Friday, September 25, 2020

पडू आजारी मौज हीच वाटे भारी..

 पडू आजारी

मौज हीच वाटे भारी..

पूर्वी फारसे कधी कोणी आजारी पडत नसत आणि कधी कोणाला काही झालेच तर भेटायला येणारा मित्र परिवार, संत्री-सफरचंद-बिस्किटांची भेट मज्जाच असे सगळी. त्यामुळे आजारीपणाचे जाम कौतुक वाटे. मी तशी आडदांड भक्कम दगड प्रकारात मोडत असल्याने माझी आणि आजारपणाची फारशी गाठभेट पडत नसे. त्यात जरा जरी अगदीच किरकोळ नुसतं सर्दीपडस जरी झालं की लगेच मी दवंडी पिटायला मोकळी 'चव्हाण काकू, मला बर नाही'. आई ने ह्यावर टोमणा मारावा 'काय हीला आजारपणाचा सोस'.

चव्हाण काकूंनी जोशी काकू शाळेतून आल्या आल्या वर्दी द्यावी 'दीप्ती ची आई, स्वातीला बर नाही'... जोशी काकू 'असं का, पायावर पाणी घेऊन जाऊन येते' म्हणावं. 'काय हो काकू, स्वातीला बर नाही म्हणे' इति जोशी काकू. 'काही नाही, सर्दी झालीये, तुम्हाला चव्हाण काकू बोलल्या वाटते', आईचा त्रासिक स्वर. 'अग बाई, काय पण ही स्वाती आणि काय त्या चव्हाण काकू', जोशी काकू.

तेवढ्या वेळात कामवाली का आली नाही म्हणून बघायला गेलेल्या चव्हाण काकू माझ्या आजारपणाची वार्ता रजू काकूंच्या कानावर पोहोचवतात. 'रजुताई, कळाले का, स्वातीला बरे नाही'. 'नाही हो, पोरी काही बोलल्या नाहीत'.'राणी ए राणी ... पोरी त्यांच्याच नादात, त्यांना कुठले भान' इती रजू काकू.

 तेवढ्यात चव्हाण काकूंना सविता मागच्या अंगणात दिसते 'सवी,अंग तुझी मैत्रीण आजारी आहे ना,गेली नाहीस का भेटायला?' पुकारा होतो. 'नाही हो काकू, जाते संध्याकाळी', सवी.

हातातलं काम सोडून रजू काकू बाहेरच्या रस्त्याने मागे आमच्या घराच्या कंपाउंडपाशी येऊन 'काय ग पुष्पा, काही बोलली नाहीस, स्वातीला बर नाही ते'. पुष्पा माझी आई. 'अंग, नुसती सर्दी आहे, तू पण काय ग रजू. पण तुझ्या पर्यंत बातमी आली कशी?' 'काय ग बाई, पोरी पण ना' म्हणत रजूकाकूंनी आईला हसून टाळी द्यावी.

जरा वेळाने वरूनच आंबेकर काकूंनी विचारावे, 'पुष्पा, कसे आहे ग स्वातीचे आता? रजू सांगत होती, बर नाही म्हणून'. 'तू काय ऐकते त्या रजू चे, सर्दी आहे नुसती.' पुष्पा उर्फ आई.

रजू काकू गेल्यावर पाठक काकू विचारणार ,'रजू काकू आल्यासारख्या वाटल्या , काय काम काढलं सकाळी सकाळी?' 'अहो कसलं काय, ह्या स्वातीला काही काम नाही' म्हणत आईने सगळी गोष्ट पाठक काकुना सांगावी. 'काय ग बाई' म्हणत काकूंनी खूप हसावे. 

तेवढ्यात जोशी काकांच्या हातून काकू काहीतरी पाठवणार, तोंडाला चव येईल, स्वातीला द्या. मग संध्याकाळी सविता भेटायला येताना काहीतरी घेऊन येणार ' म्हंटल भेटायला जायचंय तर घेऊन जावं. खाइल तरी गरम गरम', सविता.

वर्षानूवर्षं हे सगळे संवाद असेच बर का, काहीही बदल नाही. 

 चव्हाण काकू माझं हक्काचं ठिकाण. संध्याकाळी काकू हातातले काम संपवून मीठ-मोहऱ्या घेऊन माझी दृश्य काढायला घरी येणार त्या त्यांच्या ओट्यावर गप्पा मारायला आलेल्या द्रविड काकूंना घेऊनच 'चल, आवटी काकूंच्या इथे बसू, स्वातीची दृष्ट काढायचीये, तिला बर नाही'. आल्या आल्या आईला ऑर्डर सोडणार 'मुन्ना ची आई , गॅस वर तवा/कढई ठेवा स्वातीची दृष्ट काढते'. कॉलनीतल्या आणि ओळखीतल्या सगळ्यांचा उद्धार करत न लागलेली दृष्ट उतरवली जायची. तव्यावर तडतड नाचत कडवट वास घरभर फिरवून ती दृष्ट माझ लाडक आजारपण बरोबर घेऊनच जायची.

ठाण्याला आल्या आल्या पहिला मुक्काम ओमशिव सोसायटीत. कौतुक करणाऱ्यांची इथेही काही कमी नाही. म्हात्रे काका यायचे, पेपर वाचत वाचता लहान अद्वैतला खेळवायचे आणि 'तुला बर नाही ना, जेवून घे औषध घे तोवर मी आहे बाळा जवळ' प्रेमळ ऑर्डर सोडायचे. कामवाल्या मावशींकडून आजारपणाचे कळाले की तेजल च्या आजी पहिल्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर यायच्या, लिफ्ट चे दार उघडे ठेवूनच 'बाळाला दे माझ्याकडे, मी घेऊन जाते, 2 कपडे घाल पिशवीत' म्हणून घाई घाई अद्वैत बाळाला घेऊन जायच्या. तो खालीच जेवेल सांगता सांगता मला जेवण औषध आणि विश्रांती घ्यायचा कडक दम भरून जायच्या.

खाली मुलं खेळताना दिसली की 'किशोर, दीक्षित आंटी ला बर नाही, बाबू ला संध्याकाळी खाली फिरवायला तुझ्या बहिणींना सांग' निरोप परस्पर दिला जायचा. संध्याकाळी गुप्ता आंटीच्यामुली अद्वैत ला घेऊन वर यायच्या त्याला फ्रेश करून दिले की आंटीनि दिलेला डबा देऊन 'खा लेना' अद्वैत हमारे घर पे खायेगा, उसके लिये सिम्पल खिचडी दीदी बना रही है!' म्हणून जे घेऊन जायच्या ते त्याचे खाली खेळणे, खाणे उरकून डोळे मिटायला लागलेकीच परत घेऊन यायच्या. दुसऱ्या दिवशी खाली गेले की मानकर काका-काकू , राव आंटी, अनु , सेठी आंटी, सोनिया सगळ्यांनी तब्येतीची चौकशी करावी.

ब्राह्मण सोसायटीत तर माधुरीने खूपच काळजी घ्यावी, मुली शाळेतून आल्या की 'आधी भरभर खा आणि बाळाला सांभाळायला जा, मावशीला बर नाही'. सांगून मुलींना माझ्याकडे पिटाळावे, येताना हातात काहीतरी वाटीभर पाठवणारच, तोंडाची चव गेली असेल, खाऊन घे च्या प्रेमळ आग्रहासह. इथे 'बाळ' आर्या साठी. अद्वैत दादा तोपर्यंत मोठा झाला होता. दारातूनच कानडे काकूंनी विचारावे 'काय ग, माधुरी म्हणाली तुला बर नाही'. 'काय तुम्हा आजकालच्या मुलींना म्हणावं, संध्याकाळी खाली चालायला जात जा, काही आजारपण येत नाही' असा सज्जड दम भरत 'स्वयंपाकवाल्या बाई आल्या होत्या ना, की काही करायचे आहे' अशी प्रेमळ चौकशी पण करून जायच्या. जोशी काकांना कुणकुण लागली की 'दीक्षित बाई, काय झालं? आजारी पडलात?' विचारत यायचे. 2 कप दूध पीत जा रोज असा सल्लाही बरोबर असायचाच.

संध्याकाळी ममताचा फोन यायचा 'काय ग, अद्वैत बोलला आत्ता, बर नाही म्हणून, फोन तर करायचास, काही पाठवलं असत, दुपारी जेवलीस का,औषध घेतले का,काकांकडे जाऊन आलीस का' चौकशीचा पाऊस पडायचा. (काका म्हणजे डॉक्टर काका) 'अद्वैत आता इथेच रोहन-रोहित बरोबर जेवेल, तुला काही पाठवायचे आहे का?' च्या प्रेमळ विचारपुसीनेच फोन बंद व्हायचा.

रहेजा मध्ये असताना डेंग्यूला माझा पत्ता सापडला. आई मावशी 15 दिवस राहून परत जाणार होत्या हे ज्योती कोटक ला माहीत होते. बरोबर आर्या शाळेतून यायच्या वेळेस तिने डबा घेऊन यावे. 'मुझे पता है ये आर्या का स्कुल से आने का टाइम है! आज आंटी भी जानेवाले थे तो आर्या के लिये नूडल्स बनाके लाई हू!' इतक्यात आर्या आलीच , तिला हातपाय धुवायला लावून डबा खाऊन घे सांगून 'स्वाती, कुछ भी हेल्प लगे तो फोन करना' चा मनमोकळा आग्रह करूनच ती घरी गेली.  ह्या दरम्यानच माझ्या आयुष्यात माझी लाईफ लाईन आली. माझ्या खूप छान दृष्ट लागाव्या अशा मैत्रिणी 'हेमा, मंजू, प्राची आणि शिल्पा'. शारीरिक ,मानसिक, वैचारिक, भावनिक, सामाजिक, कौटुंबीक सगळ्या प्रकारची आजारपणं ह्या चौघीनी अक्षरशः झेलून धरली. एकाही प्रसंगात 'तुझे तू बघ' किंवा 'काय हीच नेहमीचंच' असा सूर नाही. कधी प्रेमळ समजूत तर कधी सज्जड दम भरत माझी गाडी कधी ट्रॅक वरून उतरू दिली नाही. 

काय नाते आहे माझे ह्या सगळ्यांशी ?? बर, मी काही खूप प्रेमळ, सहज फोन करून चौकशी करणारी किंवा आठवण आली म्हणून गप्पा मारायला जाणारी व्यक्ती नाही. तुरटी तरी जरा बरी इतकी मी तुरट. माझ्याच व्यापात मग्न, कोणाच्या वेळेला धावून जाइल, त्यांचेही प्रसंग साजरे करेल असे काही नाही. तरीही ह्या सगळ्यांनी माझ्यावर अथांग प्रेम केले. ह्यातील काही नावे त्यांच्या शेवटच्या प्रवासाला मार्गस्थ झाली आहेत पण जाण्यापूर्वी माझी अनुभवांची ओटी पुरेपूर भरूनच. कधी प्रसंग नाही आला किंवा अगत्याने त्यांच्या प्रेमाचा उल्लेख करावा असे न वाटल्याने असेल किंवा आपल्या जवळची लोकंही कधी जाऊ शकतील असा विचार मनाला शिवातच नसतो त्यामुळेही असेल बऱ्याच जणांशी बोलायचे राहूनच गेले. 

आहो, धन्यवाद म्हणायचे काय सुचवताय, हे सगळे माझी फक्त आजारपणातच काळजी घेतात. एरवी मला बुकलून काढण्याचा पुरेपूर हक्क आहे त्यांना. वर गेलेले देखील खाली येतील परत हक्काने रागवायला. असो.. हे सगळं आज आठवण्याचे कारण काल एक एका ओळीचा मेसेज पाठवला होता 'उद्या ऑफिसला येणार नाही, तब्येत बरी नाही'. सकाळीच वैद्य सरांचा फोन, 'राहुल ला पाठवतो आहे, आई ने डबा दिला आहे'. ह्या वैद्य काकू आणि कुटुंबीय म्हणजे मला लागलेली बम्पर लॉटरीच.

कळावे, लोभ असावा.

ॲड. स्वाती आवटी दीक्षित

1 comment:

  1. मस्तच..... ताजे टवटवीत....आनंददायी वाटलं वाचताना👌💐

    ReplyDelete