Tuesday, July 14, 2020

माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, रामराम !!

माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब,
रामराम !!

तुमच्या तीन अंकी प्रदीर्घ मुलुखती कडून महाराष्ट्राच्या नागरिकांना बऱ्याच अपेक्षा होत्या.अनेक वर्षे राजकारण कोळून पिल्यावर देखील तुम्हाला अजूनही पक्षांतर्गत आणि अंतरपक्षीय राजकारणातच रस आहे हे बघून निराशा झाली. तुमच्या राजकीय कारकीर्दीच्या अर्ध्या वयाची कारकीर्द असलेल्या नेत्यांवर हिरीरीने बोलण्याचा उत्साह न समजण्यासारखा.
मुलाखतकाराने मुलाखत जरी राजकीय हेतूने घेतली असली तरी  ऐकणारे श्रोते राजकीय नेते वा राजकीय पक्षांव्यतिरिक्त सामान्य जनता ही होती. सध्या सर्वसामान्य नागरिक ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्यांच्यासाठी 'तुमचे राजकारण गेले चुलीत', 'आग लावा त्या राजकीय पक्षांना' म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना महामारीने आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य संकटात अडकलेल्या जनतेशी तुम्ही संवाद साधाल,  त्यांच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालाल, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांवर काही तोडगा सुचवाल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.
उद्धव साहेब कुठे चुकले आणि देवेंद्रजीनी काय चुका केल्या, तुम्ही कसे गनिमी काव्याने पाठिंबा दिला आणि काढला ह्याने आमच्या कोरोना काळातल्या कोणत्या समस्यांचे समाधान होणार आहे?
तुम्ही पाच वर्षे सरकार चालवा नाहीतर पाच दिवस , त्यात आमच्या जगण्याची , जिवंत राहण्याची शाश्वती कुठे आहे??
साहेब, गेले अनेक वर्षे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात ते सेनेच्या किंवा काँग्रेस च्या जीवावर नाही तर ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांवर आणि प्रेमावर. सेना तर तुमची पारंपरिक शत्रू, काँग्रेस ला सोडचिठ्ठी दिलीत ती त्यांच्यावरच्या प्रेमापोटी तर निश्चितच नाही. अतिशय खेद वाटतो सांगायला पण तरीही आज जनताजनार्दना पेक्षा तुम्हाला ते पक्ष अधिक महत्त्वाचे वाटले.... असे तुमच्या मुलाखतीतून तरी जाणवले.
कोण कसा चूक, कोण कुठे कमी पडतो, कोण लबाड्या करतोय ते आम्ही बघतोच आहोत. त्याची फळ आम्ही २०१४ च्या मतदानात पदरी टाकणारच आहोत. आत्ता आम्हाला अपेक्षित होते, अनुभवसम्पन्न असे एक राजकीय व्यक्तिमत्व जेव्हा अशा महामारीच्या काळात नडलेल्या जनते समोर येते, तेव्हा त्यांच्या अनुभवाच्या, अभ्यासाच्या आणि दूरदृष्टीच्या पेटार्यातून काहीतरी ठोस आणि लोकहिताच्या उपायोगी पडणारे असे काही निर्णय, काही उपाययोजना,काही संकल्प बाहेर पडतील. कमीत कमी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांसह ह्या महामारीच्या काळात कुठे कुठे आणि कसे जनतेसाठी काम करणार आहात वा काम होणार आहे, एखादा हेल्पलाईन नंबर, कुठल्या उद्योगक्षेत्रात कामे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात किंवा देणार आहात ह्या बद्दल जरी बोलला असतात तरी खूप दिलासा मिळाला असता. पण दुर्दैवाने असे झाले नाही.
मोदोजींचे गुरू कोण, ते यशस्वी झाले की नाही ह्याच्यापेक्षा आमच्या लेकरांच्या यशापयशाचे काय, त्यांच्या गुरूंचा पगार आम्ही द्यायचा की गुरुकुल ने ह्या प्रश्नांनीच आम्ही सध्या त्रस्त आहोत. तुमच्या पर्यंत आमचे प्रश्न पोहोचत नाहीत की तुम्हाला आमच्या प्रश्नांमध्ये रस राहिला नाही ?? ऊध्ववजी एका मोठ्या, आर्थिक विवंचना नसलेल्या घरात जन्माला आले. पण तुम्ही तर आमचे आयुष्य अनुभवले आहे ना ?? आमच्या विवंचना कधीकाळी तुमच्या आयुष्याचा पण एक भाग होत्या ना?? की आता गतकाळाचे विस्मरण झाले??
पोपटपंची ला तर आम्ही महाराष्ट्रावरून ओवाळूनच टाकले आहे. त्यामुळे ना काही अपेक्षा ना काही खंत. पण तुम्ही आमची घोर निराशा केलीत. दुसऱ्याची रेघ खोडुन लहान करण्याच्या नादात आपली रेघ मोठी करायची विसरून गेलात बहुदा.

कळावे, लोभ असावा(?)

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

ता.क.: पुढील काही दिवसात सम्पर्क न झाल्यास मा.बंटीभाऊंच्या टोळधाडेने उचलून नेले असणार हे समजून घेणे.

Friday, July 10, 2020

निमित्त गुरुपौर्णिमा ...

निमित्त
गुरुपौर्णिमा ...

दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या नानावीध शुभेच्छांचा पाऊस पडला. निसर्ग, प्राणी, पक्षी, मित्र-मैत्रिणी, माता-पिता जे जे आजुबाजूला दिसते, वावरते त्या सगळ्यांना गुरू मानून श्रेय देण्याचा अट्टाहास सगळ्या शुभेच्छांमधून अक्षरशः ठिबकत होता. एरवी रोजच्या जगण्यात मदत करणाऱ्या, पाठीशी उभे राहणाऱ्या, योग्य सल्ला देणाऱ्यास त्याचे श्रेय देण्याचा कंटाळा करणारे, मी स्वतःच स्वतःला घडवले सांगणारे सुद्धा ह्या शुभेच्छांच्या लाटेत वहात होते.

सगळ्या जगाला गुरू मानून श्रेय देणारे स्वतःला श्रेय द्यायला मात्र साफ विसरले होते. आपणही आपले गुरू असतोच की. तसे नसते तर अगदी लहान मूल देखील दुसऱ्याच्या संगण्याला नकार वा होकार न देते. ज्या क्षणी तो छोटा जीव आपल्या आईला , आजूबाजूच्या लोकांना एखाद्या गोष्टीसाठी नकार अथवा होकार भरत असतो, त्या क्षणी तो स्वतः स्वतःशी संवाद साधत असतो. एका अर्थी स्वतःला शिकवत असतो. त्याच्या शिकवण्याच्या , विचाराच्या आड आजूबाजूच्या जगाचे सांगणे असेल तर तो ते ऐकण्यास तयार होत नाही. तिथूनच आपण स्वतःच स्वतःचे गुरू व्हायल सुरवात होते. कधीही न संपणारी , तहेहयात चालणारी प्रक्रिया सुरू होते. कालांतराने आजाणतेपणे तिचाच विसर पडतो.

जसे जसे मूल मोठे होत जाते, ते आजूबाजूच्या वातावरणातून अनेक गोष्टी केवळ निरीक्षणातून आत्मसात करत असते. पण काय आत्मसात करावे आणि काय सोडावे ते शिकवणारे तर त्याचे स्वतःचे मनच असते. असे म्हणतात ज्यांचा स्वमनाशी सुसंवाद असतो त्यांचे निर्णय बहुदा चुकत नाहीत. ह्या विचाराचे मूळ बहुदा त्या मनाच्या शिकवणीतच असावे. तसे नसते तर जन्मापासून व्यवस्थित समज यायला लागेपर्यंत ज्या आई वर ते मूल अवलंबून असते, तिला वेगवेगळ्या कारणांसाठी त्या बछड्याने नकार वा होकार दिला नसता. ज्याला स्वतःचे स्वतः काही करता येत नाही त्याला 'नाही' अथवा 'हो' म्हणायचे कसे कळते ??

मोठे झाल्यावर मात्र इतर काय बोलतात, काय सांगतात, काय सुचवतात ह्यातच मन अधिक अडकून पडते, त्यांनतर बहुदा तो मनाचा स्वतःशी चाललेला संवाद हळू हळू कमी कमी होत असावा. किंवा तो संवाद झाला तरी ऐकू येणे, समजणे, त्याबरहुकूम वागणे कमी होत असावे. आणि म्हणूनच हे उदगार वारंवार ऐकू येऊ लागतात 'माझ्या मनात एकदा विचार आला होता ....' , 'आधी मला वाटले होते ..... ', वगैरे. वेळीच त्या अंतर्मनाचा, त्या आपल्यातल्या आपल्या गुरूचा आवाज जर ऐकू शकू, तर जास्तीत जास्त निर्णय योग्य घेतले जाण्याची शक्यता वाढेल. दुर्लक्ष केले तर मात्र त्याचे विपरीत फलीतही आपल्यालाच भोगायचे आहे.

कोणीतरी काहीतरी सांगते, भरवते, ठासवते, बिंबवते म्हणून आपण ते आपलेच म्हणणे असल्यासारखे जेव्हा स्वीकारतो, त्याक्षणी आपली आपल्या मनाशी जोडलेली नाळ तोडून टाकतो. नाळेचे काहीच नुकसान नाही, झालेच तर फक्त आणि फक्त आपले नुकसान होते. त्यामुळे ह्या क्षणापासून 'मीच माझा गुरू. माझे मन, माझे विचार, माझे म्हणणे हेच माझे मार्गदर्शक. मी त्यांनी सुचवलेल्या मार्गावरच जाणार, आणि माझ्या मनासारखा, माझ्या विचारासारखा विचार असणारे सहृदय फक्त माझ्या आजूबाजूला असतील'...असा निग्रह करूयात.

पुढच्या गुरुपौर्णिमेला अहंकाराचा दर्प नसलेल्या, स्वस्तुतीची वाळवी न लागलेल्या परंतु स्वतःमधील गुरुची स्तुती करणाऱ्या शुभेच्छा येतील अशी अपेक्षा करूयात.

कळावे, लोभ असावा.

-स्वाती आवटी दीक्षित

साबून की शकलं मे तू तो निकला झाSSSSग ...

साबून की शकलं मे
तू तो निकला झाSSSSग ...

लहानपणी साबण ही वैयक्तिक गोष्ट असते ह्याची माझ्या पिढीच्या कोणालाच कल्पना नव्हती. किराणा सामानात जो साबण येत असे तो त्या महिन्याचा साबण. तो अंघोळीव्यतिरिक्त इतर काही काम करत होता की नाही माहीत नाही, जसे 'सुंदर मनमोहक खुशबू'  किंवा 'मेरी त्वचा तरुण हो गई' किवा 'तंदुरुस्ती की रक्षा' किंवा 'ज्यादा झाग देता है' वगैरे. आमची पण त्याच्याकडून अशी काही अपेक्षा नसायची. खरेतर साबणाकडून अपेक्षा करतात हेच माहीत नव्हतं.

दूरदर्शन चे युग बहुदा हे खुळ घराघरात घेऊन आले. आमच्या घरी पहिला 'स्वतःचा साबण' आणला तो माझ्या भावाने 'लाईफ बॉय'. त्याला आम्ही लाल रंगाचा दगड म्हणून चिडवायचो. पण तो मात्र त्या लाल दगडाच्या प्रेमात होता. अतिशय उग्रट वास आणि हातात न मावणारा आकार त्यामुळे तर त्याला कायम 'नावडत्या' श्रेणीत बसावे लागले. योगायोगाने नेमके त्याच काळात वर्तमानपत्रात एक लेख आला होता, त्यात हा लाल दगड लाईफबॉय परदेशात प्राण्यांना अंघोळ घालायला वापरतात असे लिहिले होते. झालं माकडाच्या हातात कोलीत मिळालं, मग तर आम्ही आमच्या भावाला त्या लाल उग्रट जाडजूड दगड छाप साबणावरून इतकं चिडवलं असेल.

त्यानंतर एका वेगळ्याच साबणाचे घरंगळत आमच्या घरात प्रवेश केला. निमित्त झाले माझ्या बहिणीचे परदेशी जाणे. तोपर्यंत बाटलीत फक्त शाम्पू नावाचा शिकेकाईला पर्याय मार्केट मध्ये आला होता. साबण मात्र साबणासारखाच वडीच्या रुपातच येत असे. बहिणीने परदेशातून परत येताना बाटलीतील द्रवरूपी साबण पहिल्यांदा आमच्या घरी आणला.  कितीतरी दिवस शाम्पू आणि साबणाच्या वेगवेगळ्या बाटल्या ओळखण्यातच वेळ गेला. त्याची सवय होते ना होते ... माझ्या घरात एक परी मोठी होत होती.

एक दिवस शिल्पा कडे आम्ही दोघी गेलो होतो तर तिच्या लेकीने सुंदर सुंदर नानाविध रंगांचे , आकाराचे, वासाचे साबण बनवले होते. एक एक करताकरता दहा / बारा साबणाचे प्रकार आणि आकारही त्या दिवशी आमच्या घरात पर्यायाने आयुष्यात आले आणि चौकोनी साबणाच्या आकाराला तडे गेले. तरीही एक गोष्ट कायम होती, केसांसाठी शाम्पू आणि अंघोळीला साबण, त्यात फारसा बदल झाला नव्हता. शिकेकाईची जागा शाम्पू ने घेतली होती आणि साबणाची द्रवरूप किंवा अनेकविध आकाराउकारातल्या साबणाने इतकाच काय तो बदल.

परी मोठी होत होती तसे तिचे भावविश्व आणि साबण विश्व देखील विस्तारत होते. चेहेऱ्याची वेगळी बाटली, नखांना वेगळी, अंघोळीची वेगळी त्यात भर intimate wash ची. लेकीच्या निमित्ताने साबणाच्या जाहिराती विशेष लक्ष वेधायला लागल्या. मग लक्षात आले हल्ली प्रत्येक गोष्टी साठी वेगळा साबण असतो. हँड वॉश वेगळा, मेनीक्युअर पेडिक्युअर साठी वेगळा, चेहेऱ्याचा वेगळा, अंघोळीसाठी सुद्धा कितीतरी तऱ्हा सॉफ्टफिल (मऊ सुत), स्क्रबर (साबणात रवा टाकल्यासारखा), आयुर्वेदिक त्यातही लिंबोणीचा पाला आणि कोरफड ला जास्त मान... प्रत्येक साबणाला पाच मिनिटं द्यायची म्हंटली तरी साधारण रोज अर्धा तास तरी वाया जाणार. एवढं करूनही परत महिन्याच्या महिन्याला ब्युटी पार्लर ची नेमाने वारी करणारे असंख्य जीव आजूबाजूला आहेतच की. मग इतके नानाविध साबणाचे प्रकार आणून, वापरून काय फायदा ??
साबून की शकलं मे झाक नुसता ... हुउऊऊऊ आमच्या वेळी नव्हतं अस काही.
बहुदा त्यामुळेच शाळेत आणि क्लास ला आपण वेळेत जाऊ शकत होतो. आपल्या शिक्षणात साबणाचा इतका हात ( फेस व्हॅल्यू) असेल असे वाटले नव्हते.

कळावे, लोभ असावा

- स्वाती आवटी दीक्षित

चोराच्या मनात पोलीस स्टेशन ...

चोराच्या मनात
पोलीस स्टेशन ...

एखादा गुंड अपघातात गेला काय किंवा मारला गेला काय, त्याच्याबद्दल जाहीर पुळका व्यक्त करताना 'आपल्याला ओळखणारे लोक ऐकतायेत, घरातली मंडळी ऐकतायेत, ते आपल्याबद्दल काय मत करून घेतील' ... असा काही विचार मनात येत नसेल का ?? की 'कंबरेच सोडून मुंडास्याला बांधून' मोकळे झालेत??

एखादवेळी समाजातले गुंड संपतील पण.
मुंबईमध्ये कुठे आहे आता गुंडाराज, पण मनातल्या गुंडाडपणाचे काय?? पुळका गॅंग ने एक मिनिटभर विचार करावा की 'त्या गुंडाने तुमच्या कानशिलाला घोडा टेकवला' किंवा 'त्याने तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्याशी मैत्री केली'... सरसरून काटा आला ना अंगावर.

 गुंड, अतिरेकी, सगळ्याच वाईट प्रवृतींबद्दल गेल्या 10/12 वर्षात अचानक सहानुभूतीची ही लाट आली कुठून ?? 'गुंड असला म्हणून काय झाले, तो पण एक माणूस आहे' असा एक (बे)सूर लागलेला हल्ली बरेचदा ऐकू येतो. आरे , जसा तो माणूस आहे तसा पोलिस पण माणूसच आहे... हे हेतुपुरस्सरपणे विसरायला होते का आपल्याला?? 'पोलीस कायद्याचे रक्षक आहेत, त्यांनी कायदा मोडता कामा नये' ... मान्य , पण कायदे मोडणाऱ्यांना जर पोलिसांनी मोडले ते तरी चालेल ना ?? की बंदुकीच्या ऐवजी मेणबत्त्या द्यायच्या त्यांच्या हातात??

तसे तर सीमेवर लढणारे जवान पण फारच क्रूर, अतिरेक्यांबद्दल बिलकुल दयामाया नाही. दुसऱ्या देशाचा सैनिक बिचारा चुकून आपल्याकडे येतो , आपल्या जमिनीवर झोपडी बांधायचा प्रयत्न करतो तर 'अतिथी देवो भव' ला बट्टा लावत खुशाल गोळी घालतात त्याला. काय बिघडले थोडी थोडी थोडी करत बरीचशी जमीन त्यांना दिली तर ?? येऊ देत त्यांना आपल्याकडे, मारू देत त्यांना आपले सिमेवर रहाणारे रहिवासी, नाहीतरी लोकसंख्येचा प्रश्न किती बिकट झाला आहे आपल्याकडे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवायला ते आपल्याला हातभारच तर लावत आहेत ना. बिलकुल वळण नाही आपल्या सेनेला, चांगले संस्कारच झाले नाहीत त्यांच्यावर. दोन(२)-चार(४) मेणबत्त्या त्यांनाही पाठवून द्या.

पोलिसभरतीच्या वेळेस पण ह्या पुळकावीराना भरतीसाठी आलेल्या तरुणांबद्दल प्रचंड माया, प्रेम, भूतदया वाटत असते.
ज्या पोलीसाला उन्हातान्हा, पावसात, जंगलात कुठेही जिथे ड्युटी लागेल तिथे बारा(१२)- बारा(१२) तास काम करावे लागते. कधी उदरभरणाचा योग असतो तर कधी फाके. ह्या अशा कामासाठी निवड चाचणी A/C खोलीत, पंखे, दिवे, कार्पेट सगळ्या सोयीनी युक्त कॉर्पोरेट ऑफिस मध्ये करायला हवी की काय?? मग पुन्हा 'ह्या नव्या पोलीसांच लईच नाजूक काम' म्हणून नाव ठेवायला पुळका गॅंग मोकळी.

आणि हो तेवढं त्या महिला पोलिसांना साडी नसू द्या , महिलेला साडीचा अधिकार नाकारणं म्हणजे काय? मंगळसूत्र तर सौभाग्याचे लक्षण, ते तर ती घालणारच... मग मंगळसूत्राला मॅचिंग कानातले नकोत का?? आणि साखरपुड्याची अंगठी, ती तर काढतच नसतात, अवलक्षण होत म्हणतात. सौभाग्यवती बाई आणि कुंकू नाही लावणार का?? लिस्टिक, पावडर, पायातले, श्रावणात हिरव्या बांगड्या तर परंपराच आहे आमची, ती कशी मोडणार?? ह्या सगळ्या जामानिम्यातून जमलंच तर त्या एखादं दुसरा चोर पकडतीलच की.... काय करणार महिला पोलीस असली म्हणून काय झालं बाईमाणूस आहे ना ती, तिलाही मन आहेच की.

सीमेवरच्या जवानांचे पण ट्रेनिंग च्या नावाखाली जे हाल आहेत. रोज सकाळी उठायचे काय, धावायचे काय, व्यायाम काय, कधी बंदूक चालावं, कधी तोफ चालवं, परेड तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. तारेखालन कोण सरपटत जात हो, साप आहोत का आपण सरपटायला? रोज एकच कपडे ,त्यांचं नसलं का मन होत 'पिवळी विजार आणि भगवा शर्ट घालायला. सैन्यात असली म्हणून काय झालं 'माणसचं आहेत हो ती' 'त्यांनाही मन असत'. ..इति पुळका गॅंग.

IAS / IPS ऑफिसर साठी UPSC/ MPSC चा अभ्यासक्रम पण थोडा सोप्पा करायला हवा. फार हाल होतात त्यांचे अभ्यास करून. आम्हाला 'ढ' अधिकारी चालतील पण ते तेवढं अभ्यासक्रमाच बघा जरा. आणि हो वर्गातल्या मागुन पहिल्या येणाऱ्या मुलांना पण डॉक्टर व्हावस वाटतच की, त्यांचंबी मन मोडू नका राव.... हवं तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना ते फुकटात तपासतील. त्यांची आजारपणातून एकदम कायमची 'सुटकाच' करून टाकतील. हाय काय अन नाय काय.

क्वालिटी क्वालिटी म्हणून कोण बोंबलला रे, कानाखाली जाळ काढू का??

डोसक्यात इचार चालुये 'चार(४)-पाच (५) अतिरेकी आणि तेवढेच गुंड, चोर, दरोडेखोर धाडावे का पाहुणचाराला पुळका गॅंग कडे??'
'पुळका गॅंग असली म्हणून काय झालं, माणसंच हायेत ती बी'

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#निर्लज्जपणाचाकळस

Thursday, July 2, 2020

सोय पहातो तो सोयरा ..

सोय पहातो
तो सोयरा ..

आज बोलता बोलता अचानक एका गृहस्थांची गाडी घसरली 'काँग्रेस चे सरकार असते तर इतका गोंधळ झालाच नसता'. काँग्रेसचेच सरकार आहे, सरकार मध्ये सेना, राष्ट्रवादी बरोबर काँग्रेस पण आहे हे जेव्हा लक्षात आणून दिले तेव्हा सारवासारवी करताना गाडी अचानक 'ही सगळी मोदींची चूक आहे' म्हणून केंद्रावर घसरली.

माझे अपयश झाकायला मी दुसऱ्याकडे बोट दाखवले की झाले, असे काहीसे झाले आहे सध्या लोकांचे. लोकांचे सोडाच पण सेनेच्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पण असेच काहीसे झाले आहे. इतके वर्ष भाजपा बरोबर खांद्याला खांदा लावून काम करायची इतकी सवय झाली होती आणि आता भाजपा त्यांच्या बरोबर नाहीये तर 'भाजपा वाले काही करत नाहीत' म्हणून चिडचिड करतात. त्यांच्या लक्षतच येत नाहीये की आता त्यांच्या बरोबर भाजपा नाही तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस असायला हवी आहे. ते दोन्ही मित्रपक्ष काही करत नाहीत, नुसते मजा पहातात ह्याचा राग विरोधी पक्षावर कसा काय काढता येईल??

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तर लक्षातच राहिले नाहीये बहुदा की आपण आता सत्तेत आहोत, विरोधी बाकावर नाही. ह्या इतक्या कठीण परिस्थितीत सेनेबरोबर पर्यायाने जनतेबरोबर उभे राहणे आपले नैतिक कर्तव्य आहे ह्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. ते दोघे अजूनही सेना विरोधात असल्यासारखे वागत आहेत. राष्ट्रवादीचे ठाण्यात एक आणि काँग्रेस चे संगमनेर मध्ये एक नेते सोडले तर बाकीचे सगळे नेते आणि कार्यकर्ते अचानक कुठे गायब झाले आहेत काही कळत नाही.

शक्यतो सगळ्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस च्या नेत्यांची मोठमोठी शैक्षणिक संकुले आहेत. काहींची वैद्यकीय महाविद्यालये आणि हॉस्पिटल ही आहेत. शिवाय हे दोन्ही पक्ष सम्पन्न आहेत. कोव्हिड सेंटर, धान्य वाटप केंद्र उभे करणे दोन्ही पक्षांनाही अवघड नाही. पण असे कुठे झालेले दिसत नाही. केंद्रात भाजपा ची तुम्ही मजा पहिली तर समजू शकतो पण राज्यात ?? इथे तर तुम्हीच सरकार आहात ना?? मग का नाही तुमचे नेते आणि कार्यकर्ते सेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर खांद्याला खांदा लावून लढताना दिसत?? मान्य, की सेने ला एकट्याला राज्यकारभाराचा अनुभव नाही. पण तुमच्याकडे तर एकापेक्षा एक धुरंधर धुरीण नेते आहेत, ज्यांचा प्रशासकीय अनुभव आणि हतोटी सर्वदूर प्रसिद्ध आहे. का नाही सेनेच्या बरोबरीने तुम्ही लढताना, निर्णय घेताना, घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी घेताना, घेतलेले निर्णय राबवताना दिसत??

मोदी सरकार कसे वाईट आहे, सेनेच्या नेत्यांनी कशी नीट कामे केली नाहीत हे सगळे बोलायला 2024 च्या निवडणूक रॅली मध्ये संधी मिळणार आहेच की. पण तेव्हा निवडणुकीत उभे राहायला नेते, त्यांच्या मागे फिरायला कार्यकर्ते आणि मत द्यायला मतदार जिवंत तर राहायला हवेत ना. 'कोरोना' आपली गमंत बघेल त्या आधी जबाबदारी ओळखा आणि उचला. अन्यथा जे काही जिवंत राहिलेले मतदार असतील ते 2019 पेक्षा वाईट मतांनी पृथ्वीवरील तुमचे अस्तित्व सम्पवतील. भविष्यात 'जिवंतपणी मरण म्हणजे काय' ह्याचे उदाहरण म्हणून तुमची मिसाल दिली जाईल.

सेनेचे 'सोयरे' आहात तर त्यांची 'सोय' पहा.. आयुष्यभर ज्यांच्या जीवावर राज्य केलेत त्या जनतेची वेळ सांभाळा. पेराल ते उगवते म्हणतात.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित