Sunday, April 26, 2020

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

एकमेका सहाय्य करू
अवघे धरू सुपंथ

एक काळ होता, घर आणि घरातल्या जबाबदार्यांची सहज विभागणी होत असे. घर आणि संबंधित कामे फक्त स्त्री ची कधीच नव्हती. उलटपक्षी घरातला प्रत्येक सदस्य घरकामात हातभार लावत असे. त्यामुळे 'घर व्यवस्थापन' पर्यायाने 'कुटुंब व्यवस्थापन' सहज आणि नैसर्गिक होत असे. अगदी साध उदाहरण द्यायचे तर उंच फळीवर ठेवलेला डबा काढण्यासाठी सहजच कोणालातरी हाक मारून डबा काढून घेतला जाई, बागेला पाणी घालणे, बाजारहाट करणे, देवपूजेला फुले तोडून आणणे, विशेष प्रसंगी उंचावर ठेवलेली जास्तीची भांडी काढून देणे, घराची सजावट, पै पाहुण्यांना एसटी स्टँड वरून आणणे , नेऊन सोडणे, साधं चहा- नाष्टा भरून ट्रे दिवाणखान्यात नेला तर पटकन कोणी घरातल्या स्त्री च्या हातून तो ट्रे घेऊन सगळ्यांना चहा-नाष्टा देऊन ट्रे आत नेऊन ठेवत असे. एकमेकांच्या घरी जाणे-येणे, एकमेकांना मदत करणे हा सहजीवनाचा रुळलेला मार्ग होता.

कशी कुठे माशी शिंकली आणि घर व घरासंबंधी सर्व जबाबदार्या एकट्या स्त्री च्या वाटी आल्या. चोवीस तास पुरेनात मग त्या जगन्मातेला. त्यातून जन्म झाला मानसिक आणि शारीरिक ताण तणावांचा. चिडचिड करणे तिचा स्थायीभाव झाला. एकदा घरखर्च दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली असे मानणारा पुरुषवर्ग उदयास आला. घरातल्या जबाबदाऱ्यांतून मोकळा झालेला पुरुषवर्ग त्यांचे रिकामपण एखादा व्यासंग,  सामाजिक-राजकीय कार्य, वाचन, व्याख्याने किंवा व्यसनात व्यतीत करू लागला. घराबरोबरच मुलांशीही त्यांनी नाळ कापून घेतली, पर्यायाने मुलांची जबाबदारी पण सहजच त्या माऊलीच्या खांद्यावर स्थिरावली.  घरातल्या स्त्री ची होणारी ससेहोलपट वाढणारी पिढी बघत होती. ठरवून नाही पण आपोआपच 'आपण स्वतःला ह्या रामरगाड्यात अडकवून घ्यायचे नाही' असे मनोमन चिंतत होती. स्वावलंबी होणे हा एकमेव पर्याय होता स्वतःचे आयुष्य स्वतः सावरण्याचा. स्वावलंबनाचा मार्ग होता नोकरी आणि नोकरीची मागणी होती शिक्षण. सुशिक्षित पिढीने ठरवल्याप्रमाणे केले. घरकामासाठी मोलकरणी ठेवल्या. कालांतराने होताहोता, कामवाल्या हातांची सवय कधी व्यसनात परावर्तित झाली कळालेच नाही. जसे घराला एक दिवाणखाना, झोपायची खोली, स्वयंपाकघर असावे लागते तशीच एक कामवाली पण हवीच ही मानसिकता झाली.

'मावशी उद्या येणार नाहीत' ही ब्रेकिंग न्यूज झाली. अशा समर प्रसंगी कोणी कोणती आघाडी सांभाळायची हे समजेनासे होऊन घरात तुंबळ युद्धे होऊ लागली. 'कामाला बाई सांभाळणे ही एक कला आहे' अशा आशयाच्या चर्चा किटी पार्टीत रंगू लागल्या. 'पैसे घे पण ये' अशी अगतिकता व्यक्त होऊ लागली. त्यातच संपूर्ण आयुष्य घर आणि त्याच्या भोवती फिरणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यतीत झाल्यामुळे मागची पिढी पुढच्या पिढीला मोकळेपणाने मदत करायला का-कू करू लागली. संसार तर मांडला, संसारवेलीवर फुले ही फुलली आणि नोकरी पण करायची . घरातील स्त्रीने अष्टभुजेचा अवतार घेउनही चोवीस तासाचे नियोजन सतत बिघडू लागले. परिणामी ती 'कामवाल्या मावशी/काकू/ताई' च्या पूर्ण आहारी गेली.
सुरवात घरातल्या संपूर्ण कामाची जबाबदारी तिऱ्हाईत व्यक्तीवर सोपावण्यापासून झाली. त्यासाठी पैसे मोजले. पूर्वी एक साबण पावडर महिनाभर चाले ती बाईंच्या राज्यात पंधरा दिवसात संपू लागली. साधारण सगळ्याच सामानाच्या बाबतीत ह्याचीच पुनरावृत्ती होत होती. घराचा अर्थसंकल्प सतत तोंडावर पडत होता. 'बाई आहेत' म्हंटल्यावर सुट्टीच्या दिवशी घरी बसून काय करायचे , कोणाच्या घरी जाण्यापेक्षा बाहेर फिरण्याकडे कल वाढू लागला. मग बाहेरच जेवण, आलोच आहोत तर थोडी खरेदी ... पुन्हा खर्च. ह्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता 'अजून जास्त पैसे कमावणे'. पैसे कमवायचे-गमवायचे , कमवायचे-गमवायचे असे होता होता जीवनातला आनंद, शांतता, सुख आणि आरोग्य मात्र हरवून गेले.

हे दुष्टचक्र अजून किती दिवस फिरत राहिले असते माहीत नाही. निसर्गाला हा सर्व पोरखेळ बघवला नाही बहुदा, त्याने जबरदस्ती सर्व कुटुंबियांना घरी थांबायला लावले. कुठलीही मदत मिळणार नाही. तुम्हीच एकमेकांचे 'मदतीचे हात' व्हायचे. उपलब्ध सोयी सुविधांमध्ये घरात नंदनवन फुलवायचे. सुरवात थोडी धडपड, थोडी कुरकुर, थोडी नाराजगी, थोड्या ओढाताणीने झाली खरी. पण घर आता एकमेकांना ओळखू लागले आहे. घराच्या आणि घरातल्यांच्या गरजा समजू लागल्या आहेत. 'इतकेही काही अवघड नव्हते घराचे व्यवस्थापन' हे समजू लागले आहे. ज्या साठी उर फुटेपर्यंत पळत होतो तो 'खर्चाचा राक्षस' आपोआप आटोक्यात आला. घर बोलू लागल, खेळू लागलं, एकमेकांच्या हातात हात घालून काम करू लागल. खोडकर घर, पसारा घर, सुगरण घर, अभ्यासू घर, प्रेमळ घर ते रम्य घर हा प्रवास बहुतेक घरांना साधला आहे. हास्याचे कारंजे, कधी कधी धबधबे सुदधा, गप्पांचे अड्डे, कविसम्मेलन, गाण्याच्या मैफिली, कथाकथन, नाच-गाणे, नानाविध खेळ घर घरातच घरासाठी घरातल्यांबरोबरच आनंदाने उपभोगू लागले आहे. बाहेरच्या जगावर अवलंबून असलेले घर आता एकमेकांचा आधार झाले आहे. घर एक झाले आहे.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment