Saturday, May 9, 2020

आलीया भोगासी असावे सादर

आलीया भोगासी
असावे सादर

काम करायचे काही वाटत नाही पण तेच काम जेव्हा परीक्षा पहाते तेव्हा मात्र 'मै तेरा खून पी जाऊंगी' वगैरे वाटायला लागते. काही कामे कशी बिनबोभाट होतात पण काही कामांचा आवाका आणि फाफटपसाराच इतका की जीव नको नको करतात.

उदाहरणच द्यायचे झाले तर ही भांडी 'असून अडचण नसून खोळंबा'. तुम्ही कोणत्याही प्रहरी कोणतेही काम करा भांडे धुवायला निघाले नाही असे होतच नाही. केर काढला, कशाच्यातरी खाली केव्हातरी पडलेले भांडे सापडते. फर्निचर पुसा, कोणाची तरी वाटी, ताटली, कप,चमचा, पेला / ग्लास काही न काही मिळणारच. ओटा आवरला, भांडी निघणारच. स्वयंपाक हे तर भांड्यांचे माहेर घरच. 'तुम फोडणी दो, मै भांडी दुंगा' असच तो स्वयंपाक मनातल्या मनात नक्की म्हणत असणार. साधा चहा करा ना, चार (४) तरी भांडी निघणारच. नाश्त्याची वेगळी, दुपारचे जेवण, चारचा चहा, रात्रीचे जेवण. अष्टोप्रहर भांडी, ओटा, फडके, पाणी ,साबण आणि आपण. व्यवस्थित सगळी भांडी घासून, धुवून, पालथी घालून ओटा,गॅस पुसून आपण हाश्शहुश्श करत बाहेर जाण्याचा विचार करावा तर गॅस च्या मागून गरम भांडी ठेवायच्या तबकड्या, चिमटा/पकड किंवा एखादे छोटेसे भांडे आपल्याकडे बघून चक्क वाकुल्या दाखवत असते. त्याच्याशी लढाई उरकून एकदाचे बाहेर पडावे तर एखाद्या टेबलावर, चौपाईवर, फरशीवर कोणीतरी चुकून विसरलेला, कंटाळा आला म्हणून ठेवलेला किंवा नंतर उचलू म्हणून रेंगाळलेला एखादा कप, पाण्याचं भांड नाहीतर वाटी आपल्याचकडे अतिशय कुत्सित नजरेने बघत असते. असलं डोक्यात जात ना त्या भांड्याच ते बघणं. साला, पूर्वजन्मी किंवा सतयुगात कोणा ललनेने एखाद्या भांड्याची कु-चेष्टा केली होती की काय, जो ह्या कलियुगात तो शाप फेडायला जगातल्या तमाम महिलांच्या मागे ही भांडी हात धुवून लागली आहेत ?? बर ह्या भांड्यांचे कापड्यांसारखे नाही, ह्या लॉट मध्ये नाही लागले तर बादलीत ठेवले आणि पुढच्या वेळेस धुतले . बिलकुल चालणार नाही. तुम्ही त्यांना ठेवाच, रागाने इतकी कडक होतील की घासघासून हात झीजून जातील पण भांडी निघतील तर शपथ.

झाडू- पोछा चे बरे असते, एकदा तुम्ही घर झाडले म्हणजे झाडले. विषय संपला. घर पुसले म्हणजे पुसले. पण हा गुण पसाऱ्याच्या अंगी अजिबात नाही. सगळा पसारा आवरला असा गोड गैरसमज करून आपण दुसरीकडे मोर्चा वळवावा तर लगेच कुठूनतरी टॉवेल, चप्पल, बूट, एखादे भांडे, वर्तमानपत्र, पुस्तक, सुई-दोऱ्याचा डबा, कॅरम च्या सोंगट्या, पत्ते, हातरुमाल, मोजा,पेन, इ काहीही कुठूनही येऊन पडते. ठेवणाऱ्याचा कधीच तपास लागत नाही. प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवतो. शेवटी काय पुन्हा पसाऱ्यावरून हात फिरवणे आलेच. धुळीचेही काहीसे असेच. एका खोलीतील धूळ झटक-फटक करून, डेटॉल च्या पाण्याने पुसापूशी करून पुढे जावे तर त्या ओल्या पृष्ठभागावर धुळबाई परत ठाण मांडून बसलेल्याच. आरे खिडकी बंद करा रे , आरे दारे लावा रे, आरे पंखा मोठा करा रे .... 'ए बाई, भीक नको, पण कुत्र आवर, नको तुझी ती पुसापुशी, आम्ही धुळीत एकदम मजेत आहोत' असे म्हणायची वेळ घरच्यांवर येते.

एखादे काम एकदा करून सम्पवून टाकले की बरे वाटते. पण काही कामं चेंगटच असतात. एकदा भिजवा, मग धुवा, परत वाळत टाका, वाळलेले काढून आणा, आणलेले घडी घाला आणि सरतेशेवटी घडी घातलेले कपाटात ठेवा. केवढे ते लांबण. सर्वकाळ चालूच. सकाळी भिजवा ते रात्री कपाटात ठेवा पर्यंत दिवसभर ह्या कपड्याची टूमटुम चालूच. हँगर ला लावायचे वेगळे, सरळ वळत घालायचे वेगेळे, सावलीत वेगळे, उन्हात वेगळे, पांढरे वेगळे, रंगीत वेगळे, निळीत बुडवायचे वेगळे, टिनोपॉल मध्ये वेगळे, स्टार्च करायचे अजूनच वेगळे, नाजूक रेशमी हळूच पिळायचे, लोकरीचे बिलकुल नाही पिळायचे.. किती नाटकं ही.

न्हाणीघर/बाथरूम धुण्याचे अजूनच वेगळे तंत्र. लाल हारपीक, निळे हरपिक, फिनेल, बेसिन धुवायचा ब्रश, बाथरूम धुवायचा ब्रश, कमोडचा वेगळा ब्रश,खालची फरशी पुसायचे फडके, टाईल्स पुसायचे वेगळे, बेसिन चा प्लॅटफॉर्म पुसायचे अजून एक वेगळे.... आरे किती लक्षात ठेवायचे रे. एवढे करून झाले का?.... तर नाही. कोणीतरी म्हणतेच आज डेटॉल नाही टाकले का ? बाथरूम फ्रेशनर सम्पले आहेत का ? डांबराच्या गोळ्यांचा जरा जास्तच वास येतोय,इ. 'बच्चे की जान लोगे क्या?'

आमची आई नेहमी म्हणायची 'हे स्वयंपाकघर सदा व्यायलेलेच असते'. आमचे बाबा समाजकारणात/राजकारणात असल्याने घरी जाणे येणे खूप, त्यामुळे ते स्वाभाविकच होते. पण सध्या तर सगळे आपापल्या घरात स्थानबद्ध आहेत. कोणी कोणाकडे जाऊही शकत नाही. तसेही शहरात विशेष जाणे येणे नसतेच. पण तरीही सध्या ह्या स्वयंपाक घराने नुसता उत आणला आहे. चहा, नाष्टा, मिल्कशेक, लस्सी, दुपारचे जेवण, काहीतरी गोडाचे, चारचा चहा, काहीतरी तोंडात टाकायला चमचमीत वगैरे, रात्रीचे जेवण, इ इ... त्यात आंब्याचा हंगाम, आमरस, आम्रखंड, पन्ह, तात्पुरते लोणचे, गोजे, कैरीची चटणी संपतच नाही यादी. ह्यातून सुटका व्हावी तेवढ्यात कोणीतरी समाजमाध्यमांवर सूप, केक, चीज-चिली टोस्ट, पास्ता पासून जूस , घरगुती वाइन पर्यंत काही न काही चिकटवतात. नेमके तेवढेच मुलांच्या पहाण्यात येते. त्यांच्या अंगात स्वयंपाकी संचारतो आणि ठरवलेला पदार्थ बनवून ते ऐटीत बाहेर पडतात. कौतुकाने स्वयंपाकघरात डोकवावे तर ते अक्षरशः व्यायलेले असते.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment