Monday, May 4, 2020

असतील शिते तर जमतील भुते

असतील शिते
तर जमतील भुते

पैसा, सोन, सत्ता आणि स्थावर भल्याभल्यांना मोहात टाकते. आई-वडिलांना मुलगा दिसत नाही, भावाला भाऊ समजत नाही, मित्राला मैत्रीची पोच रहात नाही की नातेवाईकांना नात्याची ऊब जाणवत नाही. एका गृहस्थांची गोष्ट कानावर आली. चार भावात सगळ्यात उनाड आणि कमी शिकलेला , घरातून हाकलून दिलेला मुलगा जिद्दीने उभा राहातो. व्यवसाय , घर, गाडी , ऑफिस, इ सुबत्ता मिळवतो आणि आईला पान्हा फुटतो, भावांना उमाळा येतो, मित्रांना मैत्री आठवते, नातेवाईकांचा तर पाऊस पडू लागतो. कधी नव्हे ते आपल्याला उभे ही न करणारे इतके जिवलग अचानक मिळाल्याने तो मुलगाही भारावून जातो आणि त्या बेगडी प्रेमाच्या महापुरात वाहून जातो.

'मगरमच्छ के आंसू' चा विजय होतो. त्या मुलाला अक्षरशः पिळून घेतले जाते. कोणी म्हणते घर नाही घर दे, कोणी म्हणते दागिने घडवं, कोणी परदेशी फिरावं, कोणी गाडीचे हप्ते दे म्हणत तर कोणी कर्जदाराचे पैसे फेड सांगत. हळू हळू त्या घराला, घरातल्या लोकांना, स्वार्थी मित्रपरिवाराला आणि लोचट नातलगांना आयत्या मिळणाऱ्या सुखसोयींची इतकी सवय होते की ते आपसातच त्या मुलाच्या हक्कासाठी लढू लागतात. प्रत्येकाचा हे दाखवण्याचा प्रयत्न की 'मीच कसा तुझ्या जवळचा, तुझे हित पाहणारा'. वास्तव मात्र अगदी ह्याच्या उलट. सगळं सुरळीत चालू होतं, व्यवस्थित लुटालूट सुरू होती आणि विनाशकाले विपरीत बुद्धी होऊन त्या कोंड्याळ्याने त्या मुलाच्या लग्नाचा घाट घातला आणि घात झाला.

सुमडीत चाललेली वाटमारी नवीन आलेल्या मुलीच्या लक्षात आली. तिची चूक हीच की तिच्या लक्षात आल्याचे तिने मुलाच्या आणि दरोडेखोरांच्या टोळीच्या लक्षात आणून दिले. झालं... आपसात लढणारे चोर एकत्र आले. महाटोळधाड आघाडीची स्थापना झाली. ती मुलगीच कशी चूक आहे हे वारंवार त्या मुलाच्या कानावर घातले जाऊ लागले. पुनःपुन्हा तिच्या चुकांचे खोटे दाखले दिले जाऊ लागले. तिच्यामुळे आम्ही कसे दुःखात आहोत अशी रडगाणी गायली जाऊ लागली. ती आणि तिचे नातलग कसे आमचा पाणउतारा करतात ह्याच्या खोट्या कथा रचल्या जाऊ लागल्या. मुलगा संसारात रमणार नाही ह्याची व्यवस्थित जाणीवपूर्वक काळजी घेतली जाऊ लागली. मुलाला लूट लूट लुटायचे पण त्याच्या कोणत्याही आनंदात समाधान मानायचे नाही की त्याच्या अडचणीत आधार द्यायचा नाही. वर 'त्या  मुलीला आवडत नाही ना बाबा, म्हणून आम्ही काळ-वेळेला तुझ्या पाठीशी उभे रहात नाही' च्या खोट्या सबबींचा पाढा आहेच. होता होता जमा-खर्चाचा ताळमेळ सुटला आणि एके दिवशी अचानक टोळीच्या दुर्दैवाने मुलाला सगळी संपत्ती सोडून द्यावी लागली. 'कफल्लक मुलाची ही अवस्था त्या मुलीमुळेच झाली' असा शेरा मारून ती टोळधाड आल्या पावली त्या मुलाला वाऱ्यावर सोडून निघून गेली. आज ते गृहस्थ आपली हारलेली लढाई लढतायेत, एकटे .... त्या मुलीच्या साक्षीने.

एखादा पक्ष असो, एखादे कुटुंब नाहीतर एखादी संस्था हे असे अनुभव थोड्याफार फरकाने अनेकजण घेत असतात. आपणही बरेचदा ह्या अनुभवांचे साक्षीदार असतो .. फक्त साक्षीदार. काहीही करू न शकण्याच्या अत्यंत असहाय्य परिस्थितीतले साक्षीदार. का लोक इतके स्वार्थी होत असतील ?? का लोक कोणाच्या इतके आहारी जात असतील?? का लोकांना खरं आणि खोट्यातला फरक समजत नसेल ?? का एखाद्याच्या आयुष्यावर टोकाचा परमार्थ हावी होत असेल ?? का त्या मुलाच्या अंधभक्तीची शिक्षा त्या मुलीने भोगायची ?? का कोणा एकालाही त्या मुलाला समजावून सांगावेसे वाटले नसेल ?? का ती मुलगी खोट्या आरोपांची शिकार व्हावी ?? का समाजाला मध्ये पडून खोटे बुरखे फाडावेसे वाटले नसतील ?? कोणतेच आणि कशाचेही उत्तर नाही. असे म्हणतात 'काळ सर्व प्रश्नांची उत्तरे देतो', 'काळासारखे औषध नाही' वगैरे वगैरे. तोपर्यंतचा प्रवास मात्र ह्या सर्व प्रश्नांसह करायचा... दोघांनी... एकेकट्याने.

कळावे, लोभ असावा

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment