Wednesday, May 6, 2020

सरस्वती कॉलनी वॉर्ड न.७

सरस्वती कॉलनी
वॉर्ड न.७

चौदा (१४) बंगल्यांची छोटीशी कॉलनी. सरस्वती नाव असल्यामुळे की काय कॉलनी मध्ये मुलीच मुली होत्या. मुलगे अगदी नावालाच, एका हाताच्या बोटावर मोजले तरी बोटे उरावीत इतके कमी. मुलींच्या मात्र झुंडीच्या झुंडी, एक तुकडी लग्न होऊन बाहेर पडली की दुसरी फलटन तयार असायची. दादागिरी, विट्टी दांडू, सार्वजनिक गणपती ही मुलांची मक्तेदारी असलेले प्रांत पण मुलींच्या ताब्यात.

सार्वजनिक गणपती हा कॉलनी चा जिव्हाळ्याचा विषय. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणे, गणपतीसाठी लागणाऱ्या सगळ्या सामानाची यादी बनवणे, यादीबरहुकूम सामान आणणे, मंडप उभारून त्याची आरास करणे, घरी पताका बनवून चिकटवणे ते गणपती आणण्यापासून गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत नानाविध रंगारंग कार्यक्रम बसवून सादर करणे, विविध स्पर्धा घेणे, रोज वेगळा नैवेद्य एकेका घराच्या गळ्यात मारण्या पर्यंत सगळी कामे बिनबोभाट पद्धतशीरपणे मुलीच पार पाडत. बरेचदा कॉलनीतील मुलामुलींना ह्या सार्वजनिक गणेशोत्सवातच आपल्या सुप्त कलागुणांची पहिल्यांदा ओळख होत असे. कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची (event management) तोंडओळख ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानेच झाली. गणपतीबरोबरच माहेरवाशीण गौराई, जेष्ठा आणि कनिष्ठां, चे पण आगमन होत असे. गौरीची आरास आणि प्रत्येकाच्या दारासमोर काढलेली रांगोळी कुठल्याही कलादालनापेक्षा कमी नव्हती.

 महालक्षुम्यांसारखाच चैत्रगौरिला पण 'आरास' चा मान. आमच्या आईची आरास आणि रांगोळी कायमच जगावेगळी आणि उजवी असे. कधी अख्खे एअरपोर्ट तर कधी अगदी खराखुरा दिसणारा मोर आणि बाग... सगळे उद्योग घरातल्या घरात जी उपलब्ध साधने असतील त्यातूनच. टाकाऊ गोष्टींमधून साम्राज्य उभे करण्याची ताकद तिच्यात होती. कॉलनी मधल्या सगळ्या मुली तिच्याकडे कधी न कधी काही न काही शिकायला यायच्याच. त्यामुळे भरतकाम, विणकाम, शिवणकाम, पाककृती, इ अनेक गोष्टींचा क्लास कॉलनी मध्ये कधी कोणाला लावावा लागलाच नाही.

मुलींचा कारभार असल्यामुळे गणपती इतकेच नवरात्रीला पण महत्व. रोज रात्री भोंडला होत असे. भोंडल्याची गाणी सगळ्यांना तोंडी पाठ. कधी,कोणी,कशी शिकवली हे मात्र एकाही मुलीला आठवत नसेल. मातृभाषा शिकावी तसे भोंडल्याची गाणी आपोआप एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत असत. 'आडात पडला शिंपला, आमचा भोंडला संपला' कानावर पडले की खाऊ ओळखण्याची चढाओढ सुरू होई. नऊ दिवस रोज एका घरचा खाऊ. तो सगळ्यांनी मिळून ओळखायचा. 'आपली मुलगी तिच्या मैत्रिणींना जाऊन सांगेन आणि खाऊ चे गुपित फोडेल' ह्या काळजीने घरातल्या-घरात सगळ्या आया गुपचूप खाऊ बनवून लपवून ठेवत असत. जो ओळखेल त्याला पहिला खाउचा मान. नवरात्रीत अजून एक गंमत असे. अष्टमीच्या दिवशी होणारे कुमारिका पूजन. घरोघरी लहान कुमारिकांना जेवायला बोलावले जाई. गोडाचे जेवण, फ्रॉक साठी कापड, बांगड्या, एक फळ, टीकली, गजरा, वगैरे भरपूर मालामाल केले जाई. शिवाय नऊ दिवसांच्या उपवासांमुळे रोज फराळाच्या नवीन नवीन पदार्थांच्या मेजवान्या म्हणजे सोनेपे सुहागा.

दिवाळीचा फराळ आणि खरेदीची मजा काही औरच. ज्याची खरेदी उरकेलं त्याच्या घरी खरेदी बाघण्यासाठी सगळी टोळधाड धडकत असे. फराळ बनवण्यासाठी 'महाराज' येत. एकाच्या कोणाच्या परसदारी मोठमोठी चुलाण पेटत, केवढाल्या त्या कढया, झारे. सकाळपासून भट्टी पेटे ते पार संध्याकाळपर्यन्त. इतके सगळे पदार्थ करून घेतले तरी काही खास पदार्थ घरच्या चवीचेच. चकली, अनारसा, करंजी चा तो 'घरगुती' चा हक्क. फराळाचे पदार्थ बनत असताना चव घेणे हा तर जन्मसिद्ध अधिकार होताच. तरी सुध्दा दिवाळीच्या तीन दिवसात एकमेकांच्या घरी फराळाला जाण्यात एक अवर्णनीय आनंद होता.

नुसते सणवाराला मजा करून गप्प बसतील तर मुली कसल्या. एखाद्या रविवारी टूम निघे, आज सगळ्यांनी एकत्र पोहे करायचे. सगळ्या मैत्रिणींनी आपापल्या घरातून मूठभर पोहे, दाणे, तेल, मिरच्या, मीठ, साखर, कांदे, इ सगळं समान थोडं थोडं करत जमा करायचं. एका कोणाच्या घरी नाहीतर अंगणात चक्क तीन दगडांची चूल पेटवून पोह्याचा फक्कड कार्यक्रम होत असे. काय चव त्या पोह्यांची. कधी कधी पोह्यांची जागा साबुदाण्याची खिचडी, पावभाजी पण घ्यायचे. पद्धत मात्र एकच... सगळ्यांनी सगळं सामान थोडं थोडं घेऊन यायचे. अंगत-पंगत ची पण एक वेगळीच मजा असते. प्रत्येकाने आपले ताट वाढून आणायचे. मराठे काकूंच्या ओट्यावर सगळे एकत्र जेवणार.मंद मंद वाहणाऱ्या गार वाऱ्याबरोबर एकमेकांच्या ताटातला एकेका घासाचा आनंद घेता घेता ती पंचपक्वान्न पोटाची, रसनेची आणि मनाची तृप्ती करत.

सगळं कसं खूप गोड आणि छान वातावरण आणि किती प्रचंड वळणदार मुली वगैरे वाटून घेऊ नका. युध्दावर निघावं तशा कॉलनीतून सगळ्या मुली सायकल घेऊन धाड-धाड निघत तेव्हा कुठल्या सैन्याच्या तुकडीपेक्षा कमी भासत नसत. हेच सैन्य रात्री गुपचूप कोणाच्या कैऱ्या तोड, कोणाचे पेरू पळव, कोणाच्या चिंचा लंपास कर असेही उद्योग करण्यात एकदम माहिर. सगळ्यांच्याच दारात जवळपास सगळीच झाडे होती. पण चोरीच्या मालाला जी चव लागे त्याची सर घरगुती मेव्याला कुठली. बाहेर खाणे, सिनेमा ह्या गोष्टीना आमच्या विश्वात कधीच स्थान नव्हते पण एकत्र अभ्यास कर, मेंदी लाव, एकत्र बागेत खाऊ घेऊन जा, आमच्या शेतावर डबे घेऊन जा, एकत्र सर्कस बघायला जा, श्रावणात केशव गोविंदाला बनात जा असे प्रकार मात्र खूप केले.

हळू हळू कॉलनीला बहुदा आमच्या द्वाडपणाचा कंटाळा आला. एक एक करत सगळ्या मुली सासुरवाशिणी झाल्या आणि लेकींची जागा नवीन आलेल्या सुनांनी घेतली.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment