Tuesday, April 21, 2020

महानगरे आणि इतर...

प्रत्येक भागाचे एक वैशिष्ट्य असते, तसेच त्या त्या भागाची एक प्रवृत्ती असते. भाषा बदलतात, पदार्थ बदलतात, पेहराव बदलतो, सणवार बदलता. काही बाबतीत मात्र सर्वत्र काही गोष्टी समान असतात. पण त्यातही दोन प्रकार 1. महानगरे, 2. उर्वरीत महाराष्ट्र.

मी ग्रामीण भागातून असल्याने मी उर्वरित महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करते. आमच्याकडे शाळा संपली की 'हव्या त्या 'शाखेत' प्रवेश मिळाला का ?' विचारतात. तेच महानगरांमध्ये 'हव्या त्या 'महाविद्यालयात' प्रवेश मिळाला का?' असे विचारले जाते. आमच्याकडे मुलांवर इतका विश्वास असतो की महाविद्यालय कोणतं का असेना मुलगा मारून नेईल म्हणजे यशस्वी होईल हा विश्वास असतो. तेच महानगरांमध्ये 'चांगले महाविद्यालय मिळाले तर मुलाचे भविष्य मार्गी लागेल' असा विचार असतो. आपल्या मुलापेक्षा महाविद्यालयावर विश्वास अधिक. मेस ( खानावळ) चेही तसेच. आमच्याकडे विचारतात 'वेळेत पोटभर जेवायला मिळतं ना?' तिखट आहे, गार आहे, गरम आहे बाकी काहीही नाही. महानगरात मात्र रडारड 'फार खाण्याचे हाल होतायेत , घरच्यासारखे नाही मिळत, वगैरे'. जसे तुमचे मूल तिकडे शिकायला नाही तर जेवायलाच गेले आहे. थोडे लांब जावे लागत असेल तर आमच्याकडे फक्त जायची यायची सोय आहे ना एवढेच बघतील. फार फार तर फर्मान सोडतील 'जरा लवकर उठून 10 मिनिटे आधीच निघत जा म्हणजे गाडी हुकणार नाही'. महानगरात मात्र 'फार लांब जावे लागते हो, विनाकारण सकाळी लवकर उठायला लागत'. लवकर उठावे लागण इतकं वाईट असत? उलट चांगले आहे ना तुमचे मूल जे तुम्हाला दाद देत नव्हतं, ते आपोआप लवकर उठायला लागले आहे, स्वतःची जबाबदारी स्वतः घेते आहे. अभीमान वाटायला हवा की वाईट ??? शाळा-महाविद्यालयात पुस्तके नाही मिळाली तर 'घ्यावं एखाद्या मित्राचं, रात्रभर जागून लिहून घेतलं की अडचण नाही' असा आमच्याकडचा विचार. आणि महानगरात 'पुस्तक पाहीजे म्हणजे पाहीजे' चा आग्रह. माझे शिक्षण ही माझी जबाबदारी आहे हे आम्हाला माहीत असते. परंतु महानगरात 'पाल्यांचे शिक्षण ही पालकांची जबाबदारी' असल्यासारखे वातावरण. नोकरी/ व्यावसायाचेही तसेच, आमच्याकडे 'काम मिळाले का' विचारतात. 'जास्त वेळ थांबून काम वेळच्यावेळी संपवत जा' असा प्रेमळ दम ही देतात. महानगरात मात्र वेगळीच तऱ्हा 'फार काम असते, जास्त वेळ थांबावे लागते' म्हणून कुरकुर. उरलेल्या वेळेत ह्यांची मुले जशी देशसेवा करायला जाणार असतात. एक असाच चमत्कारिक प्रश्न विचारला जातो 'तुला स्वयंपाक येतो?' आमच्याकडे सगळ्यांनाच येतो प्रश्न फक्त 'सुगरण की नाही' इतकाच. अभ्यासामुळे स्वयंपाक शिकणे झाले नाही ही नाटके महानगरातली. पण एक गम्मत आहे , अभ्यासामुळे चित्रपट, नाटके, मॉल, खरेदी, हिंडणे-फिरणे, गप्पा, ब्युटी पार्लर, लग्नकार्य राहिली असे कधीच होत नाही. जो स्वतःसाठी पण अतिशय गरजेचा आहे तो स्वयंपाकच कसा राहून जातो??

अजून एक गमतीशीर चर्चासत्र सगळ्या वाहिन्यांवर आळीपाळीने चालू असते. 'मराठी भाषा संपून चालली आहे'. चर्चेत सहभागी मान्यवर अर्थात शहरात राहणारे. त्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकणारी. मराठी भाषेची काळजी त्यांना वाटणे स्वाभावीकच आहे. पण ती चर्चा तुम्ही तुमच्या सारख्या लोकांमध्येच करा ना राव. ह्या चर्चाबाज लोकांना माझं एक सांगणं आहे, 'उर्वरीत महाराष्ट्राला फक्त आणि फक्त मराठीच येत'. इंग्रजी तर जाऊच देत, आमचे हिंदी ऐकाल ना तर जागीच भोवळ येऊन पडाल. 'एक बाई जा रही थी। उसके कडेपर एक मूल था।' असं तर आमचं हिंदी. मराठी भाषा संपुन चालली तर मग आम्ही कोणत्या भाषेत बोलायचे?
ह्या मुंबई महानगरात एका मिनिटात 200 अहिराणी बोलणारे लोक जमा होऊ शकतात, तर खान्देशात किती असतील. कोकणात कोकणी न बोलणारा शोधून दाखवावा. अहो, मराठीच्या पोटभाषा जेथे अजून व्यवस्थित धडधाकट आहेत, तीथे मराठी कशी मरून चालली ? कधी आमच्या भागात या, पगडी बांधलेला सरदार अस्खलीत मराठी भाषेत बोलताना दिसेल. अस्खलीत म्हणजे आमच्या भागातली मराठी, तुमची पुणेरी मराठी नाही. आमच्याकडे नाव सांगितल्या शिवाय नुसत्या बोलण्यावरून कोणाचाही धर्म समजणार नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन हे तर नाहीच पण परप्रांतीय वगैरे प्रकार पण नाहीत. पंजाबी असो, सिंधी असो, मारवाडी-गुजराथी असोत, उत्तर-दक्षिण भारतीय नाहीतर नेपाळी असो.. मराठीतच बोलणार. कारण ती आमची व्यवहार भाषा आहे. दुकानात जा , सरकारी कचेरीत जा, बँकेत जा, कोर्टात जा, यष्टीनं (ST बस) प्रवास करा नाहीतर गाडी(रेल्वे) न, आम्ही मराठीतच मांड ठोकून गप्पांचा फड जमवणार. आणि तीच भाषा जर मेली तर आम्ही काय मुक्यानी जगायचे?? मराठी शाळात मग काय मंगलकार्यालय बांधायचे का ?? मराठी शाळेला प्रवेश घेणारा बहुसंख्य समाज आमच्याकडे अजूनही आहे. जोपर्यंत मुलं तिथे शिकत आहेत, तोपर्यंत मराठी मरेलच कशी ? उलटपक्षी राज्यसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा पास झाली की आम्हाला इंग्रजीचा प्रश्न भेडसावू लागतो.

त्यामुळे आजाबात मराठीची चिंता करू नका. शहरात फारच गुदमरायला लागलं तर गावाकडं पाय मोकळे करून या, भरपूर मराठीत श्वास घ्या आणि तेवढं चर्चा बंद करायचं मनावर घ्या.

कळावे, लोभ असावा.

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment