Tuesday, April 14, 2020

'ती आली'
हळू बोल...

पूर्वी पाळी आली की जवळ जवळ कानात कुजबुजल्या सारखे सांगत असत. त्याचा इतका परिणाम काही पिढ्यांवर झाला आहे की हल्ली मुलीने मोठ्या आवाजात सांगितले की प्रतिक्षिप्त क्रिया व्हावी तसे सहज निघून जाते 'हळू बोल'.

एका मैत्रिणीने मुलाला सांगताना ऐकले 'आज तिच्या वाटी जाऊ नकोस, तिची पाळी आली आहे, उगाच चिडचिड होईल अजून तिची' ... मैत्रीण गार, ' आग तुझ्या मुलाशी हे काय बोलते आहेस?' .. का नाही ? ह्या प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर नव्हते पण 'ही बाई फारच वाह्यात दिसतेय' असे ठरवून ती मैत्रीण अजूनही 'सोशल डिस्टन्स' सांभाळून आहे.

ह्या न बोलण्यामुळे काय काय मजेशीर नांवे ठेवली जात होती. कावळा शिवला ते मैत्रीण आली पर्यंत किती प्रकारे सांगितले जात होते. सगळ्यात धमाल होती ती 'सॅनिटरी नॅपकिन' च्या नावाची. 'तुझ्याकडे 'ससा' आहे, माझी मैत्रीण आली आहे'.ज्याला काहीच माहीत नाही त्याने जर ऐकले तर .... 'मैत्रिण आली की तीला ससा कोणत्या संस्कृतीत देतात' विचार करून भोवळ यायची ऐकणाऱ्याला.

बरं ती कधी कोणाच्या आड येत नसे. शाळा , कॉलेज, व्हॉलीबॉल, कथक, सायकल,NCC, नाटकाच्या तालमी सगळंच सुरू असायचं. पण अत्र तत्र सर्वत्र चराचरात सामावलेला एखादा परमेश्वरी अवतार घरी प्रकट होणार असेल तर मात्र 'सामाजीक विलगीकरण'. तेव्हा खूप राग यायचा , काय वेडेपणा आहे असे वाटायचे. सासरी गेल्यावर मात्र 'आता कामातून सुटका' खूपच आनंद व्हायचा. हल्ली मात्र बरेचदा वाटायचे, स्त्रियांना ह्या काळात हक्काची दोन(२) दिवसांची सुट्टी मिळायला हवी. 'पूर्वीच्या स्त्रियांचे बरं होतं' विचार येऊन त्यांचा हेवा वाटायला लागला होता. शिवाशीव, विटाळ सोडले तर दोन(२) दिवसांच्या विश्रांतीची कल्पना पटायला लागली होती. काही घरात आजही हे विलगीकरण पाळले जाते पण ते त्या स्त्रीला विश्रांती मिळावी म्हणून नाही तर धार्मिक कारणांसाठी, ते कुठेतरी खटकते.

तिची येण्याची तऱ्हा पण प्रत्येकीच्या बाबतीत वेगळी, कोणाला येणार काय, आली काय, गेली काय काही फरकच पडत नसतो. काहींच्या चेहेऱ्यावर दोन (२) दिवसापासूनच बारा वाजलेले दिसतात, एकदा धरणाची दारे उघडली की त्या सुटल्या. काही दर महिन्याला हार्ट अटॅक आल्यासारखे पूर्ण घर डोक्यावर घेणार. गरम पाण्याची पिशवी, वेदनाशामक गोळ्या, मळमळ, चिडचिड, रडारड.... घराचे नुसते रणांगण. दोन(२) दिवसांनी वेदना कमी झाल्या की घर परत जागेवर.

सखे, पुष्कळ वेळा येऊन झाले तुझे. आता जायची वेळ आली. पण परिणाम ऐकले की पोटात गोळा येतो. हे असं सगळं होणार असेल तर नकोच जाऊस. आनंदाने एकत्र नांदू आपण. हवे तर ससा ससा खेळू.

कळावे, लोभ असावा

- ॲड स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment