Thursday, April 9, 2020

छडी लागे छम छम,
विद्या येई घम घम ..


काल खरेदी केलेले कांदे, बटाटे आणि लसूण विलगीकरणाची शिक्षा देऊन बाहेर गच्चीत ठेवले होते. आज आत आणताना एक विचार आला, आपल्या शिक्षकांना विलगीकरणाचे महत्व फार पूर्वीच कळाले होते. म्हणूनच तर काहीही चूक करा वर्गा बाहेर उभे रहाण्याची शिक्षा देत असत . बाहेर उभे राहून विद्यार्थी स्वच्छ , शुद्ध झाला की परत वर्गात सन्मानाने प्रवेश मिळत असे. शाळेत जायला उशीर झाला की तर शाळेच्या बाहेर मैदानात ३ किंवा ५ फेऱ्या पळत पळत माराव्या लागायच्या. ही विलगिकरणाची पुढची पायरी असावी.

फक्त शाळेतच नाही तर रोजच्या व्यवहारात देखील हा विलगिकरणाचा नियम पाळला जात होता. साधी आंब्याची आढी लावायची असेल तरी कच्चे , पाडाला लागलेले , पिकायला आलेले अशी वेगवेगळी आढी लावली जायची.

पण हल्लीच्या शुचिर्भूत शिक्षण व्यवस्थेला हा नियम मान्य नसावा. त्यांच्या मते सडलेले, कमी पिकलेले, पूर्ण कच्चे , पिकलेले सगळेच आंबे एकाच आढीत ठेवायचे. वर त्यांना तू पिकलेला आहेत , तू अजून पिकायचा आहेस , तू खराब झालास ,इ काहीही म्हणायचे नाही. आढी कशी मधून मधून तपासून पहावी लागते ,कोण पिकले कोण कच्चे राहिले ,कोण खराब झाले बघावे लागते. तसेही काही करायचे नाही. परीक्षाच घ्यायची नाही म्हणजे काळायलाच नको कोण सध्या कुठवर पोहोचला आहे ते? शेवटी जेव्हा कळायची वेळ येते तेव्हा सांगायचे 'तू कौशल्य विकास' बरका. खराब आंबे एका डागात ओळखता यायचे , असे आंबे पहिल्या डागालाच बांधावर नेऊन पुरले जायचे. त्यातून नवीन झाडे पुढच्या पिढीसाठी उगवून तयार असायची. आम्ही मात्र पूर्ण आंबा न पिकण्याची वाट पाहतो, आणि शेवटी सांगतो 'तू कौशल्य विकास'.

का? त्या बाळाला 7 वि लाच जर कळाले की त्याला ह्या पुस्तकी अभ्यासात काही रस नाही तर 8 वि पासूनच तो त्याला जिथे गती आहे त्या विषयात / कौशल्यात प्रवेश घेऊ शकेल. 3 वर्ष वाया जाण्यापासून वाचणार नाहीत का त्याची?

अजून एक नवीन प्रकार ' मुलांना शिक्षा करायची नाही'. अघोरी शिक्षा नकोतच. पण मी जर चुकलो तर त्याचे दुष्परिणाम मलाच भोगावे लागणार आहेत हे त्या बाळाला कोण शिकवणार ??

मूल चुकले, बोलावं पालकांना. मुलाला हळू हळू माहीत होते , मी चुकलो तर मला कोणीच रागावणार नाही, होऊन होऊन काय होईल , पालकांना बोलणी बसतील. 'बोलणी' हा शब्द अक्षरशः खरा आहे. मुलांच्या उद्योगांनी कावलेल्या मास्तरणी पालकांना अक्षरशः धारेवर धरतात. मुलगा चुकला, घरचा अभ्यास नाही केला, मुलांनी वर्गात गोंगाट केला, वर्ग चालू असताना बडबड केली, हल्ली अजून एक प्रकार 'प्रोजेक्ट' नावाचे लचांड घरून करून नाही आणले, धर पालकांना. त्यांना तरी काय दोष द्या?

सध्या कोरोनाच्या कृपेने आपण सगळे घरी आहोत. एका तरी पालकाने सांगावे की मी माझ्या मुलाला/मुलांना एकदाही रागावले(लो) किंवा शिक्षा केली नाही. आपलीच मुले/ मूल , 1 किंवा 2 किंवा अपवादाने 3 झेपत नाहीत आपल्याला . मग विचार करा ती एक शिक्षिका आपली माकडछाप मुले न रागावता न शिक्षा करता कशी हाताळत असेल ? बर नुसते सांभाळायची असतात का ती मुले तर नाही. त्या गोळ्यांना घडवायचे पण असते.

हो पण घडवताना , आकार देताना त्या गोळ्याला जरा सुद्धा हात लावायचा नाही. कोणीतरी कुंभाराला सांगा हो, मडके बनवताना मातीला जोरात तिंबायचे नाही, मातीच्या गोळ्याला हाताने चापट्या मारायच्या नाहीत, त्याला स्वतःला जो आकार घ्यायच असेल तो घेऊ द्यायचा, त्याला आकार घेण्याची दिशा दाखवायची नाही. बनवू शकेल का हो तो कुंभार तुम्हाला आम्हाला हवे तसे भांडे , मडके, दिवे ??

हात पाय बांधून म्हणायचे 'हल्ली चांगले शिक्षक तयारच होत नाहीत'. हे म्हणजे पोलिसांसारखे झाले, बंदूक द्यायची पण चालवायची परवानगी नाही. वर म्हणायचे , पोलिसांचा काही धाकच राहिला नाही समाजाला.

'सब घोडे बारा टक्के' नियम कसा चालेल? कायद्यात तरी सगळ्या गुन्ह्यांना सारखी शिक्षा आहे का ? गुन्हा तो गुन्हाच मग तो कोणताही असो, एकच शिक्षा. चालेल ? साधी घरात पोळी किंवा भाकरी केली जाते तेव्हा कणिक मळताना आणि भाकरीचे पीठ भिजवताना पद्धत , प्रमाण सारखे असते का ? उद्या भाकरी म्हणाली, 'कणकेला कसे मळणे म्हणतात तसेच मला पण म्हणा ,मला भिजवायचे नाही. आणि कणके इतकेच मळायचे', टम्म फुगेल का हो भाकरी ? स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला देतो ना आपण तो निर्णय घेण्याचा अधिकार, कशात तिखट ,मीठ ,गुळ , साखर , तेल, तूप घालायचे , काय वाटायचे ,काय मळायचे ,काय आणि किती भाजायचे ... तेव्हा कुठे सुग्रास भोजन आपल्या ताटात वाढले जाते. हा निर्णय घेण्याचा अधिकार शिक्षकांना नको द्यायला ??

आपण आपल्या मुलांना वाढवतो, मोठे करतो, वळण लावतो ते त्यांच्या शिक्षकांच्या मदतीनेच. आपल्याच मुलांच्या कितीतरी गोष्टी त्यांचे शिक्षक आपल्या लक्षात आणून देत असतात. मुलांच्या जडणघडणीत, विचारसरणी मध्ये पालकांइतकाच शिक्षकांचाही हात असतो हे तरी मान्य करूयात.

कळावे, लोभ असावा.

-ॲड. स्वाती आवटी दीक्षित

No comments:

Post a Comment