Tuesday, June 2, 2020

जागते रहो SSSSSS ...

जागते रहो SSSSSS ...

सध्या अचानक सगळ्यांना 'राजकीय जाग' आली आहे. ज्या लोकांना पूर्वी राजकारण समजत नव्हते किंवा आवडत नव्हते ते ही अचानक समाजमाध्यमांवर राजकीय लेख , त्यावर प्रतिक्रिया , इ प्रकारे व्यक्त होऊ लागले आहेत. फक्त हे अचानक आलेले राजकीय जागृतीचे वादळ 'चहाच्या पेल्यातील वादळ' ठरू नये आणि स्मशान वैराग्यासारखे कालांतराने विस्मरणात जाऊ नये हीच इच्छा.

राजकीय विचारधारेमध्ये मनसोक्त डुंबणाऱ्या जुन्या आणि नव्या दोन्हीही प्रकारच्या लोकांमध्ये काही ठळक वैशिष्ट्ये आवर्जून आढळतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे 'आम्ही कसे श्रेष्ठ, उत्तम, अचूक, वगैरे वगैरे सांगणारे. हे लोक नक्कीच परवडतात. ते कोणाच्या अधेमध्ये नाहीत, कोणाला नावे ठेवत नाहीत, कोणावर टीका टिप्पणी नाही. फक्त आम्ही कसे आणि किती योग्य व बरोबर वागतो इतकेच ते सांगत रहातात. त्यांचा फारसा काही कोणाला उपद्रवत असत नाही. पण निष्ठा ठाम, एका निरोपावर धाव घेणारे आणि अंगावर पडलेली जबाबदारी निष्ठेने पार पडणारा वर्ग.

दुसरा प्रकार 'आपल्यालाच कसे सगळे समजते' प्रकार. कोणत्याही पक्षाने काहीही लिहू देत, वागू देत, सांगू देत.... ह्या प्रकारातले लोक त्यांना उभे आडवे कापून काढणार. त्यात अपपरभाव नसतो. 'सब घोडे बारा टक्के' न्यायाने सगळ्यांवरच आसूड चालवणार. साधारण 'हम करे सो कायदा' विचारांचा, थोडा तिखट, जहरीला, ठसका लागण्याची शक्यता असणारा हा वर्ग.

 तिसरा प्रकार म्हणचे 'आम्हीच कसे योग्य, ते (समोरचा पक्ष) कसा चूक' प्रकारात मोडणारे. स्वतःच्या निष्ठा सांभाळताना दुसऱ्याच्या निष्ठांवर उभे आडवे घाव घालणारे. वरच्या फळीत 'युती' तुन 'आघाडी'त बदली झाली तरी ह्या कार्यकर्त्यांना काहीच फरक पडत नाही. समोरचा बदलला तरी चालेल पण समोर कोणीतरी आहे ना मग सोलून काढ त्याला, इतकेच त्यांचे काम. आपल्या निष्ठांबद्दल बोलताना त्यांना समोर मीत्र, नातेवाईक, शुभचिंतक काहीही दिसत नाहीत. राजकीय निष्ठांपायी स्वतःचे प्रचंड नुकसान करून घेणारा आणि बऱ्याच आप्तस्वकीयांना दुखावून जवळ जवळ एकटा पडलेला असा हा वर्ग.

सगळ्यात चांगला वर्ग म्हणजे शांत आणि सहनशील, प्रचंड निरुपद्रवी, गुपचूप आपल्याला आवडणाऱ्या चिन्हावर मोहोर उमटवीणारे संत-सज्जन मतदार. व्यक्त होतील तेही अगदी हळू आवाजात. समाजमाध्यमांवर येणाऱ्या लेखाला किंवा संदेशाला प्रतिक्रिया देतील ती पण फक्त 'आवडले/like' इतकीच. कोणाला नावे ठेवणे नाही, आपले मत तावातावाने मांडणे नाही. पण निवडणुकीचे वारे उलटे वाहवण्याची ताकद राखून असणारे. त्यांना त्यांच्या ताकदीची पूर्ण कल्पना असते. कधी कुठल्या राजकीय व्यक्तिमत्वासमोर दबून जाणार नाहीत, कधी आपले कुठले काम घेऊन त्यांच्याकडे जाणार नाहीत, राजकीय विषय आणि व्यक्तिमत्वे अनुल्लेखाने मारण्याची ताकद असलेला वर्ग.

सामाजिक आणि राजकीय बांधिलकीच्या जाणिवेच्या ह्या नव्या लाटेला ओहोटी मात्र लागू नये. उलटपक्षी ही लाट मतदानाच्या महासागरात रूपांतरित व्हावी. समाजीक आणि राजकीय आखाड्यात स्थित्यंतराचा मान ह्या महासागराला मिळावा. २०२१ हे भारतासाठी महासत्ता होण्याच्या शक्यतेचे वर्ष. त्या शक्यतेला सत्यात उतरविण्याची ताकद ह्या महालाटेत निर्माण व्हावी, हीच सदिच्छा.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment