Friday, June 5, 2020

लॉक डाऊन/ स्थानबद्ध विद्यापीठातील काही प्रश्न/उपप्रश्न/उत्तरे/अनुत्तरे(वस्तुस्थिती) आणि प्रतिक्रिया(आदर्शवाद) ..

लॉक डाऊन/ स्थानबद्ध विद्यापीठातील
काही प्रश्न/उपप्रश्न/उत्तरे/अनुत्तरे(वस्तुस्थिती) आणि प्रतिक्रिया(आदर्शवाद) ..

परराज्यातील मजूर आणि मराठी उद्योजक-
परराज्यातील मजुरांना घरी जाण्यासाठी ट्रकच्या प्रवासासाठी दरडोई रेल्वे AC च्या तिकीटापेक्षा जास्त पैसे मोजावे लागले ( वृत्तवाहिन्यांच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती).
कुटुंबात कमीत कमी चार लोक असतील. इतके पैसे घालवून जाण्याचा आटापिटा का?? ते ही फक्त पंधरा दिवसांसाठी. पंधरा दिवसात लॉक डाऊन शिथिल करण्यात आला. तेवढ्या पैशात आणि सरकारी मदतीत इथे ते सुरक्षित राहू शकले असते शिवाय गावागावातुन कोरोना वाढलाही नसता. आता परत आल्यावर नवीन रोजगार मिळवण्यापासून सुरवात करावी लागेल. जाण्यासाठी खर्च करायला पैसे होते, येण्यासाठी पुन्हा खर्च करून येणार मग राहण्यासाठी पैसे का नसावेत बरे??
पूर्वी जे मराठी तरुण नोकरी नको, काहीतरी स्वतःचा कामधंदा करावा असा विचार करत असत त्यांच्या घरातल्यांपासून ओळखीतले सगळे एखादा असाध्य रोग झाल्यासारखे त्या तरुणाकडे बघत , त्याला समजावून सांगत, त्याचे मन नोकरीकडे वळवण्याचा प्रचंड आटापिटा करत असत.  परंतु सध्या समाजमाध्यम 'मराठी तरुणांनो उद्योजक व्हा, पदवीधारकांनो न लाजता शेतकाम आणि शेतमाल संबंधी कामे करा, मॅट्रिक-नॉनमॅट्रिक मुलांनो मजुरी करायला लाजू नका, इ' संदेशांनी अक्षरशः ओसंडून वहात आहेत. महाराष्ट्र बदलतोय की काय? (वस्तुस्थिती)
- काय हे , किती हे फक्त स्वतःच्या राज्याच्या प्रेमात असणे? 'मला पहा, आणि फुले वहा' प्रवृत्तीचा निषेध असो. थोडा तरी पर प्रांतीयांचा विचार, थोडी सहानुभूती ... काय हे स्वतःच्या लोकांबद्दल विचार करणे फक्त... शिव शिव.(आदर्शवाद)

मुंबई डबेवाले आणि कुल्फीवाले-
मजुरांच्या प्रश्नांत सगळे इतके अडकून पडले की आपल्या मातीतील मराठी डबेवाल्यांची आठवणच राहिली नाही. तेही तर मुंबईत उपरेच की. कुठल्या कुठल्या खेडेगावातून आलेली मंडळी ही. त्यांनी काय केले असेल. ऑफिस बंद म्हणजे डबे बंद म्हणजे कमाई बंद. त्यांनी कशी गुजराण केली असेल? गावी गेले असतील की इथेच राहिले असतील? त्यांच्या गावी जाण्याची काही सोय होती का? सध्या त्यांच्या उपजीवीकेचे साधन काय?
मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात आवर्जून दिसणारे कुल्फीवाले. फक्त 3 महिन्यांसाठी मुंबईत येतात. सहा/ सात जण मिळून एका खोलीत रहातात. तीन महिने कुल्फी विकून पैसे कमावून पहिल्या पावसानंतर शेताची कामे करायला गावी जातात. त्यांचा पूर्णपणे हा हंगाम हातातून गेला. त्यांनी काय केले असेल? काय करत असतील? काय करतील? शेताच्या कामासाठी आता पैसे असतील का त्यांच्याकडे? कुल्फी च्या विक्रीतून जर ते मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवत असतील तर यंदा ते कसे निभावून नेतील??
-किती कुपमंडुक प्रवृत्ती ही, फक्त स्वतःच्या पायापाशी बघणे. मराठी माणसाचाच काय तो विचार ?? घेतील की ते सांभाळून... नव्हे घेतलेच पाहिजे. त्यांचा कोणी आणि का विचार करावा??

