Friday, September 25, 2020

पडू आजारी मौज हीच वाटे भारी..

 पडू आजारी

मौज हीच वाटे भारी..

पूर्वी फारसे कधी कोणी आजारी पडत नसत आणि कधी कोणाला काही झालेच तर भेटायला येणारा मित्र परिवार, संत्री-सफरचंद-बिस्किटांची भेट मज्जाच असे सगळी. त्यामुळे आजारीपणाचे जाम कौतुक वाटे. मी तशी आडदांड भक्कम दगड प्रकारात मोडत असल्याने माझी आणि आजारपणाची फारशी गाठभेट पडत नसे. त्यात जरा जरी अगदीच किरकोळ नुसतं सर्दीपडस जरी झालं की लगेच मी दवंडी पिटायला मोकळी 'चव्हाण काकू, मला बर नाही'. आई ने ह्यावर टोमणा मारावा 'काय हीला आजारपणाचा सोस'.

चव्हाण काकूंनी जोशी काकू शाळेतून आल्या आल्या वर्दी द्यावी 'दीप्ती ची आई, स्वातीला बर नाही'... जोशी काकू 'असं का, पायावर पाणी घेऊन जाऊन येते' म्हणावं. 'काय हो काकू, स्वातीला बर नाही म्हणे' इति जोशी काकू. 'काही नाही, सर्दी झालीये, तुम्हाला चव्हाण काकू बोलल्या वाटते', आईचा त्रासिक स्वर. 'अग बाई, काय पण ही स्वाती आणि काय त्या चव्हाण काकू', जोशी काकू.

तेवढ्या वेळात कामवाली का आली नाही म्हणून बघायला गेलेल्या चव्हाण काकू माझ्या आजारपणाची वार्ता रजू काकूंच्या कानावर पोहोचवतात. 'रजुताई, कळाले का, स्वातीला बरे नाही'. 'नाही हो, पोरी काही बोलल्या नाहीत'.'राणी ए राणी ... पोरी त्यांच्याच नादात, त्यांना कुठले भान' इती रजू काकू.

 तेवढ्यात चव्हाण काकूंना सविता मागच्या अंगणात दिसते 'सवी,अंग तुझी मैत्रीण आजारी आहे ना,गेली नाहीस का भेटायला?' पुकारा होतो. 'नाही हो काकू, जाते संध्याकाळी', सवी.

हातातलं काम सोडून रजू काकू बाहेरच्या रस्त्याने मागे आमच्या घराच्या कंपाउंडपाशी येऊन 'काय ग पुष्पा, काही बोलली नाहीस, स्वातीला बर नाही ते'. पुष्पा माझी आई. 'अंग, नुसती सर्दी आहे, तू पण काय ग रजू. पण तुझ्या पर्यंत बातमी आली कशी?' 'काय ग बाई, पोरी पण ना' म्हणत रजूकाकूंनी आईला हसून टाळी द्यावी.

जरा वेळाने वरूनच आंबेकर काकूंनी विचारावे, 'पुष्पा, कसे आहे ग स्वातीचे आता? रजू सांगत होती, बर नाही म्हणून'. 'तू काय ऐकते त्या रजू चे, सर्दी आहे नुसती.' पुष्पा उर्फ आई.

रजू काकू गेल्यावर पाठक काकू विचारणार ,'रजू काकू आल्यासारख्या वाटल्या , काय काम काढलं सकाळी सकाळी?' 'अहो कसलं काय, ह्या स्वातीला काही काम नाही' म्हणत आईने सगळी गोष्ट पाठक काकुना सांगावी. 'काय ग बाई' म्हणत काकूंनी खूप हसावे. 

तेवढ्यात जोशी काकांच्या हातून काकू काहीतरी पाठवणार, तोंडाला चव येईल, स्वातीला द्या. मग संध्याकाळी सविता भेटायला येताना काहीतरी घेऊन येणार ' म्हंटल भेटायला जायचंय तर घेऊन जावं. खाइल तरी गरम गरम', सविता.

वर्षानूवर्षं हे सगळे संवाद असेच बर का, काहीही बदल नाही. 

 चव्हाण काकू माझं हक्काचं ठिकाण. संध्याकाळी काकू हातातले काम संपवून मीठ-मोहऱ्या घेऊन माझी दृश्य काढायला घरी येणार त्या त्यांच्या ओट्यावर गप्पा मारायला आलेल्या द्रविड काकूंना घेऊनच 'चल, आवटी काकूंच्या इथे बसू, स्वातीची दृष्ट काढायचीये, तिला बर नाही'. आल्या आल्या आईला ऑर्डर सोडणार 'मुन्ना ची आई , गॅस वर तवा/कढई ठेवा स्वातीची दृष्ट काढते'. कॉलनीतल्या आणि ओळखीतल्या सगळ्यांचा उद्धार करत न लागलेली दृष्ट उतरवली जायची. तव्यावर तडतड नाचत कडवट वास घरभर फिरवून ती दृष्ट माझ लाडक आजारपण बरोबर घेऊनच जायची.

ठाण्याला आल्या आल्या पहिला मुक्काम ओमशिव सोसायटीत. कौतुक करणाऱ्यांची इथेही काही कमी नाही. म्हात्रे काका यायचे, पेपर वाचत वाचता लहान अद्वैतला खेळवायचे आणि 'तुला बर नाही ना, जेवून घे औषध घे तोवर मी आहे बाळा जवळ' प्रेमळ ऑर्डर सोडायचे. कामवाल्या मावशींकडून आजारपणाचे कळाले की तेजल च्या आजी पहिल्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर यायच्या, लिफ्ट चे दार उघडे ठेवूनच 'बाळाला दे माझ्याकडे, मी घेऊन जाते, 2 कपडे घाल पिशवीत' म्हणून घाई घाई अद्वैत बाळाला घेऊन जायच्या. तो खालीच जेवेल सांगता सांगता मला जेवण औषध आणि विश्रांती घ्यायचा कडक दम भरून जायच्या.

खाली मुलं खेळताना दिसली की 'किशोर, दीक्षित आंटी ला बर नाही, बाबू ला संध्याकाळी खाली फिरवायला तुझ्या बहिणींना सांग' निरोप परस्पर दिला जायचा. संध्याकाळी गुप्ता आंटीच्यामुली अद्वैत ला घेऊन वर यायच्या त्याला फ्रेश करून दिले की आंटीनि दिलेला डबा देऊन 'खा लेना' अद्वैत हमारे घर पे खायेगा, उसके लिये सिम्पल खिचडी दीदी बना रही है!' म्हणून जे घेऊन जायच्या ते त्याचे खाली खेळणे, खाणे उरकून डोळे मिटायला लागलेकीच परत घेऊन यायच्या. दुसऱ्या दिवशी खाली गेले की मानकर काका-काकू , राव आंटी, अनु , सेठी आंटी, सोनिया सगळ्यांनी तब्येतीची चौकशी करावी.

ब्राह्मण सोसायटीत तर माधुरीने खूपच काळजी घ्यावी, मुली शाळेतून आल्या की 'आधी भरभर खा आणि बाळाला सांभाळायला जा, मावशीला बर नाही'. सांगून मुलींना माझ्याकडे पिटाळावे, येताना हातात काहीतरी वाटीभर पाठवणारच, तोंडाची चव गेली असेल, खाऊन घे च्या प्रेमळ आग्रहासह. इथे 'बाळ' आर्या साठी. अद्वैत दादा तोपर्यंत मोठा झाला होता. दारातूनच कानडे काकूंनी विचारावे 'काय ग, माधुरी म्हणाली तुला बर नाही'. 'काय तुम्हा आजकालच्या मुलींना म्हणावं, संध्याकाळी खाली चालायला जात जा, काही आजारपण येत नाही' असा सज्जड दम भरत 'स्वयंपाकवाल्या बाई आल्या होत्या ना, की काही करायचे आहे' अशी प्रेमळ चौकशी पण करून जायच्या. जोशी काकांना कुणकुण लागली की 'दीक्षित बाई, काय झालं? आजारी पडलात?' विचारत यायचे. 2 कप दूध पीत जा रोज असा सल्लाही बरोबर असायचाच.

संध्याकाळी ममताचा फोन यायचा 'काय ग, अद्वैत बोलला आत्ता, बर नाही म्हणून, फोन तर करायचास, काही पाठवलं असत, दुपारी जेवलीस का,औषध घेतले का,काकांकडे जाऊन आलीस का' चौकशीचा पाऊस पडायचा. (काका म्हणजे डॉक्टर काका) 'अद्वैत आता इथेच रोहन-रोहित बरोबर जेवेल, तुला काही पाठवायचे आहे का?' च्या प्रेमळ विचारपुसीनेच फोन बंद व्हायचा.

रहेजा मध्ये असताना डेंग्यूला माझा पत्ता सापडला. आई मावशी 15 दिवस राहून परत जाणार होत्या हे ज्योती कोटक ला माहीत होते. बरोबर आर्या शाळेतून यायच्या वेळेस तिने डबा घेऊन यावे. 'मुझे पता है ये आर्या का स्कुल से आने का टाइम है! आज आंटी भी जानेवाले थे तो आर्या के लिये नूडल्स बनाके लाई हू!' इतक्यात आर्या आलीच , तिला हातपाय धुवायला लावून डबा खाऊन घे सांगून 'स्वाती, कुछ भी हेल्प लगे तो फोन करना' चा मनमोकळा आग्रह करूनच ती घरी गेली.  ह्या दरम्यानच माझ्या आयुष्यात माझी लाईफ लाईन आली. माझ्या खूप छान दृष्ट लागाव्या अशा मैत्रिणी 'हेमा, मंजू, प्राची आणि शिल्पा'. शारीरिक ,मानसिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबीक सगळ्या प्रकारची आजारपणं ह्या चौघीनी अक्षरशः झेलून धरली. एकाही प्रसंगात 'तुझे तू बघ' किंवा 'काय हीच नेहमीचंच' असा सूर नाही. कधी प्रेमळ समजूत तर कधी सज्जड दम भरत माझी गाडी कधी ट्रॅक वरून उतरू दिली नाही. 

काय नाते आहे माझे ह्या सगळ्यांशी ?? बर, मी काही खूप प्रेमळ, सहज फोन करून चौकशी करणारी किंवा आठवण आली म्हणून गप्पा मारायला जाणारी व्यक्ती नाही. तुरटी तरी जरा बरी इतकी मी तुरट. माझ्याच व्यापात मग्न, कोणाच्या वेळेला धावून जाइल, त्यांचेही प्रसंग साजरे करेल असे काही नाही. तरीही ह्या सगळ्यांनी माझ्यावर अथांग प्रेम केले. ह्यातील काही नावे त्यांच्या शेवटच्या प्रवासाला मार्गस्थ झाली आहेत पण जाण्यापूर्वी माझी अनुभवांची ओटी पुरेपूर भरूनच. कधी प्रसंग नाही आला किंवा अगत्याने त्यांच्या प्रेमाचा उल्लेख करावा असे न वाटल्याने असेल किंवा आपल्या जवळची लोकंही कधी जाऊ शकतील असा विचार मनाला शिवातच नसतो त्यामुळेही असेल बऱ्याच जणांशी बोलायचे राहूनच गेले. 

आहो, धन्यवाद म्हणायचे काय सुचवताय, हे सगळे माझी फक्त आजारपणातच काळजी घेतात. एरवी मला बुकलून काढण्याचा पुरेपूर हक्क आहे त्यांना. वर गेलेले देखील खाली येतील परत हक्काने रागवायला. असो.. हे सगळं आज आठवण्याचे कारण काल एक एका ओळीचा मेसेज पाठवला होता 'उद्या ऑफिसला येणार नाही, तब्येत बरी नाही'. सकाळीच वैद्य सरांचा फोन, 'राहुल ला पाठवतो आहे, आई ने डबा दिला आहे'. ह्या वैद्य काकू आणि कुटुंबीय म्हणजे मला लागलेली बम्पर लॉटरीच.

कळावे, लोभ असावा.

ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Tuesday, September 22, 2020

भित्या पाठी, ब्राह्मराक्षस...

 भित्या पाठी

ब्राह्मराक्षस...


लहर दहलीज़ पर आई है जब से

समुंदर ख़ौफ़ खाने लग गया है- पूनम यादव


भीती ते भक्ती सगळ्याच भावना निव्वळ कल्पना.

जसा देव कोणी पहिला नाही तसे भूत तरी कुठे पाहिले आहे? जसे काहींना देवाचे अस्तित्व जाणवते, तसेच नानाविध भुते डोक्यावर बसलेली किंवा नाचलेली अनेकांनी अनुभवली मात्र नक्कीच असतील. मोह, माया, मत्सर, ईर्षा, महत्वाकांक्षा, आनंद, दुःख, राग, काम(कार्य:बोली भाषेत work),इ भुताची कितीतरी रूपे. कोणत्या रुपात ती तुमच्या मनाचा ताबा घेतील काही सांगता येत नाही. भूत कोणतेही असो, भीती त्याचा पाठलाग करत मागेमागे येतेच. 


बरेचदा प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसे आपण वेळोवेळीं वेगवेगळ्या भावनांना व्यक्त होत असतो. त्यात खरेपणा किती आणि सवयीचा परिणाम किती समजून सुद्धा येत नाही. एखाद्याचे 'कर्तृत्व', 'यश' ऐकताना सहजच 'आरे व्वा, अभिनंदन' असे उद्गार सहजच निघून जातात. कदाचित त्यावेळी मन आक्रांदत असेल 'अरेरे, हे तर  मला मिळायला हवे होते' किंवा 'माझ्या प्रयत्नांना हे यश का नाही मिळाले', इ. ह्या व्यक्त होण्यात खरेपणा असेल. पण तसे होताना दिसत मात्र नाही. फक्त एखाद्याच्या दुःखात आनंदी होणारे मात्र जळी स्थळी काष्ठी पाषाणी बघायला मिळतात.


अभिनय किंवा शास्त्रीय नृत्य शिकत असताना अगदी सुरवातीलाच एक पायरी हमखास ओलांडावी लागते, 'रस' चे प्रकार किती आणि कोणते? श्रृंगार, हास्य, रौद्र, करुण, वीर, अद्भुत, वीभत्स, भयानक, शांत, वात्सल्य, भक्ती आणि भय रस. एकेका विद्यार्थ्याला एकेक प्रकार करून दाखवावा लागतोच लागतो. नशिबाचा भाग की निव्वळ योगायोग परंतु एखाद्या निडर मनोवृत्तीच्या व्यक्तीला 'भय रस' करून दाखवावा लागणे आणि तेही प्रत्येक वेळी... हा निव्वळ योगायोग की भविष्या बद्दल काही सूचक संकेत? एखादा प्रसंग व्यक्तीच्या मनात भीतीचे घर बांधतो आणि त्या निडर व्यक्तीच्या मनाचे बुरुज धाड धाड कोसळू लागतात.

इक ख़ौफ़ सा दरख़्तों पे तारी था रात-भर 

पत्ते लरज़ रहे थे हवा के बग़ैर भी - फ़ुज़ैल जाफ़री

आणि मग मनाची अशी काहीशी अवस्था लहानसहान प्रसंगात देखील  होऊ लागते. चवीला 'तुरट' असणारी ही भीती मग अधून मधून निमित्ता निमित्ताने डोके वर काढायला लागते.


भावनेलाही चव असू शकते ?? का नाही, आनंदाची-प्रेमाची चव गोड, दुःख कायमच कडू, ईर्षा बहुदा आंबट आणि खारटपणा राग किंवा द्वेषाच्या नशिबी असावा. सगळ्याच भावना त्या त्या वेळी जगून सोडून देता आल्या पाहिजे होत्या. त्यांच्या बरोबर आयुष्याचा प्रवास करू नये. म्हणजे प्रत्येकवेळी नव्या अनुभूतीची मजा नव्याने चाखता आली असती. पण असे होत नाही. एक विचार मांडणे, वाचणे, चर्चा करणे नेहमीच सोप्पे ... त्या प्रमाणे जगणे मात्र अशक्यप्राय. ह्यातूच 'कळत पण वळत नाही' ही म्हण जन्माला आली असावी.


आग कितनी ही ख़ौफ़नाक सही

उस की लपटों की उम्र थोड़ी है- वसीम बरेलवी

हे ही अगदी बरोबर... सुख कायमस्वरूपी मुक्कामी येत नाही तसे दुःखही नाही. आनंदाचे क्षण येतात आणि जातात. तसेच दुःखाचे, अडचणींचे, अपयशाचे आणि भीतीचेही जातीलच की. 'बदल' ही एकमेव गोष्ट 'चिरंतन' आहे. मग ह्या बदलांची सवय का होत नसावी? सगळं सगळं कळतं फक्त वळायची वेळ काही अजून येत नाही.


कळावे, लोभ असावा.


 ॲड. स्वाती आवटी दीक्षित

Friday, September 4, 2020

ग कोणीतरी येणार येणार ग , कोरोना घरी येणार येणार ग

 ग कोणीतरी येणार येणार ग

कोरोना घरी येणार येणार ग


येणार ?? बहुदा आला सुद्धा .... धडकी भरण्याइतका मनातून विचारात उतरला पण. 


आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळ जवळ ४ महिन्यांनी मुंबई कोर्टात जाण्याचा योग आला. मास्क लावून तळमजला ते तिसरा मजला पळापळीत जाम दमछाक झाली पण काम करण्याची मज्जा काही औरच. जाता येताना ओळखीचे ट्राफिक, खड्डे, टॅक्सी आणि मधेच घुसणारे रिक्षावाले भेटले. ओला-उबेर मात्र पटलावर गैरहजर असाव्यात. आयुष्य पूर्वपदावर आल्याचा भास झाला.


परंतु घर जसजसे जवळ यायला लागले, कोर्टात बिनामास्क फिरणारे, मास्क खाली करून बोलणारे,इ सर्व चेहेऱ्यांनी मनात फेर धरून भीतीचा भोंडला खेळायला सुरवात केली. त्याक्षणी काम बाजूला ठेवून त्या लोकांना आपण का नाही हटकले, असा पश्चात्ताप मन खाऊ लागला. आणि अचानक आपल्या अंगाखांद्यावर कोरोनाची बाळे मनसोक्त बागडतायेत असे भास होऊ लागले.


घरी पोहोचल्यावर इमारतीच्या दारातच सुरक्षा रक्षकाने 'मॅडम, तुमचे सामान आले आहे' चा पुकारा केला. 'रेहेने दो, मेरे हाथ मे बोहोत कोरोना है, बादमे लेके जाती हूं'. आपण काय बोललो आहे हे त्याच्या चेहेऱ्यावर वाचल्यावर हळूच तिथून निसटले. घरात पाय , दारात पाय लेकीला ओरडून सांगितले 'खूप कोरोना आला आहे, पटकन गिझर चालू कर'. 'लांब रहा, लांब रहा .. कोरोना आला आहे भरपूर'. 'सामान UV लाईट मध्ये ठेव, कोरोना घरात फिरेल'... वेड्या व्यक्तीकडे पाहावे तशी नजर माझ्याकडे टाकून तिने पूर्णपणे दुर्लक्ष करून परत पुस्तकात डोके खुपसले.


कोरोनाच्या मुलाबाळांचा समूळ नायनाट करून झाल्यावर घशाला जाम कोरड पडल्याचा साक्षात्कार झाला पण 'कोरोना दातात असेल तर' विचाराने पाण्यावरची वासनाच उडवली. ब्रश, पेस्ट आणि दात ह्यांची लढाई संपवून पाण्याच्या पेल्याकडे आधाशा सारखे धावले आणि 'कोरोना घशात असेल तर' ... फटाफट मोठ्या गॅस वर पाणी उकळवले, घसा आणि नाकातले कोरोना मारण्यासाठी भरपूर वाफाऱ्याचा फवारा मारला आणि पाण्याकडे मोर्चा वळवला. पण पाणी पिताना कोरोनाची बाळे माझ्या पोटात घसरगुंडी खेळतायेत असे वाटू लागले,  जेवताना प्रत्येक घासाला दाताखाली खड्यांच्या ऐवजी कोरोना येऊ लागला. श्वास घेताना कोरोना पळत पळत धाव घेतोय असा भास होऊ लागला. जळी स्थळी काष्ठी पाषाणी कोरोना दिसू लागला. 


माझ्या अवस्थेवर देवघरातले आघाडी सरकार खोखो हसू लागले. हो, आमच्या देवघरात उत्तरेतील वैष्णवदेवी ते दक्षिणेतील बालाजी व्हाया महाराष्ट्रातील सर्व कुलदैवते, संत , महंत आनंदाने आणि एकोप्याने आघाडीचे राज्य चालवतात. त्यांच्याकडे श्रीयुत बाळासाहेब थोरातांसारखा नेता नसल्यामूळे असेल, 'आमच्यावर अन्याय झाला, आमच्याकडे दुर्लक्ष झाले, वगैरे' अशी काही तक्रार आमच्या कधी कानावर आली नाही. (माफ करा बाळासाहेब पण माझे आजोळ संगमनेरचे असल्याने तुम्हाला मामा बनवण्याचा मला जन्मतः हक्क आहे.)


'कोरोनाला तू बघितले आहेस?, कोरोना डोळ्यांनी दिसतो?' देवांचा प्रश्न. 'मग काय फक्त आभासी भीतीने येवढी धावाधाव करवलीस?'

'मग आमच्या बाबतीत तुमच्या पूर्वजांनी तरी दुसरे काय केले होते?' कोणी वाईट वागू नये, चांगलेच वागावे म्हणून 'देव बघतोय' चा धाक निर्माण केला. जसा तो धाक कमी झाला तशी वाईट प्रवृत्ती बळावली. आता त्याचे दुष्परिणाम समोर येऊ लागले तर कोणी देवदूत पुन्हा जन्म घेईल आणि वाईट प्रवृत्तींचा नायनाट करेल अशी स्वप्न तुम्हाला पडू लागली. आता हेच बघ ना, सध्या जगात दोन (२) प्रकारचे लोक आहेत. 'काही होत नाही कोरोना'म्हणणारे आणि कोरोनाच्या भीतीने संपूर्ण काळजी घेणारे. काळजी घेणारे आस्तिक आहेत असे जरा वेळ मानुयात. ह्या लोकांमुळे समाजाचे आरोग्य थोडक्यात मानसिक स्वास्थ्य टिकून राहते. आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांमुळे अनारोग्य, गुन्हेगारी, इ दुष्टप्रवृत्तीना खतपाणी मिळते. मग कोणती प्रवृत्ती चांगली ?? विश्वास ठेवणारी आणि समाजाला सुदृढ करणारी की अविश्वासाने समाजात असंतोष पसरवणारी??..... उत्तर ज्याचे त्याचे. 


चला, कोरोनाला तेल लावायची वेळ झाली, आता थांबले पाहिजे.

माफ करा, 'डोक्याला' असे म्हणायचे होते.


कळावे, लोभ असावा


- ॲड. स्वाती आवटी दीक्षित