Saturday, August 8, 2020

सर सलामत... तो पगड़ी पचास

 सर सलामत...

तो पगड़ी पचास


"पहिल्या टप्प्यात दहावी (१०वी), बारावी (१२वी) चे वर्ग सुरू करण्याचा विचार आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकारांनी अंतिम निर्णय घ्यायचा आहे"- वर्तमानपत्र.


१०वी आणि १२वी ची मुलं काय गिनीपिग आहेत का?? शाळा सुरू केल्यावर न मरता किंवा मरण्याचे प्रमाण कमी असेल तर इतर मुलांचे पण बळी द्यायला हरकत नाही किंवा त्याबद्दल विचार करू वगैरे असा काही विचार आहे का शासनाचा?? असे ऐकले आहे की सध्या कोरोना महामारीच्या भीतीने मंत्रालय पूर्ण क्षमतेने काम करत नाही. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर तर शुकशुकाटच असतो. नेते जर जनतेच्या काळजीपोटी सावध पवित्र घेत असतील तर शाळकरी मुलांचा बळी देण्याची इतकी घाई का?? 


खरे तर मंत्रालय, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, न्यायव्यवस्था पूर्ण क्षमतेने काम करत नसल्यामुळे नागरीक हवालदील झाले आहेत. सामान्य नागरिकांचे अनेकविध प्रश्न आणि समस्या अनुत्तरित राहून महत्वाचे विषय अडकून पडले आहेत. असे असतानाही केवळ सावधगिरीच्या उपाययोजना अंतर्गत वरील सर्व कार्यालयांसाठी नियम-नियमावली बनवली जाते. त्यात सरकारी नोकर आणि नागरिक सर्वांच्याच आरोग्याचा विचार केला जातो. मग तोच नियम आमच्या मुलांसाठी का नाही?? 


खरे तर शाळा दिवाळी पर्यंत सुरू झाल्याच नाहीत तरीही काहीही बिघडणार नाही. जो आणि जितका अभ्यासक्रम मुलांना शिकवला जातो तो केवळ तीन (३) महिन्यात पूर्ण शिकवून होऊ शकतो. पुण्यात SSY च्या शाळेत जाऊन खात्री करून घ्यावी हवे तर. एरवी इतर अभ्यासेतर उपक्रम, खेळ, सहल, नानावीध सुट्या ह्यासाठी जो वेळ द्यावा लागतो तो यंदा न देता शेवटचे तीन महिने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेता येऊ शकते आणि शैक्षणिक वर्ष वाचवले जाऊ शकते. खरे तर मुलांचे आरोग्य आणि जीवन त्यांच्या एका (१) शैक्षणिक वर्षापेक्षा नक्कीच जास्त महत्वाचे आहे.


*असे असताना दहावी(१०वी)-बारावी(१२वी)च्या मुलांचे बळी का?*


आधी मंत्रालय, सगळी शासकीय-निम शासकीय कार्यालये, न्यायालय, पोस्ट, इ सर्व नागरिकांना सेवा, सुविधा व न्याय देणाऱ्या व्यवस्था, दुकाने, व्यवसाय, व्यापार पूर्ण क्षमतेने सुरू करा. त्यातून जगलो वाचलो तर मुलांच्या शैक्षणिक वर्षाचा विचार करता येईल.


कळावे, लोभ असावा.


- ॲड. स्वाती आवटी दीक्षित


#शिक्षणमंत्रालय #शिवसेना #भाजपा #राष्ट्रवादी #काँग्रेस

कोरोनाची लेखरं..

 कोरोनाची लेखरं..


1. मुलीची मैत्रीण अचानक भेटली, 'शाळा नाही तर मज्जा आहे ना?' विचारले तशी नाराज होऊन उत्तरली 'नाही ना काकू, पूर्वी बाबा ऑफिस ला जायचे तर आई आणि आम्ही भावंडं खूप मज्जा करायचो.आता बाबा सारखेच घरी, चार महिने झाले अम्ही हासलोच नाही'.


2. नेहमीच्या कारपेंटर चा फोन आला 'मै वापस आ गया हू, कोई काम हो तो बताना'. आणि मन विचारते झाले, 'लॉक डाऊन सुरू झाल्यावर साधारण पहिल्या चवदा (१४) पंधरा (१५) दिवसातच काम नाही हाल होतात म्हणत महाराष्ट्राच्या नावाने बोटे मोडत सरकारच्या आणि सोनू च्या मेहेरबानिवर फुकट गावी गेलेले लोक, चार (४) महिने हाताला काम नसताना परत येणाऱ्या गाडीचे तिकीट स्वतः काढून कसे परतले? ते ही दुष्ट महाराष्ट्रात??'


3. मोदी सर म्हणाले, लॉक डाऊन मध्ये कोणाला कामावरून काढू नका, त्यांना पगार न कापता पोहोचता करा. सगळ्यांनी त्यांचे म्हणणे मान्य केले. एक दिवस मैत्रिणीचा फोन आला ' ती तुझ्याकडे काम करणारी मुलगी आहे ना, तिने आमच्या सोसायटी समोर भाजीची गाडी टाकली आहे. धो धो चालते. चिक्कार गर्दी असते तिच्याकडे. घर कामापेक्षा ह्याच्यात जास्त पैसे आहेत सांगत होती, आता हेच काम करेल म्हणाली' ... 'काय सांगतेस?, कालच खूप रडत होती, फार हाल आहेत म्हणाली म्हणून पुढच्या दोन (२) महिन्यांच्या पण पगार आगाऊ देऊन टाकला मी तिला'.


4.'आरे दादा, तू तुझ्या ड्रायव्हर ला काढून टाकलेस का?' 'नाही रे, अशावेळेस कोण काढेल रे, घरात एकटा कामावणारा तो, बरोब्बर एक (१) तारखेला सगळा पगार देतो त्याला. घरात थोडी काटकसर करतो पण कामवाल्यांचा पगार आधी द्यायचा असे आम्ही दोघांनी ठरवलं आहे.'

'आरे, पण त्याने माझ्या कुरिअर कंपनीशी एक(१) वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट केले आहे. पूर्वीची नोकरी सोडली, असे सांगितले. आज त्याचा दुसरा पगार झाला'.


- स्वाती आवटी दीक्षित

शाळाश्रम ते निवृत्ताश्रम व्हाया गृहस्थाश्रम ..

शाळाश्रम ते निवृत्ताश्रम

व्हाया गृहस्थाश्रम ..


 जन्म घेऊन ह्या भूतलाला पहिला पदस्पर्श केला जातो तो शिवाजी राजे, लोकमान्य टिळक, वीर सावरकर .. कमीत कमीत देशाचा पंतप्रधान तरी व्हावे असें ठरवूनच. परंतु ...
परंतु अनेकविध आश्रमाच्या योनीतुन मार्गक्रमण करता करता सगळे विचार, सगळी स्वप्ने, सगळे मनोधैर्य मार्गात कुठे हरवून जाते कळतच नाही. पालक नावाच्या शिस्तप्रिय जेलर च्या ताब्यात देऊन देव अंतर्धान पावतात. मग तुमची इच्छा असो वा नसो 'हात धरून' शाळेचा रस्ता तुडवावाच लागतो, आवड असो वा नसो बोबड्या बोलांच्या साथीने अभ्यास करावाच लागतो. पडत, धडपडत, चाचपडत, कंटाळत, उठत, बसत, कधीतरी आनंदत, थोडेसे हसत , भरपूर रडत कधी एकदा ह्या आश्रमातून सुटका होते ह्याची वाट पाहत एक एक पायरी पुढे जात असतो. शाळाश्रम किती योग्य संज्ञा आहे 'शाळा + श्रम = शाळाश्रम'

शाळाश्रमातून सुटका होते आणि कॉलेजाश्रमात पावले अलगद पडायला लागतात. हळूच दोन पंख फुटतात. चहूकडे हिरवळ फुलते, झाडे-पाने-फुले-रस्ते सगळे अचानक देखणे दिसू लागतात, गाऊ लागतात, बागडू लागतात. आता कुठल्याही क्षणी पंख पसरवून उडायचे ...बस्स. आणि जगण्याचा मनमुराद आनंद घ्यायचा. मनाला हवे ते आणि तसेच वागायचे. स्वच्छंदी आयुष्य जगायचे. सगळी स्वप्न पूर्ण करायची पण....
पण पालक , कॉलेजाश्रमातला शिक्षक वर्ग आणि अभ्यास तुमच्या पायांना घट्ट जमिनीत रोवून ठेवतात. कितीही पंख पसरा, उडता येतच नाही. पुन्हा घर, कॉलेज, अभ्यास आणि तुम्ही ... जीवन चक्र चालूच आहे.

कॉलेजाश्रमातले रंगीत जग मागे टाकून तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश करतात आणि .......  
दुःखात सुख, वाळवंटात 'मृगजळ' मिळावे तसे तुम्हाला तुमची वाटणारी मुलं मिळतात. आणि थोडकाळ 'आपले कोणीतरी आहे' चा आनंद देऊन जातात. वाळवंटातला साथी उंट. एरवी उंटाशी कोण मैत्री करे? पण संसार रुपी वाळवंटात साथीदार रुपी उंट आणि मृगजलासम आपली भासणारी मुलं ह्यांच्या सोबतीने गृहस्थाश्रमाचा भवसागर मजल दर मजल करीत पार करावाच लागतो. 

सगळ्या जबाबदाऱ्या, विवंचना, कष्ट, ताण, विचार आणि धावपळ सगळे सगळे मागे सोडून मोरपिशी मनाने आणि मोकळ्या विचारांनी पाहिले पाऊल पडते 'निवृत्ताश्रमा'मध्ये. आता बास खूप झाले , खूप केले, आता धावपळ बंद. आता फक्त स्वतःसाठी जगायचे, स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचे. आवडी-नावडी, छंद , आनंद आणि हक्काची विश्रांती. आणि ....
हळूच मृगजळ हातून निसटून जाते. नव्हे ते तेथे नसतेच , असतो तो फक्त अस्तित्वाचा, अपलेपणाचा भास... जाता जाता ओंजळीत सोडून जातात वाळवंटातले दोन वाळूचे कण. तुमची इच्छा असो वा नसो 'हात धरून' शाळेचा रस्ता तुडवावाच लागतो, आवड असो वा नसो बोबड्या बोलांच्या साथीने अभ्यास करावाच लागतो. पडत, धडपडत, चाचपडत, कंटाळत, उठत, बसत, कधीतरी आनंदत, थोडेसे हसत , भरपूर रडत कधी एकदा ह्या आश्रमातून कायमची सुटका होते ह्याची वाट पाहत एक एक पायरी  आयुष्य पुढे जात रहाते. निवृत्ताश्रम किती योग्य संज्ञा आहे 'निवृत्ती + श्रम = निवृत्ताश्रम'

कळावे, लोभ असावा.

- स्वाती आवटी दीक्षित