घरकाम आणि कार्यालयीन कामकाज-
काल, तारीख 5 जुन, 2020, ऑफिस चा पहिला दिवस. अर्धा दिवसच ऑफिस मध्ये काम केले पण घरी आल्यावर जे जाम झोप यायला लागली आणि जाणीव झाली, आपला मेंदू थोड्याश्या कामाने शीणला आहे. बरोबर आहे. पूर्ण दोन अडीच महिने सुट्टी घेतली , घरकामात, समाजमाध्यमांवर, दुरचित्रवाहिनी पाहताना, रेडिओ ऐकताना,वाचनात काही तुम्ही खूप लक्ष दिले पाहिजे असे गरजेचे नसते. झाले दुर्लक्ष तरी चालते. त्यामुळे मेंदूला काम करण्याची आवश्यकताच राहिली नव्हती. आता जेव्हा परत लक्षपूर्वक काम करावे लागले तर दांडी उडाली बेट्याची.
पूर्वी सर्व लोक सकाळी फारच लवकर उठत. त्यामुळे सगळी कामे सकाळी सकाळी करण्याची प्रथा पडली असावी. शिवाय सूर्यास्त झाल्यावर अंधारात काम करताना धडपडण्याची शक्यताच जास्त. त्यातूनच संध्याकाळी घरी झाडू नये हा नियम आला असणार. बरोबरच आहे, अंधारात घरातील छोट्या छोट्या मौल्यवान वस्तू कचऱ्यात गेल्या तर दिसणार नाहीत आणि नुकसान होईल हा विचार असणारच. त्या काळी लोकांकडे हिरे, माणके असायची म्हणे. पण आता परिस्थिती तशी राहिली नाही. घरातल्यांच्या पोटोबाची काळजी घेतल्यावर ऑफिस ला गेले आणि घरी परत आल्यावर घरकामे केली तरी चालू शकतात. सकाळीच सगळी कामे करण्याचा आटापिटा कार्यालयीन कामकाजावर परिणाम करू शकतो.
- काय हा आळशीपणाचा कहर? सकाळी सकाळी घरातली सगळी कामे करून, मुलांचा अभ्यास, कार्यालयीन कामकाज सगळी सर्कस जमलीच पाहिजे. ऑफिस मध्ये नाही गेले तर कामवाल्यांना घरी बसल्याचा पगार कोण आणि कसा देणार ?? रोज आठ वाजता दुरचित्रवाणीवर एक निवेदन येण्याची वाट बघत असते ' घर नीट आवरून लख्ख ठेवा. कामवाल्यांना आल्या आल्या कामाचा जास्तीचा ताण नको,  काही माणुसकी आहे की नाही??

केरळ, हत्ती आणि रागा-
कोणी म्हणे केरळ मध्ये घडलेल्या हत्तीच्या अमानुष प्रसंगावर 'रागा' ने प्रतिक्रिया देण्याचा अट्टाहास का?? तसे तर अनपढ जाहिल गवारांनी अर्थशास्त्रावर बोलू नये हा ही संकेत आहेच की. परंतु अर्थमंत्रालयाने काहीही घोषणा केली की रागा ने प्रतिक्रिया द्यावी म्हणून कोणीतरी लिखाणकाम करतेच ना? मग हत्तीवर कोणी लिहून दिले असते तर असे काय नुकसान होते ? माणूस आहे, राग येणार तर प्रतिक्रिया देणारच ना? पण राग आलाच नाही तर? आणि माणुसकीच नसेल तर?
एरवी आपल्याकडे काहीही विचित्र अथवा वाईट घटना घडली की त्या घटनेचे बळी आणि त्या प्रकरणात सामील असलेल्यांची नावे, गाव, जात, धर्म, इ ची जोरात चर्चा असते. अगदी गुन्हेगार अविवाहित आहे की विवाहित, मुले आहेत की नाही, असतील तर किती, आई वडील कोण, कसे दिसतात , वगैरे वगैरे. पण केरळ हत्ती प्रकरणात शोध-माध्यम आणि त्यांची 'सूत्र' खूपच कमी पडली. एकही नाव, गाव, पान, फुल, फळ, रंग काहीही चर्चा नाही. अतिरेकी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजच्या सगळ्या लष्करी हालचाली दाखवणारे, लष्करी अधिकाऱ्यांच्या घरातल्या सगळ्या कुटुंबियांची गुप्त ठेवलेली माहिती जगासोर ओरडून सांगणारे मूर्ख आणि बिनडोक पत्रकारितेत माहीर असलेले वृत्तवाहिनीचे सगळे पत्रकार कुठे लॉक डाऊन झाले अचानक??
- किती हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा दुस्वास ?? नक्की ह्या वात्रट लेखिकेला संघाने नाहीतर भगव्या झेंड्याने पैसे चारले असणार.
हो, सध्या आपल्याकडे हा अलिखित नियम आहे, तुम्हाला तुमचे स्वतःचे विचार असता कामा नये. विचार मांडायचा तर तो राजकीय चष्म्यातूनच.

संकट, मदत आणि आयकर भरणारा पांढरपेशा (हमाल) वर्ग-
कोणतेही संकट येवो, दुरचित्रवाणीवर मदतीच्या हाकेची एक ओळ फिरायला लागते. सगळ्यांना असे वाटत असते की कुठे मोठी रक्कम आहे? कमीतकमी पाचशे, हजार, दीड हजार, तीन हजार ते पाच हजार पर्यंत साधारण आकडा असतो. सगळ्यांना थोडे थोडे देता देता एक एक चिमूट चिमूट करता करता लक्षात येते चांगलाच खोल खड्डा झाला आहे. हे म्हणजे आयुष्यभर कर भरा आणि वेळ प्रसंग आल्यावर सरकारकडे मदतीसाठी बघावे तर तेच कटोरा घेऊन आपल्याच दारात उभे. आहो, कर भरतो म्हणजे खूप डबोले जमवले आहे असा त्याचा अर्थ घेऊ नका. कधीतरी देण्याचा ही विचार करा. आम्हाला ही घेण्याचा आनंद अनुभवू देत. त्यापेक्षा विमा कंपन्यांच्या हातात राज्यकारभार द्या. ते कसे पैसे (कर) घेतात, त्यातच त्यांचे कार्यालय चालवतात शिवाय कंपनी ला भरभराट मिळवून देतात, कंपनीसाठी भरपूर स्थावर जंगम पण खरेदी करतात आणि वेळप्रसंगी जरा सुद्धा मागेपुढे न पहाता आम्हाला पैसेही देतात. कमीतकमी आमच्या वाईट प्रसंगात आमच्याच पुढे कटोरा घेऊन येत नाहीत.
- कसली कंजूस मख्खीचुस प्रवृत्ती आहे. जातीवर गेले. ह्यांच्या हातून कधी काही सुटायचेच नाही. आहो पण आमची जात काही मागत पण नाही, आरक्षण सुद्धा नाही. एखाद्या आमच्या समाजाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी आली का हो वाचनात?? कुळकायद्यात जमिनी गेल्या, गांधी हत्येच्यावेळी जळीतात घरदार गेले तरीही पाय रोवून उभे आहोत, कुठल्याही सरकारी मदतीशिवाय... आहात कुठे. शिवाय पूर्ण रकमेचा आयकर ही भरतो.

कळावे, लोभ असावा

- स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment