Friday, April 10, 2020

लवकर निजे, लवकर उठे,
त्यास आयु-आरोग्य लाभे !

मान्य ... पण हे वचन आम्ही मोठे झाल्यावर सगळेच सोयीस्करपणे का विसरतात ? लहानपणी कानी कपाळी ओरडून सांगितलेल्या गोष्टी साधारणपणे थोडे मोठे व्हायला लागलो, म्हणजे आई वडिलांना मोठे झाल्याची खात्री वाटायला लागली की गळून का पडतात ? परीक्षा आली आता जरा रात्री पण अभ्यासाला बसत जा पासून सकाळी लवकर उठून अभ्यास करावा पर्यंत उपदेशाचे डोस सुरू होतात. त्या काळी रात्री अभ्यास म्हणजे १० पर्यंत , पट्टीचे जागणारे ,जे चहा पीत असत , ते ११/११:३० पर्यंत जागत. (हल्लीच्या मुलांनी हसायची भोत नच्छ) आणि सकाळी उठून अभ्यास म्हणजे ५ वाजता. ११ ते ५ मध्ये कुठे ८ तासांची झोप पूर्ण होते? त्या काळात आमच्या आरोग्यावर किती विपरीत परिणाम झाला असेल ह्याचा काही विचार ??

इथून जे जगरणाला सुरवात होते ती रात्री कोणी येणार आहे त्यांना दार उघडायला जागे रहा , मुले झाल्यावर त्यांच्या वेळा सांभाळायच्या  म्हणून जागे रहा आणि परत त्यांचीच वेळ सांभाळायची म्हणून लवकर उठा. मग सुरू होते शाळा , डबा बनवायचा , त्यांना तयार करायचे म्हणून उठा. रविवारी पाहुणे येणार , गावी जायचे , जास्तीची साफसफाई, राहिलेले ऑफिस चे काम , मुलांचा गृहपाठ , नवीन पदार्थ बनवायचा ते सगळे सणवार कुठलेही कारण पुरते सकाळी निवांत न झोपायला.
अशावेळेस आपले पालक कुठे हरवतात. की आपणच पालक झाल्यामुळे आपल्या झोपेला वाऱ्यावर सोडून देतात ?

हे जे झोपेचे सत्यवचन आहे हे फक्त मुलींच्याच पालकांना का माहीत असते ? मुलांच्या पालकांना का शिकवले जात नाही?? तसे झाले असते तर कोणाच्या तरी सासरी कधीतरी कोणीतरी सुनेच्या झोपेची थोडीतरी काळजी घेतली असती. रात्री नुकताच डोळा लागला असताना 'पाहुणे आले , उठा स्वयंपाकाची सर्कस करा' असा तीला हुकूम निघाला नसता, सकाळीच दरवाजे धाडधाड वाजले नसते. 'झोप जरा आम्ही आमचे करून घेतो' असे कोणीतरी तीला म्हंटले असते. ह्यामुळेच असेल पण अनेक स्त्रियांना मुलांच्या निमित्ताने पटकन डुलकी घेण्याची सवय असते. त्याला पण 'हल्ली च्या मुलींची नाटके' असे नाव दिले गेले नसते.

देव भले करो त्या चपट्या नाकाच्या शत्रूचे, त्याच्यामुळे कित्येक वर्षे हरवलेल्या जिवाभावाच्या सखीला मनमुराद भेटता येइल असे वाटले. किती वाजता झोपायचे किती वाजता उठायचे काह्ही बंधन नाही. ८ +१ तास झोपलो तरी कोणाचा डबा रहाणार नाही , कुठली गाडी हुकणार नाही, ऑफिस मधून फोन येणार नाही, कुठल्या मीटिंगची वेळ पकडायची नाही. एक पोटोबा सांभाळला आणि घरातली २/४ कामे झाली की सगळा वेळ आपला आणि आपल्या सखीचा. ह्यालाच मागच्या जन्मीचे पुण्य म्हणत असावेत.

पण .....
इतके दिवस दुर्लक्ष केल्यामुळे सखी रुसलीये बहुदा. कितीही अंजारा गोंजारा जाम दाद देत नाही. दुपारी येतेस का ग भेटायला विचारावे तर वळून पण बघत नाही. रात्री भेटुयात का म्हणावे तर माझी १२ ची वेळ आहे सांगून मोकळी. जागणारा माणूस काय करणार शेवटी ... पुस्तक , समाजमाध्यमे संपली की दूरचित्रवाणी कडे वळणार. पण ते ही जगू देत नाहीत शांतपणे. कितीही वाहिन्या बदला कोणी न कोणी सांगत असते 'भरपूर पाणी प्या, गरजेपुरतेच खा, व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या :(

कळावे, लोभ असावा.

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment