Monday, April 13, 2020

आजची पत्रकारीता
 नारायण नारायण ...

तसे सध्या कोरोनाच्या सावलीत आपले पत्रकार मित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यापर्यंत बातम्या आणत असताना आज त्यांच्याबद्दल कडू-गोड लिहीणे बरे नाही .... पण

एक वृत्तवाहिनीवर लॉकडाऊन मूळे कसा दूध उदयोगाला फटका बसला आहे हे सांगत असताना त्या पत्रकार मित्राने सहज सुरात म्हंटले 'ह्या ज्या सर्व 'गाया' तुम्हाला इथे ....... वगैरे'.
गाया ? बर पात्रकार मित्र शहरी पण नव्हता. शाळेत गुरुजींनी 'एक गाय, अनेक गाई' घोकून घेतले की नाही ???
अजून एक पत्रकार मैत्रीण एका अभिनेत्याला 'तू खरच खूप 'गो थ्रू' केलेस म्हणाली' म्हणजे नेमके काय केले असावे अजूनही लक्षात येत नाहीये. लॉक डाऊन मध्ये नेमके काय गो थ्रू आणि कसे ??मायबोलीत सांगितले तर फार बरे होईल आमच्या सारख्या बापड्यांना. नाहीतर आमची वृत्तवाहिनी 'मिंगलीश' आहे असे तरी जाहीर करा.

अजून एक फार गम्मत असते ह्या वाहिन्यांची, मा. पंतप्रधान किंवा मा. मुख्यमंत्री दूरचित्रवाणी वर दर्शन देऊन गेले की निवेदक किंवा निवेदीका एखाद्या दुउऊऊउऊऊऊर असलेल्या त्यांच्या पत्रकार मित्राला किंवा मैत्रिणीला 'बोल सदाशिव, आताच माननीय ..... यांनी जनतेला उद्देशून जे संभाषण केले त्याबद्दल तुझे काय मत आहे?' ... आपण उत्सुकतेने कान टवकरतो 'कोणीतरी अभ्यासू सदाशीवराव काहीतरी छान बोलणार, तर गेल्या कित्येक दिवसात व्हाट्स अँप ची पाने वगळता एकही पुस्तकाचे पान न उलटलेला, स्पष्ट शब्दोच्चारही न करणारा, पुरेसा शब्दसंग्रह नसलेला कोणी एक दिनवाणा सदाशीव आपल्याला आताच मा. ......... काय म्हणाले हे सांगायचा केविलवाणा प्रयत्न करतांना आपल्या तोंडावर फेकून मारला जातो. समोर ऐकणारे दर्शक अतिशय मठ्ठ असतात असा काही गोड गैरसमज आहे का रे ह्या वृत्तवाहिन्यांचा ??

एक ह्यांचे बरे असते, जगात काहीही घडो ह्या वृत्तवाहिन्यांचे काही ठराविक लोकांशी 'वार्षिक करार' असल्याप्रमाणे तीच तीच डोकी परत परत जगातल्या सर्व विषयावर 'तावातावाने' बोलायला धरून आणतात. त्यांचे काम एकच पहिला वक्ता जर 'हो' म्हणाला तर दुसर्याने 'नाही' म्हणायचे , तिसर्याने 'नरो वा कुंजरो वा' असा ठेका धरायचा, आणि चौथ्याने विषयाला सोडून बोलायचे. निवेदक अधून मधून तुमच्या सगळ्यांपेक्षा मलाच कशी जास्त अक्कल आहे हे दाखवत रहातो, त्याला सगळ्यांच्या अंगावर ओरडण्याचा अधिकार पण असतो . स्वाभावीकच आहे, तो वाहिनीकडून आहे.... ज्याची बॅट,त्याची बॅटिंग.

पूर्वी वृत्तपत्रातील बातम्या छपाई च्या आधी 'प्रूफरीडर' च्या चाणाक्ष नजरेखालून जात असत. हल्ली महागाई इतकी वाढली आहे की 'कॉस्ट कटिंग'/ 'काटकसर' च्या नावाखाली ह्या प्रूफ रीडर ला बहुदा डिच्यु दिलेला दिसतोय. ती गरिबी मग वृत्तपत्राच्या ओळीओळीतून डोकावते आणि त्या लक्त्ररातून आम्ही जगात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो. कसे सुधारणार आम्ही ??

एक पोटतिडकीची विनंती आहे ... दोनदाच बातम्या सांगा, पण सुयोग्य व्यक्तीला नियुक्त करा. एक वाचनालय तुमच्या वाहिनीत उभे करा. दिवसभरात कमीत कमी दहा (10) पाने तुमच्या पत्रकारांना वाचायला लावा. ज्या विषयावर बिलायचे आहे , त्याचा आधी अभ्यास करा. बातम्या सांगण्याआधी एकदा नजरेखालून घाला. तुमची त त प प बघायला नाही लावली जात तुमची वाहिनी. तुमचे कपडे , तूमची रंगरंगोटी काहीही फरक पाडत नाही, फरक पडतो तो फक्त तुमची शब्दांवर असलेली पकड आणि तुमचे वाचन ह्यांनी.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment