Tuesday, April 7, 2020

लेक लाडकी या घरची,
होणार सून मी त्या घरची.

दूरदर्शन च्या वाहिन्या बदलता बदलता अचानक अभिनेत्री अलका कुबल दिसल्या. विचार आला हल्ली कौटुंबिक अत्याचाराचे सिनेमे निघत नाहीत का ? की बाहेर समाजात होणाऱ्या अत्याचारावर लिहिता लिहिता लेखक घरगुती अत्याचार हा विषयच विसरले ?
की घरगुती अत्याचार हा प्रकार सपंला असे वाटते आहे की काय लोकांना?

'बेटी बचाव , बेटी पढाव' म्हणताना नेमके कोणती बेटी बचाव अभिप्रेत आहे ? जन्माला येऊ घातलेली की जन्मलेली?
चला हाच मुद्दा पकडून आपणच एका चित्रपटा साठी कथा लिहुयात.
साधारण नायक सुरवातीची नावे वगैरे संपेपर्यंत मोठा होतो आणि चित्रपट सुरू होतो. ह्याच धर्तीवर आपण आपली 'बेटी' लग्न होऊन सासरी आलेलीच दाखवु.

लग्न होऊन नवरा नवरी दारात उभे आहेत , घरात सगळी पाहुणे मंडळी दिसतात, घरातले कोणीच नाही, मोठी जाऊ दमली म्हणून कार्यालयातून सरळ माहेरी गेलेली असते आणि सासूबाई दमून गोळी घेऊन झोपलेल्या असतात हे नंतर कळते. घरात जावे की नाही, दारात माप ठेवलेले नाही ,मग ओलांडणार कसे? बरे आपली 'बेटी' शिकलेली तिला चालले असते मापाशिवाय आता गेलेले पण ह्या लोकांना नाही चालले तर,उद्या काही बोलले तर ? दोघेही 15 मिनीट झाले बाहेरच उभे. मामे नणदेने अडचण ओळखली आणि पटकन एका भांड्यात मिळेल ते धान्य घेऊन माप तयार करून उंबर्यावर ठेवले आणि नवदाम्पत्याची सुटका केली.

स्वागतच असे तर पुढे काय आणि कसे ?? मजा येतेय लिहायला.

आपल्या बेटी च्या लग्नाच्या दोनच दिवसांनी तिच्या चुलत भावाचे लग्न असते , पूजा झाली नाही ह्या कारणाने तिला पाठवले जात नाही. पहिल्यांदा माहेरी जाऊन येते तर आल्या आल्या एक एक धक्का तिची वाट पाहत असतो. ज्या लग्नासाठी तिला घाई घाई बोलावले जाते त्या लग्नातला रुखवत म्हणजे तिचाच सगळा रुखवत मांडलेला असतो. लग्नाहून घरी जातात तो नवऱ्याच्या नावाचे समन्स तिच्या हातात पडते. पुढच्या आठ दिवसात नवरा मुलगा व्यसनाधीन असल्याचेही लक्षात येते. नुसता व्यसनाधीन नाही तर भांडकूदळ आणि आई च्या ताटाखालचे मांजर पण निघतो.
ह्या नवऱ्या मुलालाच आपल्या गोष्टीचा खलनायक करूयात का?
जोडीला त्याची आई, भाऊ आणि वहिनी ... झाली खलनायकाची टोळी तयार.

गोष्टीत मालमसाला पण हवाच ना, आपल्या 'लेकी' ला दिवस जातात, ते मूल ठेवण्या न ठेवण्यावरून घरात चर्चासत्रे झडतात. दिवस गेले असताना खालून पाणी आणणे, घरातली सगळी कामे, मशीन असतानाही हाताने कपडे धुणे, जाऊ तेव्हा पॅड न वापरता कापड वापरत असे, तो घाणेरडा कपडा सगळ्या कपड्यात भिजवून धुवायला लावणे सारखे तिचे हाल आपण दाखवू शकतो. बर आपल्या बेटीला हे सगळे त्या नवऱ्या मुलाला सांगायची चोरी. कारण ते बाळ लगेच सगळ्या गोष्टी आई ला सांगणार आणि आई भावाला. मग रात्री व्यसनाधीन नवऱ्याचे तमाशे. त्यापेक्षा न सांगितलेले बरे असा ती विचार करते. अजून तडका हवा असेल तर तिच्या नाष्ट्याच्या ताटलीत पाणी टाकणे, तिचे वाढलेले ताट कामवाल्या बाईला नेऊन देणे ,इ प्रकार दाखवता येतील.

भावनिक नाट्य काहीतरी हवे इथे ...
ह्या सगळ्या ताणतणावाने असेल पोटातले बाळ खाली सरकते. डॉक्टर म्हणतात टाके घालावे लागतील. सासूबाई आपल्या लाडक्या लेकरास फर्मान सोडतात, पाहिले बाळंतपण माहेरी असते, तिकडे नेऊन सोड.
परमेश्वराचे अस्तित्व दाखवणे पण जरुरी आहे हो ..
त्या परमेश्वराच्या कृपेने नवऱ्या मुलाचीच कसली तरी शस्त्रक्रिया करावी लागते. सगळी धावपळ आपली बेटी करते. मोठा भाऊ (जेठ) आपल्या 'बेटी' ला सांगतो , तुझ्या नवऱ्याची समस्या काही बरी होणारी नाही,तू त्याला कायमचे सोडून निघून जाऊ शकतेस.
आरे... काय घोळ झाला? आपण तर भावाला खलनायकाच्या टोळीत टाकले होते मग तो आपल्या बेटीच्या चिंतेत तिच्या बाजूने कसे बोलला बरे? गोष्ट चुकली की काय ? की दाल मे कुछ काला है ??
बरोब्बर .. अख्खी डाळच काळीं निघाली. धाकट्या भावाचा पैसा आपल्याला मिळावा , त्याने त्याच्या संसारात रमू नये म्हणून मोठ्या भावाने खेळलेली ती चाल असते. (ढयानतड्यांग - संगीत)

नवऱ्या मुलाची प्रगती झपाट्याने होतेय. ते पाहून सासूबाई, भाऊ आणि वहिनी एकदम नाराज , शत्रूपक्षात चलबिचल ... काय करावे ? ही प्रगती आपल्याकडे कशी ओढून घेता येईल ? जोरात खलबते चालू. नवऱ्या मुलाच्या कानात बेटी विरुद्ध शिसे ओतणे, बेटीच्या सतत तक्रारी करणे आणि नवऱ्या मुलाचे घर कसे भांडत राहील ह्याची काळजी घेणे सुरूच.

आपण खलनायकाची टोळी तर तयार केली पण आपल्या लेकीची तिला पाठराखण करणारी कोणी माणसे असतीलच ना!
'ह्या लोकांना चांगला धडा शिकवं , बिलकुल हार मानू नकोस , आम्ही तुझ्या पाठीशी आहोत' असे काहीही न सांगणारी उलट 'हे ही दिवस जातील' असे समजावणारी सोज्वळ आई , बेटीच्या प्रत्येक प्रसंगात तिच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणारी बहीण, काही मैत्रिणी अशी टीम इकडे तयार करू.

चित्रपटाला थोडा वेग हवा नाहीतर मजा येत नाही...
आता सुरू होते संकटांची मालिका .. मुलाचा अपघात , त्यातून त्याचे वाचणे , तिची त्याला उभे करतानाची फरफट, नवऱ्याची मदत न करण्याची अडेलतट्टू भूमिका , सासू आणि जावेच्या चुगल्या , व्यसनाच्या अमलाखाली होणारी रोजचीच भांडणे आणि कटकटीं. हे सगळे सहन न होऊन आपली बेटी घराबाहेर पडायचे ठरवते. परत शिक्षण सुरू करते. त्यात ती यशस्वी होताना दाखवुयात, तिचे शिक्षण पूर्ण होऊ नये म्हणून निर्माण केलेले अडथळे,इ मसाला टाकता येईल. आपली बेटी त्यातूनही मार्ग काढून शिक्षण पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करते आणि ऐन परीक्षेच्या वेळी कळते तीला दिवस गेले आहेत. परीक्षा देता येणार नाही.

मध्यंतर...
लोकांना थोडे चहा ,समोसे खाऊन येऊ देत. पुढे उसासे सोडायला ताकद हवी.

मध्यंतरानंतर चित्रपटाने जरा वेग घेणे अपेक्षित...
मुलीचा जन्म , बाळाने श्वास न घेणे , त्यातून त्याचे वाचणे आणि सुरू होते तारेवरची कसरत. लहान मुलगा त्याचे जग ,नवीन बाळ त्याची काळजी , घरातले वातावरण तसेच कटकटीनी भरलेले, स्वतःचे शिक्षण आणि पायावर उभे राहणे . ही सगळी सर्कस चालू असतानाच आपल्या बेटीचाच अपघात होतो. शत्रक्रिया करावी लागते पण नवरा मुलगा मित्रांबरोबर परदेशी पिकनिकला निघून जातो. मागे उरतात लेक , छोटा मुलगा, लहान बाळ , बहीण आणि मैत्रीण सगळे सोपस्कार करायला.
इथे अडचणींची मालिका सुरू करूयात ...
अपघात, शस्त्रक्रिया , डेंग्यू आणि हृदयविकार एकामागे एक हात धुवून आपल्या बेटी च्या मागे लागतात. प्रत्येक वेळी होणारी ससेहोलपट, आई व बहिणीची घ्यावी लागणारी मदत , त्यांचा सासरदारी होणारा अपमान,इ गोष्टी फोडणीला हव्याच.

इथे खरे म्हणजे 'बेटी बचाव' म्हणणे जरुरी आहे.... असो.

आपली बेटी लढवैय्यी , ती वाट पहात नाही कोणीतरी मला वाचवेल ह्याची. लढते आणि  स्वतःला ,मुलाला ,मुलीला उभे करते. हे सगळे चालू असताना आपली खलनायकाची टोळी काही गप्प नाही बसली बर का...त्यांचे त्रास देणे चालूच आहे . त्यांच्या टोळीतील एक सदस्य, नवरा मुलगा, आहेच ना त्यांच्या संगण्याप्रमाणे त्रास द्यायला इकडे. पण आपली बेटी त्यांनाही पुरून उरते. मित्र-मैत्रिणींच्या सोबतीने व्यवसायात , सामाजिक कार्यात यशस्वी होते. नाव कमावते , मुलांच्या पाठीमागे ठाम उभी राहते आणि साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होते.

इथे थांबूयात..... अडीच तासात किती दाखवणार ?
उरलेली गोष्ट भाग-2 साठी.
क्रमशः

कळावे, लोभ असावा

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment