Friday, May 22, 2020

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। अकस्मात तोही पुढे जात आहे॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।
अकस्मात तोही पुढे जात आहे॥

परवा आईचा फोन आला, तुझे लेखरू(छोटा लेख) वाचले. थोडे रडवलेस, थोडे हसवलेस.

रडायला खरच वेळ आहे सगळ्यांकडे?? कोरोना एक तर बरा होतो नाहीतर फक्त पंधरा (१५) दिवस देतो. ताप येतो आणि उलटी गिनती सुरू होते. कोणी दहा(१०) कोणी पाच(५) कोणी पूर्ण एक(१) पर्यंत पोहोचून मगच निरोप घेतो आणि पितरांच्या भेटीला रवाना होतो. हे जर सगळं माहीत आहे तर जो आहे तो वेळ रडण्यात का वाया घालवावा ?? कदाचित तो आपल्याकडे वळून पहाणारही नाही, कदाचित पुसटसे चाटून जाईल, कदाचित गाढ आलिंगन देईल.... कोण जाणे काय आहे नियतीच्या मनात. कोरोना केवळ निमित्त.

सगळ्यांनीच आयुष्याची लढाई लढली आहे . कोणाची सौम्य, कोणाची कठीण, कोणाची महाकठीण असेल. पण त्याचबरोबर सगळ्यांकडे सुंदर, आनंदी, हसरे क्षण पण असतील. कोणाकडे कमी, कोणाकडे जास्त, कोणाकडे प्रचंड साठा. लुटुयात ना ते सगळे आंनदी प्रसंग, करूयात ना यशस्वी क्षणांची लयलूट, सांगूंयात ना हसऱ्या गोष्टी सगळ्या जगाला, देउयात ना सुंदर प्रसंगांची वाणे एकमेकांना, जमवूयात ना गप्पांचा फड पुन्हा एकदा, वाहूदेत ना हास्याचे खळाळते धबधबे, जगुयात बेधुंद आयुष्य आपल्या आपल्या चौकटीत.

शाळेत चोरून खाल्लेल्या चिंचा-बोरे-कैऱ्या-चॉकलेट स्मरणात रहातात की शिक्षकांची बोलणी?? पालकांनी केलेले प्रेम सुख देऊन जाते की केलेली शिक्षा ?? भावंडांबरोबरच्या खट्याळ आठवणी हसवून जातात की लहानपणी केलेली भांडणे?? चांगला शेजार मनात कायम घर करतो की नाठाळ शेजार??

असे जर आहे तर आठवणी आठवताना रडक्या का आठवाव्यात?? प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगले-वाईट अनुभव आणि प्रसंग सगळ्यांच्याच आयुष्यात घडत असतात. जे जग आजूबाजूला आहे त्या जगातले चांगले बघावे, चांगले शिकावे, त्यांच्याशी चांगलेच वागावे हीच शिकवण दिली जाते ना? मग जे जग सोडून गेले, मागे पडले, आता आपल्याबरोबर नाही त्याची खंत न करता, त्या जगाच्या चांगल्या, मधुर, सुंदर आठवणीत का रमू नये?? आनंदाने त्या जगाची आठवण का काढू नये ?? भूतकाळ हा कायम रडकाच असावा का ??

एरवी असे म्हणत असत, भूतकाळ हातून सुटून गेला, भविष्यकाळ आपल्या हातात नाही, उरला फक्त वर्तमानकाळ , तो भरभरून अनुभवून घ्या आणि भविष्याला भिडायला तयार रहा. पण सध्या वर्तमानावरच जर भविष्याची काळी सावली पडली आहे तर कसे जगणार भरभरून ?? केवळ भूतकाळातल्या सुंदर अनुभूतींच्या आधारेच ना ?? तोच एकमात्र आधार आहे प्रत्येकाकडे जगण्यासाठी, हसण्यासाठी, आनंदी होण्यासाठी आणि आठवणी मागे सोडण्यासाठी सुद्धा.

चला तर मग, रोज एक पुरचुंडी बांधुयात एका सुंदर क्षणाची, एका रोमहर्षक आठवणीची, एका सकारात्मक विचाराची, एखाद्य छान जुन्या मैत्रीची, काही निसटलेल्या नात्यांची, काही गवसलेल्या बंधनांची, नव्या-जुन्या खट्या-मिठ्या प्रसंगांची, आपलेपणाची, प्रेमाच्या ओलाव्याची आणि यशाच्या मानाची सुद्धा.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment