Saturday, May 2, 2020

लोकल .. की ग्लोबल ??

लोकल ..
की ग्लोबल ??

गेले दीड महिने सगळा देश एकोप्याने आलेल्या संकटाचा सामना करतो आहे. स्वातंत्र्य संग्रामानंतर येवढा एकोपा पूर्वी अभावानेच अनुभवला असेल. शहर, गाव, सोसायट्यांमध्ये तू तू मै मै जाऊन कुटुंबाचा सलोखा आणि जिव्हाळ्याचा सगळे अनुभव घेत आहेत. कोपऱ्यावरचा किराणा दुकानदार तर घरातला एक सदस्यच वाटू लागला आहे. 'मेडिकल दुकानदार' चे 'मेडिकल काका' झाले आहेत आणि भाजीवाल्याला पाहून 'तुझमे रब दिखता है...' वाटायला लागले आहे. हा सगळा बदल होत असताना, एक गोष्ट मात्र गायब आहे ...... 'आपले जिवाभावाचे ब्रँड्स'.

कुठे आहेत मॅक डोनाल्डस, पिझ्झा हट, डोमिनोझ, के इफ सी ने लावलेले लंघर ?? कुठे आहेत त्या विदेशी कम्पन्या ज्यांचे खिसे भरून आपले आणि पर्यायाने आपल्या देशाचे दिवाळे निघाले ?? देशासाठी मदत करण्याची वेळ आली तर टाटा , अंबानी, बिर्ला आणि मूर्तीच आले ?? मॉल मध्ये मोठ मोठे पोस्टर लावून खोटा मोठेपणा मिरवणारे ते सगळे विदेशी ब्रँड्स गेले तरी कुठे ?? किमान जेवढा व्यवसाय आमच्या देशात केलात त्या नफ्याच्या एखादं टक्का तरी खर्च करायचा होतात ह्या प्रसंगी. 'खायला आधी आणि कामाला कधीमधी' असे कसे चालेल ??

जर माझ्या वाईट प्रसंगात माझे कुटुंबच धावून येणार असेल तर माझ्या सुखात, आनंदात, यशात आणि सणवारात सामील होण्याचा पहिला मान त्यांचाच. 'स्वदेशी चळवळ' तशी जुनीच पण विस्मरणात गेलेली. कुंभाराच्या मातीच्या पणत्यांपेक्षा चिनी चमचमणारे दिवे भारी वाटू लागले, खादी-कॉटन च्या देशी कापड्यांपेक्षा 'मेड इन अमेरिका/इंग्लंड/कोरिया/जर्मनी' आपली शान वाढवू लागले. चप्पल , बूट, पावडर, साबण, ब्रश, पेस्ट पासून घरातल्या गादया, पडदे, सोफे,काटे-चमचे-ताटल्या ते गाडी, aap, दूरचित्रवाणी सगळाच पैसा बाहेरच्या कंपन्यांच्या खिशात जाऊ लागला. हातगाडी आणि छोट्या दुकानातले पोहे,उपमा,शीरा, बर्गर,पिझ्झा आणि पास्ता समोर अगदी गरीब भासू लागले. बऱ्याचशा विदेशी कंपन्यांनी काडी पासून माडी पर्यंत सगळ्या गोष्टी 'सर्व्हिस/सेवा' च्या नावाखाली आम्हाला घरपोच आणून आमच्या आळशीपणात आणि आमच्या देशाच्या गरिबीत भर घातली. त्या सेवेची भारी किंमत आपण आणि आपला देश मोजत होता. 'देरे हरी खाटल्यावरी' प्रवृत्तीने आमची घराजवळच्या, चौकातल्या, गावातल्या दुकानांशी नाळ तुटली आणि आम्ही 'ब्रँड/ सर्विस(सेवा)/ स्टेटस' च्या व्यसनात गुरफटत गेलो. आम्ही केलेल्या चूकांची लागण नकळत पुढच्या पिढीला झाली. आम्हाला निदान देशी-विदेशी मधला फरक तरी माहीत होता. पुढची पिढी 'ब्रँड्स' मधेच वाढली आणि त्यांना ते आपलेच, आपल्या मातीतलेच वाटायला लागले. आम्ही विसरूनच गेलो त्यांची आपल्या मातीशी ओळख करून द्यायला. विदेशी कंपन्यांना तेच तर हवे होते. अजूनही आम्ही कसे इंग्रजांनी आखून दिलेले शिक्षणच घेतो अशी नाके मुरडत असताना शिक्षणाबरोबरच त्या पिढीचे आयुष्यच आम्ही विदेशी करून टाकले. 'आमच्या देशाने आमच्यासाठी काय करावे' अशी तावातावाने चर्चा करत असताना 'मी माझ्या देशासाठी काय करतो' हा विचार मागे पडू लागला.

कोरोना महामारीने झणझणीत अंजन डोळ्यात घातले आहे. डोळे उघडण्याची आणि शहाणे होण्याची वेळ आली आहे. आपल्या सोसायटीमध्ये, गावात, शहरात आपल्या जवळच्या दुकानातच रोजचे गरजेचे जिन्नस खरेदी करूयात. किमान ज्या गोष्टी माझ्या शहरात/ देशात तयार होतात त्या तरी मी भारतीय कंपनीच्याच वापरेल असा दृढ निश्चय करूयात. जिथे पर्यायच नाही तिथे शक्यतो माझ्या देशाच्या मित्र राष्ट्रांचाच मी विचार करेल असे मनोमन ठरवूयात. मी खरेदी करतो/ते म्हणजेच मी माझ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावतो/ते आणि माझ्यावाटची देशसेवा करतो/ते असा विचार समाजमनात रुजवूयात. परदेशी वस्तू विकत घेणे आणि वापरणे हा माझ्या देशाशी देशद्रोह आहे हे पुढच्या पिढीला शिकवूयात. जे हातून निसटून गेले त्यातुन धडा शिकून पुढच्या पिढीचे तरी भविष्य सावरूयात. चला.... आपण आपल्या देशसेवेचा खारीचा वाटा उचलूयात. माझ्या देशाला आर्थिक स्थैर्य मिळवून देणे हे माझे परम कर्तव्य आहे आणि ते मी जबाबदारीने पार पाडणार अशी प्रतिज्ञा करूयात.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment