Friday, May 8, 2020

गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ

गाढवाचा गोंधळ
व लाथांचा सुकाळ

म्हणजे मूर्खांच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ घालवणे. ज्यांचे लॉक डाऊन मूळे नुकसान झाले आहे, ज्यांना प्राण गमवावे लागले आहेत त्यांच्याप्रती सहानुभूती आहेच. पण त्याचबरोबर काही प्रश्न ही आहेतच. ज्याची उत्तरे कोणीच देत नाहीत. किंबहुना तसे प्रश्न विचारणे सुद्धा पाप समजले जाण्याचीच शक्यता अधिक.

पालघर मधली घटना अतिशय संतापजनक आणि हृदयद्रावक अशीच आहे परंतु सगळे मोह-माया-पाश सोडलेले संन्यासी अशा कोणत्या मोहापायी सरकारी आदेश झुगारून प्रवासास निघाले होते ? आप्तस्वकीयांच्या अंतिम दर्शनाचा मोह सर्वसामान्यांना होणे स्वाभाविकच पण साधू-संतांकडून ही अपेक्षा नाही.

तान्ही मुले,बायका, म्हातारे कोतारे, बाचकी-बोचकी घेऊन उन्हा-तान्हात ट्रक च्या टपावर बसून प्रवास करणारे मजूर पाहिले की अत्यंत दुःख होते परंतु एक प्रश्नही पडतो, ज्या अर्थी कुटुंब-कबिला बरोबर आहे त्याअर्थी त्या कुटुंबाची शहरात कुठेतरी पत्र्याची का होईना राहण्याची काहीतरी सोय नक्कीच आहे. आधार काढले असेल तर सरकारने खात्यात पैसे वर्ग केलेच असतील. शहरात सामाजिक संस्था, सरकारी संस्था खाण्यापिण्याची सोय करत आहेत. अशा परिस्थितीत अशी कोणती गोष्ट आहे की जिथे जाण्यासाठी आगीतून फुफाट्यात जाण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा?? रेल्वे रुळावर रात्रीच्या गारठ्यात किडुकमिडुक निघण्याची शक्यता असतानाही ज्यांना इतकी गाढ झोप लागावी की रेल्वेच्या कर्णकर्कश्य शिट्टीचा आवाजही ऐकू येऊ नये. त्यांना एकत्र दहा (१०) बाय बारा (१२) च्या खोलीत राहणे किंवा तात्पुरती सरकारी निवास व्यवस्था किंवा ज्या कारखान्यात काम करत असतील त्या जागेत रहाणे असह्य व्हावे?? पायी पायी घरचा रस्ता जे शोधू शकतात त्यांना पालिका , महानगरपालिका, ग्रामपंचायत किंवा सामाजिक संस्थांनी केलेली सोय शोधता येऊ नये ?? गावी काही जीव आपल्यावर अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी आपला जीव लाखमोलाचा आहे हे अघोरी मार्ग अवलंबण्याआधी लक्षात येऊ नये?? ह्या प्रश्नांची उत्तरं समाजाने, प्रशासनाने, माध्यमांनी शोधायची की 'का ग बाई रोड, (तर म्हणे) गावाची ओढ' म्हणून गप्प बसायचे ??

एरवी सभा, मोर्चा, मागण्या, बंद, वगैरे साठी ह्या आणि अशा मजुरांना पाचशे (५००) रुपये रोजाने ट्रकात भरून नेणारे परप्रांतीय असलेले परंतु आमच्या राज्यात येऊन चणे-फुटाणे विकताविकता करोडपती झालेले नेते आत्ता नेमके लपले आहेत तरी कोणत्या बिळात ?? का नाही ह्या मजुरांसाठी एरवी गळे काढणार्यांनी सध्यपरिप्स्थितीत त्यांची राहण्याची, खाण्याची किंवा प्रवासाची सोय केली??

ज्या भागात डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी ह्यांच्यावर हल्ले झाले त्या घटनांचा नुसता निषेध न करता त्या भागाला किंवा त्या विशिष्ट समाजाला सील /बंद करून त्यांच्याशी व्यवहार आणि वैद्यकीय मदत किंवा पोलीस संरक्षण का नाही नाकारले गेले?? का नाही त्यांच्या नेत्यांना माध्यमांनी उभे आडवे कापून काढले ?? का नाही त्या भागाचा किंवा समाजाचा बहिष्कार केला गेला ?? मालेगावात आज कोरोना बळींची संख्या वाढताना दाखवताना का नाही सुरवातीला त्यांनी झुगारून लावलेली बंधने चर्चिली जात ?? का तिथल्या नेत्यांनी सरकारी आदेशाचे पालन करायला सांगणाऱ्या पोलीस कर्मचार्याची केलेली बदली लोकांसमोर आणली जात?? उलट कितीही चुकलात तरी त्यांच्या सणासाठी पहाटे पहाटे दुकाने उघडण्याचा आदेश दिला जातो, ज्याचा कोणीही साधा निषेध करतानाही दिसत नाही.

मागास, अशिक्षित, परप्रांतीय आणि अल्पसंख्यांक विशिष्ट समाज हे कधी चुकूच शकत नाहीत. त्यांना उर्वरित समाजाने फक्त आणि फक्त सहानुभूतीच दाखवायची असा काहीसा कल हल्ली झालेला आहे. कधीच डोळे उघडणार नाही का आपण ?? कधीही योग्य-अयोग्य समजून घेणार नाही का ?? प्रत्येक प्रसंगावर फक्त आणि फक्त डोळ्यातून अश्रू वहायचे, सामाजिक माध्यमांवर चुटपूटायचे, सभा-सम्मेलनातून हळहळायचे, वर्तमानपत्रातून रकानेच्या रकाने गरळ ओकायची, सरकार आणि प्रशासनाच्या नावाने बोटे मोडायची आणि मागच्या पानावरुन पुढे चालू ठेवायचे पण व्यावहारिक निर्णय मात्र घ्यायचे नाहीत असेच काहीसे ठरवले आहे का आपण ??

जे मजूर महानगरांच्या पुलाखाली किंवा झोपडपट्टीत जन्माला आले त्यांचेही हे आणि असेच हाल आहेत. त्यांनी कोणत्या गावाला जायचे ?? जे निम्नमध्यम वर्गीय आहेत, जे सरकारी मदतीच्या निकषांमध्ये बसत नाहीत, जे चाळीच्या एका खोलीत एका पेक्षा जास्त कुटुंब रहातात, ज्यांची कमाई ज्या त्या महिन्याला पण पुरत नाही, आता तर कमाई पण बंद, जे छोटे उद्योजक आहेत, उद्योगधंदे तर बंद पण जबाबदाऱ्या तर पूर्ण कराव्याच लागतात, कमाई नाही पण देणेदारी काही चुकत नाही , त्यांच्या घरात पण कोरोनाने शिरकाव केला असेल, कोणा आप्तस्वकीयाचा बळी सुद्धा घेतला असेल .... त्यांनी कुठे जायचे ? काय करायचे ? सुसंस्कारित व सहनशील असल्याने कोणाच्या अंगावर धावून पण जाणार नाहीत, मग त्यांनी राग/ द्वेष/ असहाय्यता कोणावर आणि कशी व्यक्त करायची ?? की महामारी चा मारा संपल्यावर समाज, सरकार आणि माध्यमे त्यांचा सत्कार करणार आहेत??

प्रश्न आणि फक्त प्रश्न ... हरवलेल्या, कधीही न मिळणाऱ्या उत्तरांच्या शोधात.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

(ता.क. ज्यांना तुटून पडायचे असेल त्यांनी आधी योग्य उत्तरे शोधावीत. नंतर लाखोली वाहिलीत तरी चालेल.)

No comments:

Post a Comment