या आपल्याकडे हा अलिखित नियम आहे, तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार असता कामा नये. विचार मांडायचा तर तो राजकीय चष्म्यातूनच.

संकट, मदत आणि आयकर भरणारा पांढरपेशा (हमाल) वर्ग-
कोणतेही संकट येवो, दुरचित्रवाणीवर मदतीच्या हाकेची एक ओळ फिरायला लागते. सगळ्यांना असे वाटत असते की कुठे मोठी रक्कम आहे? कमीतकमी पाचशे, हजार, दीड हजार, तीन हजार ते पाच हजार पर्यंत साधारण आकडा असतो. सगळ्यांना थोडे थोडे देता देता एक एक चिमूट चिमूट करता करता लक्षात येते चांगलाच खोल खड्डा झाला आहे. हे म्हणजे आयुष्यभर कर भरा आणि वेळ प्रसंग आल्यावर सरकारकडे मदतीसाठी बघावे तर तेच कटोरा घेऊन आपल्याच दारात उभे. आहो, कर भरतो म्हणजे खूप डबोले जमवले आहे असा त्याचा अर्थ घेऊ नका. कधीतरी देण्याचा ही विचार करा. आम्हाला ही घेण्याचा आनंद अनुभवू देत. त्यापेक्षा विमा कंपन्यांच्या हातात राज्यकारभार द्या. ते कसे पैसे (कर) घेतात, त्यातच त्यांचे कार्यालय चालवतात शिवाय कंपनी ला भरभराट मिळवून देतात, कंपनीसाठी भरपूर स्थावर जंगम पण खरेदी करतात आणि वेळप्रसंगी जरा सुद्धा मागेपुढे न पहाता आम्हाला पैसेही देतात. कमीतकमी आमच्या वाईट प्रसंगात आमच्याच पुढे कटोरा घेऊन येत नाहीत.
- कसली कंजूस मख्खीचुस प्रवृत्ती आहे. जातीवर गेले. ह्यांच्या हातून कधी काही सुटायचेच नाही. आहो पण आमची जात काही मागत पण नाही, आरक्षण सुद्धा नाही. एखाद्या आमच्या समाजाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी आली का हो वाचनात?? कुळकायद्यात जमिनी गेल्या, गांधी हत्येच्यावेळी जळीतात घरदार गेले तरीही पाय रोवून उभे आहोत, कुठल्याही सरकारी मदतीशिवाय... आहात कुठे. शिवाय पूर्ण रकमेचा आयकर ही भरतो.

कळावे, लोभ असावा

- स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, June 2, 2020

जागते रहो SSSSSS ...

जागते रहो SSSSSS ...

सध्या अचानक सगळ्यांना 'राजकीय जाग' आली आहे. ज्या लोकांना पूर्वी राजकारण समजत नव्हते किंवा आवडत नव्हते ते ही अचानक समाजमाध्यमांवर राजकीय लेख , त्यावर प्रतिक्रिया , इ प्रकारे व्यक्त होऊ लागले आहेत. फक्त हे अचानक आलेले राजकीय जागृतीचे वादळ 'चहाच्या पेल्यातील वादळ' ठरू नये आणि स्मशान वैराग्यासारखे कालांतराने विस्मरणात जाऊ नये हीच इच्छा.

राजकीय विचारधारेमध्ये मनसोक्त डुंबणाऱ्या जुन्या आणि नव्या दोन्हीही प्रकारच्या लोकांमध्ये काही ठळक वैशिष्ट्ये आवर्जून आढळतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे 'आम्ही कसे श्रेष्ठ, उत्तम, अचूक, वगैरे वगैरे सांगणारे. हे लोक नक्कीच परवडतात. ते कोणाच्या अधेमध्ये नाहीत, कोणाला नावे ठेवत नाहीत, कोणावर टीका टिप्पणी नाही. फक्त आम्ही कसे आणि किती योग्य व बरोबर वागतो इतकेच ते सांगत रहातात. त्यांचा फारसा काही कोणाला उपद्रवत असत नाही. पण निष्ठा ठाम, एका निरोपावर धाव घेणारे आणि अंगावर पडलेली जबाबदारी निष्ठेने पार पडणारा वर्ग.

दुसरा प्रकार 'आपल्यालाच कसे सगळे समजते' प्रकार. कोणत्याही पक्षाने काहीही लिहू देत, वागू देत, सांगू देत.... ह्या प्रकारातले लोक त्यांना उभे आडवे कापून काढणार. त्यात अपपरभाव नसतो. 'सब घोडे बारा टक्के' न्यायाने सगळ्यांवरच आसूड चालवणार. साधारण 'हम करे सो कायदा' विचारांचा, थोडा तिखट, जहरीला, ठसका लागण्याची शक्यता असणारा हा वर्ग.

 तिसरा प्रकार म्हणचे 'आम्हीच कसे योग्य, ते (समोरचा पक्ष) कसा चूक' प्रकारात मोडणारे. स्वतःच्या निष्ठा सांभाळताना दुसऱ्याच्या निष्ठांवर उभे आडवे घाव घालणारे. वरच्या फळीत 'युती' तुन 'आघाडी'त बदली झाली तरी ह्या कार्यकर्त्यांना काहीच फरक पडत नाही. समोरचा बदलला तरी चालेल पण समोर कोणीतरी आहे ना मग सोलून काढ त्याला, इतकेच त्यांचे काम. आपल्या निष्ठांबद्दल बोलताना त्यांना समोर मीत्र, नातेवाईक, शुभचिंतक काहीही दिसत नाहीत. राजकीय निष्ठांपायी स्वतःचे प्रचंड नुकसान करून घेणारा आणि बऱ्याच आप्तस्वकीयांना दुखावून जवळ जवळ एकटा पडलेला असा हा वर्ग.

सगळ्यात चांगला वर्ग म्हणजे शांत आणि सहनशील, प्रचंड निरुपद्रवी, गुपचूप आपल्याला आवडणाऱ्या चिन्हावर मोहोर उमटवीणारे संत-सज्जन मतदार. व्यक्त होतील तेही अगदी हळू आवाजात. समाजमाध्यमांवर येणाऱ्या लेखाला किंवा संदेशाला प्रतिक्रिया देतील ती पण फक्त 'आवडले/like' इतकीच. कोणाला नावे ठेवणे नाही, आपले मत तावातावाने मांडणे नाही. पण निवडणुकीचे वारे उलटे वाहवण्याची ताकद राखून असणारे. त्यांना त्यांच्या ताकदीची पूर्ण कल्पना असते. कधी कुठल्या राजकीय व्यक्तिमत्वासमोर दबून जाणार नाहीत, कधी आपले कुठले काम घेऊन त्यांच्याकडे जाणार नाहीत, राजकीय विषय आणि व्यक्तिमत्वे अनुल्लेखाने मारण्याची ताकद असलेला वर्ग.

सामाजिक आणि राजकीय बांधिलकीच्या जाणिवेच्या ह्या नव्या लाटेला ओहोटी मात्र लागू नये. उलटपक्षी ही लाट मतदानाच्या महासागरात रूपांतरित व्हावी. समाजीक आणि राजकीय आखाड्यात स्थित्यंतराचा मान ह्या महासागराला मिळावा. २०२१ हे भारतासाठी महासत्ता होण्याच्या शक्यतेचे वर्ष. त्या शक्यतेला सत्यात उतरविण्याची ताकद ह्या महालाटेत निर्माण व्हावी, हीच सदिच्छा.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित