Wednesday, March 17, 2021

कोणी उत्तर देता का उत्तर.. ह्या भरकटलेल्या बोर्डाच्या परिक्षार्थींच्या पालकांना ???

कोणी उत्तर देता का उत्तर..

ह्या भरकटलेल्या बोर्डाच्या परिक्षार्थींच्या पालकांना ???


केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC च्या परीक्षा ज्या पद्धतीने घेतल्या जातात तसे १०वी , १२वी च्या बोर्ड परीक्षांचे स्वरूप का असू नये? 

असे जर झाले, तर ऑनलाईन परीक्षा घेणे अवघड जाणार नाही.


 गावागावात इंटरनेट सेवा पोहोचवल्याचा दावा करणारे सरकारच आज ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आहे. काय हा विरोधाभास? गावच्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात संगणक आणि नेट दोन्ही असते, त्याचा वापर करावा असे का शिक्षकांना वाटत नाही? शिक्षकांच्या हातात स्मार्ट(?) फोन असतो, त्याचाही वापर करता येऊ शकतो, असा विचार करताना शिक्षक संघटना का दिसत नाहीत? 


जग बदलते आहे, जगबरोबर आपण बदलले पाहिजे वगैरे चर्चा करत असताना बदलाची संधी आपण का नाकारतो आहोत? कधी बदलणार आपण? काही राखीव मुहूर्त आहे का ह्या बदलांसाठी ? ही नवी पिढी आपल्या पिढीला हसते आहे. 'कसले तुम्ही लोक , साधे साधे निर्णय तुम्हाला पटापट घेता येत नाहीत?' 'तुम्हाला यंत्रणा राबवता येत नाही?' असे प्रश्न विचारते आहे. आपल्याकडे देण्यासाठी काय उत्तरे आहेत? 


शिक्षण ऑनलाईन दिले जाईल, दूरदर्शन चा वापर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी केला जाईल, इ गप्पा मारणारे सरकार परीक्षेच्या बाबत मात्र 'ऑनलाईन चा पर्याय सर्वसमावेशक नाही' असे म्हणते आहे. ह्याचा अर्थ असा की ऑनलाईन शिक्षण पण शक्य झालेले नाही.  ऑफलाईन शिक्षण तर बंदच होते. म्हणजेच तुम्ही मुलांना वर्षभर शिकवलेच नाहीत. जिथे शिक्षणच नाही, तिथे परीक्षा कशाची घेणार? मुलांना तुम्ही काही दिलेच नाहीत तर घेणार कसे काय? की सगळी मुले 'एकलव्य'आहेत असा काही समज झाला आहे तुमचा??


काल अजून एक हास्यास्पद बातमी आली 'सरकार तर्फे मुलांना प्रश्न संच दिले जातील'. ह्याचा अर्थ काय की 'मुलांनी तेवढेच प्रश्न पाठ करून यावे' किंवा 'मुलांना सर्व समावेश अभ्यास करावा लागू नये म्हणून थोडक्यात परीक्षेत येणारेच प्रश्न दिले आहेत, तेवढेच करा आणि मार्क मिळवा' पण परीक्षा द्या. घोकंपट्टी करणारे परीक्षार्थी बनवण्याचा कारखाना काढला आहे का आपण?


तुमच्या ज्ञानात भर पडो न पडो, तुम्ही परीक्षा द्यायचीच. तुम्हाला कोरोनाची लागण झाली तरी चालेल पण तुम्ही सगळ्यांनी गठ्याणे परीक्षा केंद्रावर यायचे आणि परीक्षा द्यायचीच. लग्नाला पन्नास (५०), मरणाला वीस (२०) बाकी इतर कारणाला शून्य (०) लोकांची उपस्थिती मंजूर करताना ज्या शाळेत पन्नास (५०) पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या आहे, त्या परीक्षा केंद्रावर पन्नास (५०) पन्नास (५०) च्या तुकड्यात परीक्षा घेतली जाणार आहे का ? की शिक्षणमंत्री मा.मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन पन्नास(५०) पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालकांची गर्दी परीक्षा केंद्रावर करणार ? शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तर अजून मोजले देखील नाही आहेत. 


पाड्यांवर राहणाऱ्या मुलांना  वर्षानुवर्षं शाळेत जाण्यासाठी कित्येक मैल कच्या रस्त्याने चालत जावे लागत असे, काही ठिकाणी आजही चालावे लागत असेल, तेव्हा नाही सरकारला 'असुविधांची' आठवण होत? सुविधा असोत नसोत, परीक्षा केंद्रावर मुले आणली जात होतीच ना? मग आताच ऑनलाईन परीक्षेसाठी 'सुविधांचा' विचार आला कुठून? का नाही ऑनलाईन परिक्षेकडे संधी म्हणून पाहिले जात? का नाही त्या निमित्ताने खेड्या पाड्यात संगणक आणि त्यासंबंधी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार होत? की मागची 'री' ओढण्यातच धन्यता आहे?


कोणीही विचारात न घेणारे सर्वसामान्य पालकांचे मत आणि काही प्रश्न -

*'ऑफलाईन परीक्षा' हा शिक्षक, शिक्षणसंस्था चालक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी ह्यांच्या आरोग्याशी केलेला एक खेळ असणार आहे. 

*न दिलेल्या शिक्षणाच्या बदल्यात 'प्रश्न संच' देण्याची सुपीक कल्पना हास्यास्पद आहे. 

*शिक्षण जर ऑनलाईन दिले जाऊ शकते तर परीक्षा का नाही ? 

* विद्यार्थी (परीक्षार्थी), शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ह्यांना आरोग्याचा प्रश्नच नाही आहे , असे सरकार ला वाटते आहे का? 

*मुलांना आयता बोर्डाचा पेपर (थोडक्यात उघडपणे कॉपी करायची अधिकृत परवानगी) देऊन , न दिलेल्या शिक्षणाच्या बदल्यात परीक्षा घेण्याच्या निर्णयात पालकांना समाविष्ट करून घेतले होते का? पालकांची ह्या चमत्कारिक निर्णयाला मान्यता होती का ? असेल तर त्या संबंधी माहिती कुठे उपलब्ध होऊ शकेल?

*मुलांना शिकवणे पालकांची जबाबदारी असेल तर शाळेची फी कोणत्या कारणाने भरून घेतलीत?

*मुलांची घरी तयारी करून घेण्याचे पालकांना काही औपचारिक शिक्षण दिले गेले होते का? 

*जर बोर्डाची प्रश्नपत्रिका 'प्रश्नसंच' नावाने उघडपणे सरकार आधीच देणार असेल तर परीक्षा केंद्रावर जाण्याच्या नाटकाची गरज काय? पेपर घरीच सोडवून परीक्षा केंद्राला मेल किंवा पोस्ट द्वारे का पाठवू शकत नाही ?

*जर पालक अभ्यास घेऊ शकतात तर परीक्षा का नाही?

*सरकार सांगते, 'घराबाहेर पडू नका, घरून काम करा'.. मान्य.

पण मग हा नियम शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लागू नाही का?

*की आमचे मा.मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे आणि मा. शिक्षण मंत्री वेगळ्या पक्षाचे असल्याने परस्पर विरोधी निर्णय घेतले जात आहेत ? पण बळी आमच्या मुलांचा जाणार आहे.


(काहीतरी तरी) कळावे, लोभ (?) असावा


- ऍड स्वाती दीक्षित


#boardexams2021 #exams2021 #शिक्षणमंत्री #parentteacher #school #EducationMinister #CMOMaharashtra #cmmaharashtra #parentteacher

Saturday, March 13, 2021

एक प्रचंड (शंकेखोर) मन

 हो .. मी एक स्त्री पण आधी एक व्यक्ती आहे

हो.. मी रडते पण मला कराटे शिकायला सुद्धा आवडतात

हो.. मी एक पालक, पण माझ्यात देखील एक मूल दडलेल आहे

हो...मी मुलांना शिकवते, वळण लावते पण त्यांच्याकडून शिकायला , समजून घ्यायलाही मला आवडते

हो... बरोबर काय चूक काय मी जाणते पण कधी हळूच खोडकरपणा मलाही करावासा वाटतोच की

हो.. मी एक वकील पण माझी देखील काही कैंफियत असु शकते

हो... मी शिकलेली पण बुद्धिबळ नव्याने शिकायला कुठली पायरी असते


का आपण काही नात्यांना, वयाला, शिक्षणाला एखाद्या चौकटीत बसवतो?? 

का नाही आपल्या आजूबाजूचे लोकं, चुकू देखील शकतात ही शक्यता स्वीकारत??

बहीण अशी, भाऊ तसा, आई-वडील, शिक्षक, नवरा, मित्र-मैत्रिणी सगळा नात्याने भरलेला आजूबाजूचा परिसर , तो असा म्हणजे असाच आणि तसा म्हणजे तसाच असावा हा अट्टाहास असतो आपला? 


कोशिंबिरीची चव अशीच, इडली गोलच, आमटी तशीच, भाजीत मसाला इतकाच, वरणात गूळ तितकाच , थालीपीठ भाजणीचच, पोळी घडीचीच, अमक्यात लसूणच, तमक्यात कांदाच , फलाण पातळ, बिस्ताण घट्टसर ... किती ह्या चौकटी.


घराचेही असेच ... दिवाणखाना सभ्य , स्वयंपाकघर महिलाराज , अंगण लेकुरवाळ, पुस्तकांची खोली धीरगंभीर ... एखादं दिवशी पुस्तकांच्या कपटाने मारल्या गप्पा, घातला धुडगूस तर कुठे बिघडते? दिवाणखान्याने लोळून बघितला सिनेमा तर काय होते? स्वयंपाक घर एखादवेळी पुरशी राकटपणा सहन करेल तर काय होईल? अंगणात तरुण पोर पत्त्यांचा डाव मांडतील तर काय बहर येईल?


सतत हे असं(च) आणि ते तस(च) चा अट्टाहास का ? चौकट मोडून बाहेर जाणं वाईटच हे कोणी ठरवलं? आणि हो, चौकट लांघली तर नाव ठेवणारा समाज नेमका कुठे राहतो? एखादं मूल जन्माला येणं किती आनंददायी ... मग मुलगी की मुलगा का विचारलं जात असावं? पालक, डॉक्टर, वकील, कलाकार उभयलिंगी मग नावामागे मिसेस किंवा श्रीमती लावण्याचा हट्ट का? जाती संपवा म्हणत असताना, जातीनिहाय मोर्चा काढण्याचे प्रयोजन काय? सायकल लहानपणीच चालवली पाहीजे, मोठेपणी काय सायकल ला गंज लागतो का??


- एक प्रचंड (शंकेखोर) मन 

( तीच पहिल्यापासून असंच आहे, सरळ काहीच हीला पटत नाही... चहाटळ कुठली)


#चहाटळ.कॉम

"सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" लोकमान्य टिळकांना दूरदृष्टी होती असे म्हणत..... इतकी ??

 "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ?" 

लोकमान्य टिळकांना दूरदृष्टी होती असे म्हणत..... इतकी ??


कोरोना चा उद्रेक होतो आहे असे आपल्याला वर्तमानपत्र, दूरदर्शन आणि समाजमध्यमांकडून कळते. त्यांना ह्या सगळ्या बातम्या आणि आकडेवारी सरकार पुरवते... म्हणजे पुरवत असावे.

ह्याचा अर्थ सरकार ला कोरोनाने घातलेल्या हैदोसाची कल्पना आहे असा घेऊ शकतो.


*तरीही १०वी व १२वी ची बोर्डाची परीक्षा घेणार म्हणजे घेणारच?*  


राज्य आणि केंद्र सरकारला माझा एक छोटासा प्रश्न आहे? तुमच्या मंत्रिमंडळातील १०वी तसेच १२ वी उत्तीर्ण असलेल्या किती मंत्र्यांना त्यांच्या १०वी व १२वी च्या गुणांचा उपयोग राजकारण, समाजकारण आणि काही व्यवसाय करण्यासाठी झाला ? ... होत आहे? 


माझे शाळांना विचारणे आहे 'खरच१०वी व १२वी च्या मुलांना वर्षभर शिकवले गेले? त्यांचे ज्ञान वाढवले गेले? जर 'नाही' असे उत्तर असेल तर परीक्षा का आणि कशाची घेणार ? केवळ उत्तरपत्रिका पंढऱ्याच्या काळ्या होणे इतके गरजेचे आहे? प्रगतीपुस्तकाचे रकाने भरणे महत्वाचे आहे? अन्यथा अकरावीच्या /प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी गुणांची यादी कशी जाहीर करणार असा काही पेच आहे ? की आम्हाला कशी बोर्डाची परीक्षा द्यावी लागली होती मग ह्या एका बॅचची सुटका कशाला ? मेलीत मुलं तर मरु देत पण परीक्षा होणार म्हणजे होणार, असा काही विचार आहे?


१०वी,१२वी च्या परीक्षाना बोर्ड असावे की नाही? मुलांनी अतिरिक्त ताण घेऊ नये, आत्महत्या करू नये? इंग्रजांची शैक्षणिक गुलामगिरी, शिक्षणाचा देशी नमुना (पॅटर्न), इ अनेक विषयांवर घसा फोडून अक्कल पाजळणारे सर्व बुद्धिजीवी आत्ता गप्प का आहेत? सर्व माध्यमे कोरोनाच्या बातमीने हमखास मिळणारा टि आर पी सोडून विद्यार्थ्यांच्या हिताच्या आणि आयुष्याशी निगडित विषयांवर मिठाची गुळणी घेऊन गप्प का आहेत? फी वाढी संदर्भात रस्त्यावर उतरणारे पालक मुलांच्या आरोग्य आणि आयुष्याशी खेळ करणाऱ्या ह्या बोर्ड परिक्षांबाबत मौन बाळगून का आहेत? एखादी दुःखद घटना घडल्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या विरोध पक्षांच्या (केंद्र आणि राज्यातील) कानावर बोर्ड परीक्षांची बातमी पडली नाही की काय? की काही अघटित घडण्याची ते वाट पहात आहेत ? की कोरोनाने तुम्हा सगळ्यांना वचन दिले आहे की बोर्डाची परीक्षा देणाऱ्यांच्या वाटी जाणार नाही म्हणून ?


त्रिवार धिक्कार बोर्डाची परीक्षा देण्यासाठी मुलांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पालकांचा, शिक्षण मंत्रालयाचा, सरकारचा, विरोधी पक्षाचा, मूडदाड मनाच्या समाजाचा आणि त्या समाजातील मक्ख बुद्धिजीवी धुरीणांचा, समाजातील प्रश्नांवर मौन बाळगणाऱ्या आणि अघटीत घटनेत टी आर पी शोधणाऱ्या माध्यमांचा, शिक्षण पद्धतीचा आणि असंवेदनशील बोर्ड व्यवस्थापनाचा.


- एक (बोर्डाची परीक्षा लादली गेलेल्या विद्यार्थिनीची) आई


#BoardExams2021 #boardexams #educationministry #media #parentteacher #school #exams2021 #Shivsena #bjpmaharashtr #rajthackeray #CongressParty #CongressMaharashtra #NCP #मुख्यमंत्री #शिक्षणमंत्री #varshagaikwad