Wednesday, April 29, 2020

तू सुखकर्ता तू दु:खहर्ता ..

तू सुखकर्ता
तू दु:खहर्ता ..

'सामाजिक विलगिकरणाचे भान सांभाळण्यासाठी सर्व मंदिरे बंद'.
माझ्यावर कोणतेही, कितीही भयावह संकट आले तरी माझ्या पालकांच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी कधीच बंद होणार नाहीत. मग तो तर जगाचा कैवारी. 'दर्शन बंद' मान्य. पण मदत ... ती का बंद ?? वर्षानुवर्षे ज्या भक्तांनी तुझ्या चरणी भोग चढवला, आज ते संकटात असताना त्यांना मदतीची गरज असताना, त्यांनीच भरलेल्या भांडारातून उलटे दान देण्याची तू का नाही तुझ्या चौकीदारांना बुद्धी देत ??

वृत्तवाहिन्यांनाही का नाही हे कळू की आपण चूक-बातमी देत आहोत. दरवाजे बंद चे काय ते भूषण ? ज्या मंदिरांनी आजूबाजूच्या परिसरातील कामगार, शेतकरी, कामकरी, बेरोजगार, वयस्क, आजारी लोकांची जबाबदारी घेतली त्यांची बातमी जरूर करावी. काहीही न करता तोंड लपवण्याची काय ती बातमी? गुरुद्वाराने अमुक केले, तमुक केले ... किती वर्षे फक्त हेच सांगणार ? अहो , वर्षानुवर्षे प्रत्येक प्रसंगात फक्त गुरुद्वारेच आपले दरवाजे उघडे ठेवतात. त्यांचा आपण कधी आदर्श घेणार ?? "देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावे". विंदांची ही कविता काय फक्त शाळेत शिकवण्यापूरतीच ??

'अमुक मंदिरात इतक्या करोड चे दान, तमुक मध्ये तितक्या करोड चे' ह्या बातम्या जेव्हा तुम्ही दाखवतात तेव्हा त्या मंदिर न्यासाचे ताबेदारच तुम्हाला आमंत्रित करून आकडेवारी देतात ना ? मग अशा कसोटीच्यावेळी त्या न्यासाच्या सभासदांना तुम्ही का नाही विचारत 'किती, काय आणि कोणाला मदत केली ' म्हणून ?? तेव्हा का फक्त 'दरवाजे बंद' सांगून समाधानी ?? परवा पुण्याची एक बातमी होती 'गणपती बाप्पा ला दरवर्षी लाखो आंब्यांची आरास असते मात्र ह्या वर्षी फक्त 101 आंबे अर्पण केले'.... का?? जेव्हा की ह्याच वर्षी आंब्याला उठाव नाही शेतकरी मरतो आहे , अशावेळी लाखो नाही करोडो आंब्यांची खरेदी करून त्याचा प्रसाद लोकांना का नाही वाटला ?? का कोणत्याही संस्थान ला शेतकऱ्यांकडचे टरबूज, खरबूज, आंबे, कांदे, टोमॅटो, काकडी, कोबी, गहू, डाळ, इ गोष्टी विकत घ्याव्याशा वाटल्या ?? बर ह्यांच्याकडे साठवणीला जागा नाही असेही नाही. का नाही भुकेल्या पोटाचा , रिकाम्या हातांचा, वावरातल्या पिकाचा तारणहार झालात ?? 'एरवी प्रासादालयात इतके भाविक जेवले, तितके अन्न शिजले' बातम्या प्रसवणारे तुम्ही का नाही आज तितकेच अन्न तुमच्याकडे शिजताना दिसत?? का नाही गरजू तुमच्याकडे पोटाची खळगी भरताना दिसत ?? का पोलिसांच्या मदतीला तुमच्या संस्थान मध्ये सेवा देणारे हात धावत?? का दवाखान्यातल्या अपुऱ्या सोयी सुविधांसाठी तुमची ओंजळ रीती होत ?? का नाही संकटकाळी तुमचा आधार वाटत ?? का पिकाबरोबर शेतकरी मरतो ?? का कामकरी तुमच्या आश्रयाला न येता, मजल दरमजल करत त्याच्या गावी जातो ?? का दवाखान्यात अपुऱ्या सुविधांमुळे कोणाचा जीव जातो ??

 तुमच्याकडे 'अर्थ' आहे का?  हो मुबलक, जागा आहे का? हो कित्येक एकर, तुमच्याकडे सेवेकरी आहेत का ? तर हो शेकडोंनी आहेत .... मग जीवनमरणाच्या ह्या लढाईत तुम्ही कुठे आहात?? कुठे आहेत ती दानपात्रे, त्या मोठमोठ्या मंदिराच्या आणि प्रासादालयाच्या इमारती , त्या जेवणावळी ??
 लांबून लांबून प्रवास करून तुमच्यावर विश्वास आहे म्हणून भाविक येतात. किंबहुना येत होते असे म्हणू, आता नाही शक्यता वाटत. कारण आमची वेळ सांभाळायला आमच्या देवघरातला देवच सोबतीला आला. त्याच्या समोर ठेवलेल्या दानपात्रानेच आमच्या अर्थकारणाला टेकू दिला, तुम्ही बसलात दारे लावून. का ? .... आम्ही आजारी आहोत म्हणून ? आम्ही अडचणीत आहोत म्हणून ? की आमच्यामुळे तुम्हाला विटाळ होइल म्हणून ?

आम्ही आमच्या देवघराच्या साथीने आमची लढाई लढू आणि जिंकू सुद्धा. आणि परत तुमचे दानपात्र भरायला येऊ. मूर्तीला सोन्याचा मुलामा, मंदिराला चांदीचा गिलावा करू. आम्ही आहोत तुमच्यासाठी, तुमची हौसमौज भागवण्यासाठी. आमची वेळ साजरी करायला तुम्ही नाही आलात तरी चालेल, पण आम्ही येणार, ह्या गैरसमजातून आता बाहेर पडायची वेळ आली आहे.
आता बहुदा आमच्या देवाच्या आणि देवत्वाच्या व्याख्याच बदलतील. कदाचित आम्ही माणसात देव पाहू, माणुसकीची संस्थाने उभी करू ... जगलो वाचलो तर.

कळावे, लोभ असावा.

- ॲड. स्वाती आवटी दीक्षित

(ता.क. मी संघाच्या मुशीत आणि हिंदुत्वाच्या संस्कारात वाढले. मी डाव्या विचारांचा पुरस्कार करणारी व्यक्ती नाही. कोणाच्याही भावना दुखवण्याचा ह्या लेखाचा हेतू नाही. तक्रार देवाबद्दल नाही तर देवस्थानांबद्दल आहे हे लक्षात घ्यावे. 'आपलीच श्रद्धास्थाने का आठवतात, इतरेजनांबद्दल का बोलत नाही?' असे प्रश्न विचारणाऱ्यांना आधीच सांगते 'वेळ प्रसंगी आपण आपल्या आई वडिलांकडे जातो , शेजाऱ्यांकडे नाही' आणि माझ्या श्रध्दास्थानांबद्दल इतरांनी बोललेले जर मला रुचणार नसेल तर मीही इतरांबद्दल न बोलण्याची काळजी घेतलीच पाहिजे. तसेही दान धर्म करायला मी माझ्याच शक्तीपीठांकडे जाते तर वेळ प्रसंगी त्यांच्याकडूनच अपेक्षा करणार. उगाच त्यावरून वाद घालू नये.)

No comments:

Post a Comment