Saturday, May 23, 2020

सत्तेचं राजकारण...

सत्तेचं राजकारण...

आई-वडिलांचा घटस्फोट होतो. आईचे दुसरे लग्न होते. आईची इच्छा 'नवीन वडिलांना' मुलांनी आपले म्हणावे. मूळ वडिलांना आता आई 'शत्रू' वाटायला लागली आहे. त्यांना वाटते, मुलांनी माझ्याबरोबर आई आणि नवीन वडिलांवर चिखलफेक करावी. का? वेगळे होताना मुलांना विचारले होतेत का ? मुलांनी तर तुम्हाला एकत्रच निवडले होते. त्यांच्यासाठी आजही तुम्ही एकत्र यावे हीच इच्छा आहे. नको आहेत त्यांना नवीन वडील. तेच जर हवे असते तर त्यांच्याच पोटी जन्म घेतला असता ना. तुमच्या कुटुंबाचा हिस्सा झालोच नसतो. आणि तुम्हाला आई नकोशी झाली, तुम्ही सोडली की तिने जन्मगाठ तोडली आम्हाला घेणे देणे नाही, पण तुमच्या चिखलफेकीचा भाग व्हायला आम्हाला सांगू नका.
उलट एक समंजस, समजूतदार पित्याच्या भूमिकेतून आमच्या पाठीशी उभे रहा.

मान्य आहे की कोर्टाने आमचा ताबा आईकडे दिला आहे. एकटीने मुले सांभाळण्याची तिची ही पहिलीच वेळ. तारेवरची कसरत करताना आणि नवीन कबिल्याशी जमवून घेताना होते आहे आमच्याकडे दुर्लक्ष, होते आहे आमची आबाळ. तर ती कशी चूक आहे, ती कशी कमी पडते, तिचे कसे लक्ष नाही सांगून आमची आबाळ थांबणार आहे का ?? त्यापेक्षा ती जिथे कमी पडते, तिचे जिथे लक्ष नाही, तिच्या जिथे चुका होतात ज्याच्यामुळे आम्हाला त्रास सहन करावा लागतो, तिथे आमच्या पाठीशी ठामपणे उभे रहा. एक समांतर प्रणाली राबवा. जेणेकरून तिचा आम्हाला ह्या संकटकाळात उपयोग होईल. ज्याच्या भरवशावर आम्हाला ह्या अडचणीतून वाट काढायला मदत मिळेल. आधीच आम्ही बुडालेलो, त्यात आम्हाला हात देऊन बाहेर काढायचे की हातात फलकाचे ओझे देऊन अजून आत आत रुतवायचे??

आईचेही चुकलेच. तिच्या वडिलांच्या 'इच्छे'खातर तिने आम्हाला वाऱ्यावर सोडले. नव्या कुटुंबाच्या हवाली केले. पण आमची इच्छा काय आहे ? आम्हाला हवाय का नवा बाप? आम्हाला आवडतोय का हा नवा घरोबा ? केला का काही विचार ? तुमच्या ह्या नव्या तडजोडीत आमचे मन मोडलेस बघ तू. झाला असेल ना तुमच्यात वाद. चुकले असाल ना दोघांपैकी एक कोणीतरी. पण इतके टोक गाठलेत की तुमच्या अहंकारापुढे एकालाही आमची आठवण येऊ नाही ?? आणि तुझा तो भाऊ,शकुनीमामा, त्याला तिकडे स्वर्गात पाठवलाय कशाला?? आपल्या भूलोकीचे प्रश्न, मागण्या तिकडे मांडून आपल्यासाठी चांगल्या सोयी सुविधा आणायला ना?? आणि करतोय काय तो मामा, स्वर्गात बसून भूलोकीच्या पंचायती ?? उंटावरून शेळ्या हाकतोय नुसता. त्याचा सगळा जीव इथेच अडकलेला. पाठवला कशाला मग त्याला स्वर्गलोकीला?? कळीचा नारद कुठला... आग भडकली तर विझवायचं त्याच काम होत की अजून तेल ओतायचं?? आपली बहीण राणी व्हावी म्हणून भाचरांचा जीव घेतला त्यानं आणि वरून पोपटपंची चालूच. त्याच्या ह्या कृत्याची कधीही माफी देणार नाही हा भूलोक.

'आई खाऊ घालेना आणि बाप भीक मागू देई ना' अशी अवस्था करून ठेवलीत तुम्ही दोघांनी आमची. तुमच्या भांडणात आम्हाला पडायचं नाही. त्या नव्या घरोब्याशी आमचे काही भांडण नाही पण आम्हाला काही घेणेदेणे पण नाही. आम्हाला त्यांच्याबरोबर नांदायला लावू नका. आणि त्या शकुनीमामाला आवरा. ज्या दिवशी तुम्हाला तुमची चूक उमजेल, परत एका घरात एकोप्याने रहायला लागाल, तेव्हाच आम्ही परत येऊ. तोपर्यंत तुमच्यापैकी एकाचेही तोंड बघायची आणि तुमच्या कोणाच्याही नादी लागायची आमची इच्छा नाही. कदाचित तुमच्या लक्षात येत नाहीये, काडीमोड एक नाही दोन झाले आहेत. एक तुमच्या दोघांमध्ये आणि दुसरा तुमच्या आणि आमच्या मध्ये.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

#सेना #शिवसेना #भाजपा #विरोधीपक्ष #सत्ताधारी #राऊत

No comments:

Post a Comment