Tuesday, July 14, 2020

माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, रामराम !!

माननीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब,
रामराम !!

तुमच्या तीन अंकी प्रदीर्घ मुलुखती कडून महाराष्ट्राच्या नागरिकांना बऱ्याच अपेक्षा होत्या.अनेक वर्षे राजकारण कोळून पिल्यावर देखील तुम्हाला अजूनही पक्षांतर्गत आणि अंतरपक्षीय राजकारणातच रस आहे हे बघून निराशा झाली. तुमच्या राजकीय कारकीर्दीच्या अर्ध्या वयाची कारकीर्द असलेल्या नेत्यांवर हिरीरीने बोलण्याचा उत्साह न समजण्यासारखा.
मुलाखतकाराने मुलाखत जरी राजकीय हेतूने घेतली असली तरी  ऐकणारे श्रोते राजकीय नेते वा राजकीय पक्षांव्यतिरिक्त सामान्य जनता ही होती. सध्या सर्वसामान्य नागरिक ज्या परिस्थितीतून जात आहेत, त्यांच्यासाठी 'तुमचे राजकारण गेले चुलीत', 'आग लावा त्या राजकीय पक्षांना' म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोना महामारीने आर्थिक, सामाजिक आणि आरोग्य संकटात अडकलेल्या जनतेशी तुम्ही संवाद साधाल,  त्यांच्या दुखऱ्या मनावर फुंकर घालाल, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांवर काही तोडगा सुचवाल अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.
उद्धव साहेब कुठे चुकले आणि देवेंद्रजीनी काय चुका केल्या, तुम्ही कसे गनिमी काव्याने पाठिंबा दिला आणि काढला ह्याने आमच्या कोरोना काळातल्या कोणत्या समस्यांचे समाधान होणार आहे?
तुम्ही पाच वर्षे सरकार चालवा नाहीतर पाच दिवस , त्यात आमच्या जगण्याची , जिवंत राहण्याची शाश्वती कुठे आहे??
साहेब, गेले अनेक वर्षे तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात ते सेनेच्या किंवा काँग्रेस च्या जीवावर नाही तर ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांवर आणि प्रेमावर. सेना तर तुमची पारंपरिक शत्रू, काँग्रेस ला सोडचिठ्ठी दिलीत ती त्यांच्यावरच्या प्रेमापोटी तर निश्चितच नाही. अतिशय खेद वाटतो सांगायला पण तरीही आज जनताजनार्दना पेक्षा तुम्हाला ते पक्ष अधिक महत्त्वाचे वाटले.... असे तुमच्या मुलाखतीतून तरी जाणवले.
कोण कसा चूक, कोण कुठे कमी पडतो, कोण लबाड्या करतोय ते आम्ही बघतोच आहोत. त्याची फळ आम्ही २०१४ च्या मतदानात पदरी टाकणारच आहोत. आत्ता आम्हाला अपेक्षित होते, अनुभवसम्पन्न असे एक राजकीय व्यक्तिमत्व जेव्हा अशा महामारीच्या काळात नडलेल्या जनते समोर येते, तेव्हा त्यांच्या अनुभवाच्या, अभ्यासाच्या आणि दूरदृष्टीच्या पेटार्यातून काहीतरी ठोस आणि लोकहिताच्या उपायोगी पडणारे असे काही निर्णय, काही उपाययोजना,काही संकल्प बाहेर पडतील. कमीत कमी राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांसह ह्या महामारीच्या काळात कुठे कुठे आणि कसे जनतेसाठी काम करणार आहात वा काम होणार आहे, एखादा हेल्पलाईन नंबर, कुठल्या उद्योगक्षेत्रात कामे उपलब्ध करून दिली जाऊ शकतात किंवा देणार आहात ह्या बद्दल जरी बोलला असतात तरी खूप दिलासा मिळाला असता. पण दुर्दैवाने असे झाले नाही.
मोदोजींचे गुरू कोण, ते यशस्वी झाले की नाही ह्याच्यापेक्षा आमच्या लेकरांच्या यशापयशाचे काय, त्यांच्या गुरूंचा पगार आम्ही द्यायचा की गुरुकुल ने ह्या प्रश्नांनीच आम्ही सध्या त्रस्त आहोत. तुमच्या पर्यंत आमचे प्रश्न पोहोचत नाहीत की तुम्हाला आमच्या प्रश्नांमध्ये रस राहिला नाही ?? ऊध्ववजी एका मोठ्या, आर्थिक विवंचना नसलेल्या घरात जन्माला आले. पण तुम्ही तर आमचे आयुष्य अनुभवले आहे ना ?? आमच्या विवंचना कधीकाळी तुमच्या आयुष्याचा पण एक भाग होत्या ना?? की आता गतकाळाचे विस्मरण झाले??
पोपटपंची ला तर आम्ही महाराष्ट्रावरून ओवाळूनच टाकले आहे. त्यामुळे ना काही अपेक्षा ना काही खंत. पण तुम्ही आमची घोर निराशा केलीत. दुसऱ्याची रेघ खोडुन लहान करण्याच्या नादात आपली रेघ मोठी करायची विसरून गेलात बहुदा.

कळावे, लोभ असावा(?)

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

ता.क.: पुढील काही दिवसात सम्पर्क न झाल्यास मा.बंटीभाऊंच्या टोळधाडेने उचलून नेले असणार हे समजून घेणे.

No comments:

Post a Comment