Wednesday, April 15, 2020

बुरी नजर वाले
तेरा मुंह काला

बघतोस काय रागान गाठलंय तुला वाघान, मै चली मै चली, आई-आण्णांचा आशीर्वाद, हॉर्न ओके प्लिज, काळूबाई च्या नावानं चांगभल, थांब लक्ष्मी कुंकू लावते असे अनेक उच्च दर्जाचे साहित्यिक वाक्य-प्रकार शुद्धलेखनाच्या नियमांना तिलांजली देत मिरवणारे ट्रक आणि त्याचे चालक हा एक वेगळ्याच विश्वातून आलेला प्रकार. आमचे श्रीरामपूरचे लोक ट्रक, टेम्पो, बैलगाडी असा भेदभाव मानत नाहीत. सगळ्यासाठी आमच्याकडे एकच शब्द 'उसाची गाडी'. चारी वेषींवर चार साखर कारखाने मिरवत असल्याचाच बहुदा परिणाम. काजळे काकांनी टेम्पो घेतला आणि पुढे जाऊन ट्रक ड्रायव्हर व्हायचे निश्चित झाले. पुढे काकांच्या टेम्पो बरोबर हे स्वप्नही हरवून गेले.

त्यानंतर ह्या जमातीशी सम्बन्ध आला तो लग्न झाल्यावर ठाणे-नाशिक चकरा सुरू झाल्यावर तेही शक्यतो कसारा घाट ओलांडताना. पूर्वी ठाणे-नाशिक, ठाणे-पुणे चार (४) ते आठ (८) कितीही तास वेळ लागत असे. अशा वेळी सोबत होती ती ह्या ट्रक ची आणि त्यांच्या केबिन मध्ये लावलेल्या गाण्यांची. काही काही ट्रक चालक अतिशय रसिक असत. मस्त शेरोशायरी लावून ठेवलेली असे , मग मात्र तुंबलेले ट्राफिक कॅसेट संपेपर्यंत निघूच नये असे वाटे. हल्ली सारखे पूर्वी चालकाचे केबिन वातानुकूलीत नव्हते, त्यामुळे ही मेजवानी आपोआपच मिळत असे. त्यांचे एक बरं असत ट्रक चालवला तर चालवला, कंटाळा आला रस्त्याच्या कडेला थांबले, शिदोरी सोडली, मडक्यात काहीतरी शिजवले आणि मस्त वन भोजनाचा बेत केला. लहान अद्वैत ला नेहमीच त्यांच्याबरोबर जेवणाची इच्छा असे.

आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे सगळे जग बंद असताना त्या बंदीवासातल्या जगाचे पोट भरण्यासाठी हे ट्रक आणि टेम्पो चालक अहोरात्र पळतायेत. डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार ह्यांचे कष्ट दिसून येतात. त्यांना श्रेय देताना अजून दोन (२) लोकांना विसरले जाते आहे का? एक(1) औषधे, भाजी आणि किराणासामान घेऊन येणारे ट्रक-टेम्पो चालक आणि दुसरे ती औषधे, भाजी व वाण सामान आपल्यापर्यंत पोहोचवणारा दुकानातील कामगार वर्ग. आज खिडकीतून नाशिक हायवे वर पळणारे ट्रक पाहताना विचार आला, ह्या चालकांना काही कवचकुंडले मिळाली आहेत का ? त्यांना लागण होऊ शकत नाही ? त्यांच्या घरच्यांना त्यांची काळजी नसेल ? अश्या कठीण प्रसंगी त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर रहावेसे वाटत नसेल ? आम जगापासून तुटलेल्या ह्या जमातीबद्दल तसेही सर्वसामान्य जनतेला विशेष माहिती नसते. हे सर्व चालक कुठे रहातात, कुठून येतात काहीच तपास नसतो. पूर्वी शक्यतो सरदारजी ट्रक चालक असायचे. उंचच्या उंच, दाढी-मिशी वाले, रुबाबदार... थोडे भीतीदायक. ढाबा ह्या प्रकारावर खरा हक्क तो ह्या सरदार चालकांचाच. हल्ली हा नियम बदलल्या सारखा वाटतोय, इतर लोकांना पण ट्रक चालवण्याचा परवाना देत असावेत. एक क्षण मनात विचार आला, साथीच्या भीतीने ह्या चालकांनी, मेडिकल आणि किराणा भाजी दुकानातल्या कामगारांनी काम करायला नकार दिला असता तर? कोरोना राहिला दूर पण औषधावीना आणि भुकेनेच अर्ध्या जनतेचा बळी गेला असता. धन्यवाद देवदूतांनो !!

कळावे, लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment