Monday, May 4, 2020

मेरा भारत महान !!

मेरा भारत महान !!

"जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा,
वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा ।"
इथे 'सोनेकीं चिडीया' ही उपमा वेगळ्या अर्थाने जरी वापरली गेली असली तरी सध्या सोन्याच्या नाहीत पण खरोखरच बाहेर चिमण्यांचेच राज्य आहे , मनुष्य घरात अडकून पडल्याने पृथ्वी, प्राणी आणि पक्षी सगळ्यांनीच मोकळा श्वास घेतला. नाण्याला तीन (३) बाजू असतात हे कोरोनाने मनोमन पटवून दिले. पहिली आपली बाजू , खूप आपली ... अगदी वैयक्तिक आणि खाजगी. सध्या आपण स्वतःच्या , स्वतःच्या परिवाराच्या, संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या अधिक जवळ आलो आहोत असे नाही वाटत ? दुसरी निसर्गाची बाजू. मोकळा श्वास नव्याने घेणारी धरा आणि तिची लेकरे. स्वच्छ झालेले नदी-नाले-ओहोळ-तलाव, मुक्त संचार करणारे पाळीव आणि जंगली प्राणी, सकाळी चिवचिवाट करून उठवणारे आणि विजेचे खांब किंवा तारांऐवजी रस्त्याच्या मध्यभागी शाळा भरवणारे पक्षी आणि प्रदूषणमुक्त झालेली शुद्ध हवा. खूप महत्त्वाची अशी तिसरी बाजू , अभिमानाची आणि प्रतिष्ठेची 'आपले प्रधानमंत्री आणि पर्यायाने आपल्या देशाला मिळत असलेला इतर देशांचा सन्मान आणि विश्वास'.

आपल्या देशात महामारी च्या लढाईत 'वेळेत आणि अचूक' निर्णय घेतले गेले त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे फार नुकसान झाले नाही शिवाय परिस्थिती नियंत्रणात ठेवणे तुलनेने सोप्पे गेले. मान्य ... सगळे श्रेय भारताच्या नेतृत्वाला देणे आणि त्यांचा सन्मान करणे पण मान्य. त्याचबरोबर जसे अतुल म्हणतो, आपले संस्कार, आपली संस्कृती आणि बचत करण्याची पिढ्यानपिढ्या असलेली सवय ही सुद्धा कारणे आहेतच की. नेमके काय बदल झाले गेल्या दीड महिन्यात? एकतर नागरिकांनी घरातच थांबावे म्हणजेच कुटुंबाबरोबर उत्तम प्रकारे वेळ घालवावा, दुसरे कामावर जाऊ नये पर्यायाने उत्पन्न बंद. सर्व जगात ह्या दोनच सूचना तर दिल्या गेल्या होत्या. मग भारताने वेगळे असे काय केले? अमेरिकेचेच उदाहरण घेऊयात. घरात बसणे, सतत फक्त कुटुंबाबरोबर वेळ घालवणे वैयक्तिक मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या बहुसंख्य अमेरिकन नागरिकांना कठीण जाऊ लागले आणि नागरिक लॉक डाऊन च्या विरोधात रस्त्यावर उतरले. उलटपक्षी भारतीय मानसिकता ही कुटुंबवत्सल विचारधारेची असल्याने आणि सांगितले गेलेले ऐकण्याची आणि आचरणात आणण्याची सवय आणि तयारी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. दुसरा एक महत्वाचा विषय होता आर्थिक अडचणींचा. भारतीय संस्कार असे सांगतो की 'जो एकटा कमावतो, एकटाच खातो, तो चोर असतो'. अशा पद्धतीच्या शिकवणीमुळे साहजिकच भारतीय मनाला उत्पन्नाचा एक हिस्सा राखून ठेवण्याची सवय लागलेली आहे. ह्याच शिल्लक पुंजीने कठीण काळात साथ दिली. जेव्हा की अमेरिकेत मात्र दर पंधरा दिवसांनी पगार होत असल्याने, व्यक्तिसापेक्ष अमेरिकन नागरिक स्वतःवर आणि स्वतःच्या इच्छेनुसार वेळोवेळी सगळे पैसे सम्पवून टाकत होते. वेळप्रसंगी वापरता येईल अशी बचत फार कमी प्रमाणात उपलब्ध होती. त्याचाच परिणाम स्वरूप लॉक डाऊन ला विरोध होऊ लागला. अध्यात्माचे अनुष्ठान असलेले भारतीय लोक मुळातच सहनशील. धर्म संस्कार , एकीचे बळ, कुटुंबाच्या प्रेमाची ताकद, निसर्गाचे पूजन, 'स्व' व्यतिरिक्त इतरांचा विचार करण्याचा संस्कार, बचतीचे महत्व आणि समाज मनाचा प्राधान्याने विचार ह्या वैशिष्ट्यांचा महामारीच्या लढाईत निश्चितच उपयोग झाला. पाश्चात्य संस्कृतीत 'मी आणि माझे' अश्या विचारप्रवाहात वाढलेल्या विज्ञानवादी पिढीला भारतीय 'वसुधैव कुटुम्बकम्' संस्काराने मात दिली.

आमचे संस्कार, आमची योगासने, आमचा आयुर्वेद, आमच्या धर्मग्रंथांची शिकवण, आमचा नमस्कार, आमची कुटुंब पद्धती, विनाकारण खर्च न करता बचत करण्याची प्रवृत्ती हे सगळे खूप जुनाट आणि बुरसटलेले म्हणून मागे टाकून ज्या पाश्चात्य संस्कृतीच्या मृगजळामागे धावत होतो, आज त्या गुणांचीच कोरोनाच्या लढाईत वाहवा झाली. योग्य नेतृत्व, योग्य निर्णय, योग्य शिकवण, योग्य संस्कार आणि योग्य सवयींनी आज भारत देश जगाच्या नकाशावर उठून दिसतो आहे. कोरोनाच्या निमित्ताने उघडले गेलेले डोळे आणि आपल्या संस्कारांच्या आणि संस्कृतीच्या जवळ गेलेले भारतीय मन पुन्हा विचलित तर होणार नाही ना ??

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment