Friday, July 10, 2020

निमित्त गुरुपौर्णिमा ...

निमित्त
गुरुपौर्णिमा ...

दरवर्षी प्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमेच्या नानावीध शुभेच्छांचा पाऊस पडला. निसर्ग, प्राणी, पक्षी, मित्र-मैत्रिणी, माता-पिता जे जे आजुबाजूला दिसते, वावरते त्या सगळ्यांना गुरू मानून श्रेय देण्याचा अट्टाहास सगळ्या शुभेच्छांमधून अक्षरशः ठिबकत होता. एरवी रोजच्या जगण्यात मदत करणाऱ्या, पाठीशी उभे राहणाऱ्या, योग्य सल्ला देणाऱ्यास त्याचे श्रेय देण्याचा कंटाळा करणारे, मी स्वतःच स्वतःला घडवले सांगणारे सुद्धा ह्या शुभेच्छांच्या लाटेत वहात होते.

सगळ्या जगाला गुरू मानून श्रेय देणारे स्वतःला श्रेय द्यायला मात्र साफ विसरले होते. आपणही आपले गुरू असतोच की. तसे नसते तर अगदी लहान मूल देखील दुसऱ्याच्या संगण्याला नकार वा होकार न देते. ज्या क्षणी तो छोटा जीव आपल्या आईला , आजूबाजूच्या लोकांना एखाद्या गोष्टीसाठी नकार अथवा होकार भरत असतो, त्या क्षणी तो स्वतः स्वतःशी संवाद साधत असतो. एका अर्थी स्वतःला शिकवत असतो. त्याच्या शिकवण्याच्या , विचाराच्या आड आजूबाजूच्या जगाचे सांगणे असेल तर तो ते ऐकण्यास तयार होत नाही. तिथूनच आपण स्वतःच स्वतःचे गुरू व्हायल सुरवात होते. कधीही न संपणारी , तहेहयात चालणारी प्रक्रिया सुरू होते. कालांतराने आजाणतेपणे तिचाच विसर पडतो.

जसे जसे मूल मोठे होत जाते, ते आजूबाजूच्या वातावरणातून अनेक गोष्टी केवळ निरीक्षणातून आत्मसात करत असते. पण काय आत्मसात करावे आणि काय सोडावे ते शिकवणारे तर त्याचे स्वतःचे मनच असते. असे म्हणतात ज्यांचा स्वमनाशी सुसंवाद असतो त्यांचे निर्णय बहुदा चुकत नाहीत. ह्या विचाराचे मूळ बहुदा त्या मनाच्या शिकवणीतच असावे. तसे नसते तर जन्मापासून व्यवस्थित समज यायला लागेपर्यंत ज्या आई वर ते मूल अवलंबून असते, तिला वेगवेगळ्या कारणांसाठी त्या बछड्याने नकार वा होकार दिला नसता. ज्याला स्वतःचे स्वतः काही करता येत नाही त्याला 'नाही' अथवा 'हो' म्हणायचे कसे कळते ??

मोठे झाल्यावर मात्र इतर काय बोलतात, काय सांगतात, काय सुचवतात ह्यातच मन अधिक अडकून पडते, त्यांनतर बहुदा तो मनाचा स्वतःशी चाललेला संवाद हळू हळू कमी कमी होत असावा. किंवा तो संवाद झाला तरी ऐकू येणे, समजणे, त्याबरहुकूम वागणे कमी होत असावे. आणि म्हणूनच हे उदगार वारंवार ऐकू येऊ लागतात 'माझ्या मनात एकदा विचार आला होता ....' , 'आधी मला वाटले होते ..... ', वगैरे. वेळीच त्या अंतर्मनाचा, त्या आपल्यातल्या आपल्या गुरूचा आवाज जर ऐकू शकू, तर जास्तीत जास्त निर्णय योग्य घेतले जाण्याची शक्यता वाढेल. दुर्लक्ष केले तर मात्र त्याचे विपरीत फलीतही आपल्यालाच भोगायचे आहे.

कोणीतरी काहीतरी सांगते, भरवते, ठासवते, बिंबवते म्हणून आपण ते आपलेच म्हणणे असल्यासारखे जेव्हा स्वीकारतो, त्याक्षणी आपली आपल्या मनाशी जोडलेली नाळ तोडून टाकतो. नाळेचे काहीच नुकसान नाही, झालेच तर फक्त आणि फक्त आपले नुकसान होते. त्यामुळे ह्या क्षणापासून 'मीच माझा गुरू. माझे मन, माझे विचार, माझे म्हणणे हेच माझे मार्गदर्शक. मी त्यांनी सुचवलेल्या मार्गावरच जाणार, आणि माझ्या मनासारखा, माझ्या विचारासारखा विचार असणारे सहृदय फक्त माझ्या आजूबाजूला असतील'...असा निग्रह करूयात.

पुढच्या गुरुपौर्णिमेला अहंकाराचा दर्प नसलेल्या, स्वस्तुतीची वाळवी न लागलेल्या परंतु स्वतःमधील गुरुची स्तुती करणाऱ्या शुभेच्छा येतील अशी अपेक्षा करूयात.

कळावे, लोभ असावा.

-स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment