Friday, July 10, 2020

चोराच्या मनात पोलीस स्टेशन ...

चोराच्या मनात
पोलीस स्टेशन ...

एखादा गुंड अपघातात गेला काय किंवा मारला गेला काय, त्याच्याबद्दल जाहीर पुळका व्यक्त करताना 'आपल्याला ओळखणारे लोक ऐकतायेत, घरातली मंडळी ऐकतायेत, ते आपल्याबद्दल काय मत करून घेतील' ... असा काही विचार मनात येत नसेल का ?? की 'कंबरेच सोडून मुंडास्याला बांधून' मोकळे झालेत??

एखादवेळी समाजातले गुंड संपतील पण.
मुंबईमध्ये कुठे आहे आता गुंडाराज, पण मनातल्या गुंडाडपणाचे काय?? पुळका गॅंग ने एक मिनिटभर विचार करावा की 'त्या गुंडाने तुमच्या कानशिलाला घोडा टेकवला' किंवा 'त्याने तुमच्या घरातल्या एखाद्या सदस्याशी मैत्री केली'... सरसरून काटा आला ना अंगावर.

 गुंड, अतिरेकी, सगळ्याच वाईट प्रवृतींबद्दल गेल्या 10/12 वर्षात अचानक सहानुभूतीची ही लाट आली कुठून ?? 'गुंड असला म्हणून काय झाले, तो पण एक माणूस आहे' असा एक (बे)सूर लागलेला हल्ली बरेचदा ऐकू येतो. आरे , जसा तो माणूस आहे तसा पोलिस पण माणूसच आहे... हे हेतुपुरस्सरपणे विसरायला होते का आपल्याला?? 'पोलीस कायद्याचे रक्षक आहेत, त्यांनी कायदा मोडता कामा नये' ... मान्य , पण कायदे मोडणाऱ्यांना जर पोलिसांनी मोडले ते तरी चालेल ना ?? की बंदुकीच्या ऐवजी मेणबत्त्या द्यायच्या त्यांच्या हातात??

तसे तर सीमेवर लढणारे जवान पण फारच क्रूर, अतिरेक्यांबद्दल बिलकुल दयामाया नाही. दुसऱ्या देशाचा सैनिक बिचारा चुकून आपल्याकडे येतो , आपल्या जमिनीवर झोपडी बांधायचा प्रयत्न करतो तर 'अतिथी देवो भव' ला बट्टा लावत खुशाल गोळी घालतात त्याला. काय बिघडले थोडी थोडी थोडी करत बरीचशी जमीन त्यांना दिली तर ?? येऊ देत त्यांना आपल्याकडे, मारू देत त्यांना आपले सिमेवर रहाणारे रहिवासी, नाहीतरी लोकसंख्येचा प्रश्न किती बिकट झाला आहे आपल्याकडे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवायला ते आपल्याला हातभारच तर लावत आहेत ना. बिलकुल वळण नाही आपल्या सेनेला, चांगले संस्कारच झाले नाहीत त्यांच्यावर. दोन(२)-चार(४) मेणबत्त्या त्यांनाही पाठवून द्या.

पोलिसभरतीच्या वेळेस पण ह्या पुळकावीराना भरतीसाठी आलेल्या तरुणांबद्दल प्रचंड माया, प्रेम, भूतदया वाटत असते.
ज्या पोलीसाला उन्हातान्हा, पावसात, जंगलात कुठेही जिथे ड्युटी लागेल तिथे बारा(१२)- बारा(१२) तास काम करावे लागते. कधी उदरभरणाचा योग असतो तर कधी फाके. ह्या अशा कामासाठी निवड चाचणी A/C खोलीत, पंखे, दिवे, कार्पेट सगळ्या सोयीनी युक्त कॉर्पोरेट ऑफिस मध्ये करायला हवी की काय?? मग पुन्हा 'ह्या नव्या पोलीसांच लईच नाजूक काम' म्हणून नाव ठेवायला पुळका गॅंग मोकळी.

आणि हो तेवढं त्या महिला पोलिसांना साडी नसू द्या , महिलेला साडीचा अधिकार नाकारणं म्हणजे काय? मंगळसूत्र तर सौभाग्याचे लक्षण, ते तर ती घालणारच... मग मंगळसूत्राला मॅचिंग कानातले नकोत का?? आणि साखरपुड्याची अंगठी, ती तर काढतच नसतात, अवलक्षण होत म्हणतात. सौभाग्यवती बाई आणि कुंकू नाही लावणार का?? लिस्टिक, पावडर, पायातले, श्रावणात हिरव्या बांगड्या तर परंपराच आहे आमची, ती कशी मोडणार?? ह्या सगळ्या जामानिम्यातून जमलंच तर त्या एखादं दुसरा चोर पकडतीलच की.... काय करणार महिला पोलीस असली म्हणून काय झालं बाईमाणूस आहे ना ती, तिलाही मन आहेच की.

सीमेवरच्या जवानांचे पण ट्रेनिंग च्या नावाखाली जे हाल आहेत. रोज सकाळी उठायचे काय, धावायचे काय, व्यायाम काय, कधी बंदूक चालावं, कधी तोफ चालवं, परेड तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली. तारेखालन कोण सरपटत जात हो, साप आहोत का आपण सरपटायला? रोज एकच कपडे ,त्यांचं नसलं का मन होत 'पिवळी विजार आणि भगवा शर्ट घालायला. सैन्यात असली म्हणून काय झालं 'माणसचं आहेत हो ती' 'त्यांनाही मन असत'. ..इति पुळका गॅंग.

IAS / IPS ऑफिसर साठी UPSC/ MPSC चा अभ्यासक्रम पण थोडा सोप्पा करायला हवा. फार हाल होतात त्यांचे अभ्यास करून. आम्हाला 'ढ' अधिकारी चालतील पण ते तेवढं अभ्यासक्रमाच बघा जरा. आणि हो वर्गातल्या मागुन पहिल्या येणाऱ्या मुलांना पण डॉक्टर व्हावस वाटतच की, त्यांचंबी मन मोडू नका राव.... हवं तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना ते फुकटात तपासतील. त्यांची आजारपणातून एकदम कायमची 'सुटकाच' करून टाकतील. हाय काय अन नाय काय.

क्वालिटी क्वालिटी म्हणून कोण बोंबलला रे, कानाखाली जाळ काढू का??

डोसक्यात इचार चालुये 'चार(४)-पाच (५) अतिरेकी आणि तेवढेच गुंड, चोर, दरोडेखोर धाडावे का पाहुणचाराला पुळका गॅंग कडे??'
'पुळका गॅंग असली म्हणून काय झालं, माणसंच हायेत ती बी'

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#निर्लज्जपणाचाकळस

No comments:

Post a Comment